•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Archives for लेख

    ऑगस्ट २०२१ – घरगुती औषधोपचार

    कोरोनाच्या काळात विविध औषधोपचारांचं पेवच फुटलं होतं. कोणीही काहीही घरगुती औषधं सांगितली की लोकं मागचा-पुढचा विचार न करता आपल्या प्रकृतीला तो उपाय चालेल की नाही याचाही विचार न करता करुन बघत होते. ज्याचे विपरित परिणामही अनेकांनी भोगले. त्याचसाठी आपल्या स्वयंपाकघरातील अशा काही गोष्टी आहेत ज्या कायम आपल्या घरात असणे आवश्यक आहे. कोरोना सारखी भीषण परिस्थिती भविष्यात कधीही न उद्‌भवो हे नक्की. तरीही इतर छोट्या-मोठ्या आजारांवर हे घरगुती उपचार नक्कीच परिणामकारक ठरतात.

    प्राचीन काळापासून आरोग्याची संकल्पना स्पष्ट करण्यात आली आहे. आयुर्वेदात आरोग्याचे महत्त्व सांगण्यात आले आहे. आपल्या स्वयंपाकघरातील मसाले, कडधान्ये, भाजीपाला, तसेच परिसरातील वनस्पती, फळे या सर्वांमध्ये अनेक प्रकारचे औषधी गुणधर्म आहेत. आरोग्याशी संबंधित छोट्या छोट्या विकारांवर आपल्या जवळच गुणकारी काही घरगुती औषधोपाचार :

     

    लिंबाचे औषधी गुणधर्म

    १)  एक कप पाण्यात लिंबाचा रस पिळून त्यात थोडे सैंधव मीठ घालावे. बारा तासांत साधारणपणे पाच वेळा हे सेवन केल्यास अतिसार थांबेल व शरीरात थकवाही जाणवणार नाही.

    २)  सकाळी अनशापोटी मीठ घातलेले लिंबूपाणी प्यायल्यास मलावरोध दूर होतो.

    ३)  काळे मीठ, त्रिफळा, सुंठ, सोनामुखीची पाने हे चारही घटक घेऊन त्यात लिंबाचा रस घातल्यानंतर बारीक वाटून घ्यावेत. त्याच्या गोळ्या तयार कराव्यात. सकाळ-संध्याकाळ दोन गोळ्या पाण्याबरोबर घेतल्यास पोटदुखी थांबते.

    ४)  अपचनाचा त्रास असेल तर लिंबाच्या फोडीवर थोडेसे काळे मीठ व हिंग घालावे व हे लिंबू थोड्या थोड्या वेळाने चाटावे.

    ५)  कारल्याची मुळी लिंबाच्या रसात एकत्र करून लावल्याने खरूज बरी होते.

    ६)  उन्हाळ्यात व पावसाळ्यात लिंबूपाणी सेवन करणार्‍या व्यक्तीला सहसा घामोळ्यांचा त्रास होत नाही.

     

    बहुगुणी आवळा

    १) रोज ताजा आवळा चावावा. दात किडणार नाहीत.

    २) आवळ्याची पाने वाटून त्याचा रस गाळून घ्यावा. हा रस एक ग्लास कोमट पाण्यात घालून एकत्र करावा. पाच मिनिटे या पाण्याने गुळण्या कराव्यात. त्यामुळे घसा मोकळा होऊन काहीही खाता-पिता येईल.

    ३) सर्दी–पडसे झाले असेल, तर आवळ्याचे चूर्ण मधात कालवून घ्यावे. उन्हाळ्यातील पडसे असेल, तर आवळ्याचे चूर्ण पाण्याबरोबर घ्यावे.

    ४) डोकेदुखी, डोळ्यांतील जळजळ तसेच मानसिक थकवा असल्यास आवळ्याच्या तेलाने मालीश करणे गुणकारी ठरते.

    ५) कफयुक्त खोकला असेल, तर फक्त आवळ्याच्या रसाने सेवन करावे. कच्चा आवळा चावून खाल्ल्यानंतरही कफ बाहेर पडतो.

    ६) आवळ्याच्या रसात पिंपळीचे चूर्ण व मध मिसळून सेवन केल्यास उचकी थांबेल.

    ७) डोकेदुखीचा त्रास होत असेल, तर आवळ्याचा मुरांबा सेवन करावा. त्यामुळे मलावरोधही नाहीसा होतो. स्नायुमध्ये आलेला अशक्तपणा कमी होतो.

    ८) अतिसार होत असल्यास वाळलेला आवळा १० ग्रॅम व हिरडा १० ग्रॅम घेऊन दोन्हीला एकत्र करून बारीक वाटावे. हे चूर्ण सकाळ-संध्याकाळ एकेक चमचा पाण्यासोबत सेवन करावे.

    ९) कच्च्या आवळ्याच्या सेवनाने पोटाचे अनेक विकार बरे होतात. तसेच आवळ्यामुळे पोटातील कृमी-जंतू नाहीसे होतात.

    १०) लिंबू पाण्यात पिळून त्यात वाटलेल्या आवळ्याचे चूर्ण टाकावे. या पाण्याने रोज केस धुवावेत. केस काळे होण्याबरोबरच रेशमी मुलायम होतात.

     

    तुळशीचे औषधी उपचार

    १)  सर्दी – ताप असेल, तर तुळस व काळ्या मिरीचे चूर्ण २५० ग्रॅम पाण्यात उकळून पाजल्यास लगेच आराम मिळतो.

    २)  १० ग्रॅम तुळशीचा रस, २० ग्रॅम मध व ५ ग्रॅम आल्याचा रस एकत्र करून घेतल्यास खोकला, ताप बरा होईल, तसेच २ ग्रॅम तुळशीची पाने, २ ग्रॅम जिरे बारीक वाटून ५० ग्रॅम पाण्यात मिसळून प्यायल्याने देखील खोकला-ताप बरा होईल.

    ३)  मलेरिया झालेल्या रूग्णाला तुळशीचा १० ग्रॅम रस आणि काळीमिरी चूर्ण १ ग्रॅम पाण्यात मिसळून दिवसातून ५-६ वेळा २ तासांच्या अंतराने पाजावे. यामुळे आराम मिळेल.

    ४)  तुळशीची पाने पाण्यात उकळवून  प्यायल्याने कफ, सर्दी, थकवा, ताप, डोकेदुखी त्रास होणार नाहीत.

    ५)  दमा असेल तर काळ्या तुळशीच्या रसात मध घालून सेवन करावे.

    ६)  तुळशीची पाने व आले यांचा रस काढून कोमट करावा आणि २ तासांच्या अंतराने प्यावा. यामुळे पोटदुखी कमी होते.

    ७)  तुळशीच्या पानांचे चूर्ण साखरेसोबत सेवन केल्यास संग्रहणी ठीक होईल.

    ८)  अर्धा चमचा तुळशीच्या बियांचे चूर्ण दुधासह सेवन केल्याने जुलाब लगेच थांबतील.

    ९)  एक चमचा तुळशीचा रस घेतल्याने उलट्या बंद होतात. तसेच हा रस मधासह चाटल्यानेही उलट्या थांबतात.

    १०)   तुळशीचा व लिंबाचा रस समप्रमाणात घेतल्यास डाकेदुखी थांबते. तसेच तुळशीच्या पानांचे चूर्ण मधासह घेतल्यानेही डोकेदुखी थांबते.

    Read more

    जुलै २०२१ – आणि करोना झाला….

    जयश्री देसाई

    ज्या काळात करोनाबद्दल सगळ्यांच्याच मनात भीती बसली होती; ज्या काळात या रोगाबद्दलच्या अफवांचं पीक आलं होतं; नेमकं त्याच काळात मी व माझे पती सुधीर… दोघांनाही एकदमच करोना झाला होता. आम्ही यातून सुखरुप बाहेर पडलो. मात्र या काळात आलेले काही बरे- वाईट अनुभव खूप समृद्ध करून गेले. या रोगाबद्दल माध्यमांतून जनजागृती सुरु असून सुद्धा या बाबत गैरसमजच जास्त होते. म्हणून त्या काळातले अनुभव लिहून ठेवावेसे वाटले.

    १७ जून रोजी मला अचानक दिवसभर खूप ढेकर आले. रात्री मला व माझे पती सुधीर या दोघांनाही अचानक सर्दीचा अटॅक आल्यासारखे झाले. सुधीरची सर्दी खोकल्यात परिवर्तित झाली होती तर मला गुरुवारी दुपारी अचानक २ पर्यंत ताप चढला. मी लॉक डाऊन सुरु झाल्यापासून घराबाहेरच पडलेली नसल्याने करोनाची शंका सुद्धा माझ्या मनात आली नाही. सुधीरही बँक वा तत्सम कार्यालयांतच…आणि तोही क्वचितच जात होता. एकदाच फक्त तो मोठ्या मार्केटला गेला होता. त्यामुळे त्यालाही हा खोकला हवा बदलामुळे आला असावा असेच वाटले. त्यात आम्ही घरात व बाहेर सगळ्या दक्षता पाळत होतो. त्यामुळे करोनाच्या शक्यतेवर आम्ही फुलीच मारली होती. आमचा मुलगा आदित्य मात्र कोणतीही ‘रिस्क“ घ्यायला तयार नव्हता.

    आमच्या घराशेजारीच प्रख्यात हार्ट सर्जन डॉ. अनिल तांबे यांचे हॉस्पिटल आहे.  तो मला तिथे घेऊन गेला. डॉक्टरांनी ७ दिवसांचा कोर्स दिला व त्याने जर बरे वाटले नाही तर करोनाची टेस्ट करावी लागेल असे सांगितले आणि करोनाची टांगती तलवार माझ्या मानेवर लटकायला लागली.

    सुधीरचा सगळा भर कमीत कमी औषधे घेणे यावर असतो. शरीरात नैसर्गिकरित्या बरे होण्याची शक्ती असते यावर त्याचा दृढ विश्वास. त्यामुळे त्याने ४ दिवस अंगावर काढले. मात्र प्रचंड व सततच्या खोकल्याने त्याची होणारी अवस्था बघवत नव्हती. अखेर त्यालाही डॉक्टरकडे जाण्यास आम्ही भाग पाडले. त्या अनुभवावरुन एक नक्की की करोनाची भीती असो वा नसो, वयोमानानुसार आपल्या आजाराचा विचार करावा. साठीच्या पुढे आणि वयवर्ष पंधराच्या आत साधा सर्दी – खोकला झाला तरी घरगुती उपचार करत वेळ न काढता डॉक्टरांकडे जाणे हे उचित. आपली रोग प्रतिकार क्षमता चांगली असेल, आणि आपण तातडीने डॉक्टरकडे गेलो तर करोना आपले काही वाकडे करु शकत नाही हा अनुभव त्या काळात करोनाची शिकार झालेल्या अनेकांनी घेतला असेल.

    त्यावेळी तर करोनाचे काळेकुट्ट ढग चांगलेच दाटून आलेले होते. सुधीरला डॉक्टरांनी औषध तर दिले. पण त्याला बरे वाटेना. शेवटी २७ तारखेला त्यांनी त्याचे औषध बदलून दिले पण तातडीने करोनाची टेस्ट करायला सांगितली. ठाण्यात कॅडबरी जंक्शनच्या फ्लाय ओव्हरच्या खाली असलेल्या तपासणी केंद्रावर जाऊन त्याने शनिवारी २७ जूनला टेस्ट केली. सोमवारी दुपारी महापालिकेतून फोन आला की सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.  मात्र ठाणे महापालिकेचे खरोखर कौतुक करायला हवे इतका चांगला अनुभव आम्हाला आला. घरातच क्वारंटाइन होण्यासारखी स्थिती आहे की नाही ते त्यांनी आदित्यला विचारले. ती स्थिती आहे हे समजल्यावर घरातच क्वारंटाइन करताना काय काय खबरदारी घ्यायची याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी आमच्या आदित्यला केले व तेवढ्यावरच न थांबता सुधीरला महापालिकेने घरपोच एक कफ सिरप दिला तर आदित्यला करोना होऊ नये म्हणून सहा टॅबलेट्‌स दिल्या!

    मी तोवर बरी झाले होते. फक्त थोडी सर्दी होती. मात्र सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर सोमवारीच मी जाऊन टेस्ट करून आले. माझ्याही टेस्टचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटीव्ह आला आणि मी दुसर्‍या बेडरुममध्ये क्वारंटाइन झाले. मला काहीच लक्षणे नसल्याने पालिकेतर्फे मला फक्त बिकॉस्युल झेड आणि सी व्हिटामिन च्या गोळ्या खाण्यास सांगण्यात आले .

    पालिका तेवढेच करून थांबली नाही त्यांनी सोसायटीच्या दारावर येथे करोना पेशंट आढळल्याचे नमूद करणारा फ्लेक्स तर लावलाच. पण पूर्ण सोसायटीत निर्जंतुकीकरण केले. सोसायटीला एक सॅनीटायझर पंप भेट दिला आणि तेवढ्यावरच न थांबता वारंवार आम्हाला काही हवे आहे का याची चौकशी केली. अगदी ‘मेडिकल वेस्ट“ची योग्य तर्‍हेने विल्हेवाट लावली जाते आहे की नाही याचीही चौकशी केली. आमच्याकडे ‘मेडिकल वेस्ट“ तयारच होत नाहीय असे आदित्यने सांगितल्यावर सुद्धा त्यांनी त्यासाठी एक पिवळ्या रंगाची कचर्‍याची पिशवी देण्याची तयारी दर्शवली. मात्र तेवढ्यात ठाण्यात पूर्ण लॉक डाऊन जारी झाला आणि ते राहिले. त्याची आम्हाला तशीही गरज नव्हतीच.

    पोलिसांचेही फोन आले. त्यांनीही चौकशी केली आणि आमच्याकडे करोना रुग्ण आढळल्याने सोसायटीत कुणी त्रास दिला तर त्याची तक्रार करण्याचेही त्यांनी सांगितले.   आम्ही जरी पोलिसांत तक्रार केली नाही तरी आमच्या सोसायटीत काही जणांकडून आम्हाला वाळीत टाकण्यासारखे अनुभव आले. आमच्याकडचा कचरा न उचलणे, आम्ही जेवणाचा डबा लावला, पण त्याला आत न येऊ देणे असे काही प्रकार घडले.

    हा विषाणू फक्त आणि फक्त डोळे, नाक व तोंडातून आत जाऊ शकतो. त्यामुळे कचरा न उचलणे, डबेवाल्याला आत न येऊ देणे वा काही सोसायट्यांमध्ये करोनामुक्त झालेल्या  सभासदांनाही लिफ्ट वापरु न देणे वा त्यांना त्यांच्याच घरात विलगीकरण करू न देणे… सुरवातीला अज्ञानातून हे प्रकार सर्वत्र, सर्रास घडत  होते जे सरत्या काळानुसार कमी होत गेले.

    यथाअवकाश आम्ही करोना मुक्त होऊन आमचं सामान्य जीवन जगू लागलो. आज तर त्या रोगाच्या फक्त आठवणी मनात उरल्या आहेत. पण त्या काळानं आम्हांला काही चांगले अनुभवही दिले.  अतिशय सुखद अनुभव आम्हाला दिला तो आमच्या लेकानं… आदित्यने! तो या सगळ्या काळात आमची आई झाला होता. त्याने खूप केलं….आम्ही  लवकर बरे झालो याचं श्रेय त्यालाही तितकंच जातं. आपण केलेले संस्कार आणि आपली आपल्या घरच्यांशी, नातलगांशी असणारी वागणूक मुलांच्या मनावर परिणाम करत असते, ज्याचा अनुभव, वेळ आली की येतो, हे ही आदित्यच्या वागणुकीवरुन पुन्हा मनावर ठसलं. काळ्याकुट्ट अनुभवालाही रुपेरी किनार असतेच! फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्यालाच विकसित करावी लागते!

    Read more

    जून २०२१ – ..इन टाईम ऑफ कोव्हीड

    ‘इतक्या रात्रीचं कोण बेल वाजवतय?“ कौसल्याबाईंनी चष्मा लावून, मोबाईलमध्ये घड्याळ बघितलं, ‘साडे अकरा वाजलेत… आत्ता कोण आलं असेल? या सध्याच्या दिवसात, दिवसाउजेडी कोणी येत नाही तर रात्री कोण येणार?“ सेफ्टीचेन लावून त्यांनी आतला दरवाजा उघडला तर दारात वॉचमन…..
    ‘का रे सुधाकर इतक्या रात्रीचा?“ दरवाजा पूर्ण उघडत त्यांनी विचारलं,

    ‘काकू, समोरच्या साहेबांना बरं वाटत नाहीये. थंडी भरून आलेय म्हणतायत. काही औषध आहे? मला काहीच कळत नाहीये. तुम्हांला चालेल का त्यांच्याकडे यायला?“

    ‘मी येऊ म्हणतोस? आणि असला तसला ताप असला म्हणजे?“

    ‘ते ही आहेच. मग काय करायचं?“

    ‘बरं चल बघूया.“  गेले जवळपास पाच/सात वर्ष तो माणूस त्यांच्या समोर राहत होता. पण त्यांच्या विषयी काहीच माहिती नव्हती. जवळ जाऊन अंगाला हात लावून बघावं का नाही या विचारानं त्यांची पावलं अडखळली. दोन क्षण विचार करून त्यांनी मोबाईलवर फोन लावला, ‘हॅलो नित्या,
    सॉरी ग इतक्या रात्री फोन केला… माझ्या शेजारी एक गृहस्थ राहतात त्यांना ताप आहे….तो या करोनाचा ताप आहे किंवा नाही हे कसं समजायच?….. हो खरं आहे मलाही संसर्गाची भीती आहे…पण मी शक्य ती काळजी घेते ना….अग असं कसं सोडणार त्यांना?…नाही ना; डॉक्टरपण नाही यायला तयार कोणी…. हो आहे क्रोसीन…देते…  थँक यू ग….हो, गूड नाईट.“

    ‘ काय झालं काकू?“

    ‘अरे डॉक्टर म्हणतेय ते करोनाबिरोना असंच कळत नाही तपासणी शिवाय. पण कदाचित्‌  उन्हाळ्याचा ताप असेल…आपल्यालाही सगळी काळजी घ्यायला सांगितलंय. बाकी काय होईल ते बघू.“

    ‘ आता काय करायचं काकू?“ ‘तू थांब इथेच मी आले.“ घरी जाऊन त्या थंड पाणी आणि रुमाल घेऊन आल्या, ‘आत्ता त्यांच्या कपाळावर पट्‌ट्या“ ठेऊ. सकाळी बघू काय करायचं ते.“

    कौसल्याबाई रात्रभर त्यांच्यापाशी बसून होत्या…..पहाटे त्यांचा ताप पूर्ण उतरला.

    ‘तब्बेत बरी दिसतेय. हे घ्या.“ विनायकरावांनी दार उघडताच हातातली डीश पुढे करत कौसल्याबाई म्हणाल्या, ‘खाणं झाल्यावर, हे औषध घ्या.“

    त्या दारातून मागे फिरतच होत्या इतक्यात विनायकराव म्हणाले, ‘उगाच तुम्हांला रोजच्या रोज त्रास. उद्यापासून सुधाकर ब्रेड, अंडी काहीतरी घेऊन येईल. तुम्ही नका त्रास घेऊ.“

    ‘त्रास कसला हो?“ त्या आत येत म्हणाल्या, ‘ माझ्या एकटीसाठी करतेच ना त्यातच तुमच्यासाठी. तुमच्या घरातले असते तर केलंच असतं ना तुमचं.“

    ‘घरातले असते तर ना?“

    ‘म्हणजे…. “

    ‘आई वडील लहानपणीच गेले.  घरात शिस्त लावायला, आयुष्याला वळण द्यायला कोणी नाही. त्यामुळे शिक्षण अर्धवट सोडलं, मग योग्य वयात नोकरी व्यवसाय नाही. वडिलांच्या घरात राहणार्‍या भावाबरोबर राहत असे. दोन वेळेचं जेवायला आणि गरजेपुरते कपडे मिळत. दिवसभर उनाडक्या करत फिरत असे. एकदा एका मित्राच्या आईने त्यांच्या घरच्या व्यवसायात मदतीसाठी बोलावलं. तेव्हा मला समजलं मलाही बुद्धी आहे. ठरवलं तर मी ही काही करू शकतो. आमचा ट्रान्सपोर्टचा व्यवसाय चांगलाच भरभराटीला आला. मग हे घर घेतलं. एकटाच जीव, भविष्यात पुरतील इतक्या पैशाची सोय केली आणि काम बंद करून इथे राहायला आलो. आता तर हे असे दिवस. हे असं बंदिस्त राहाणं, दुसर्‍यावर अवलंबून राहाणं, नको वाटतं हे सगळं. आपण कोणाच्या उपयोगी पडत नाही तर इतरांना निदान आपला त्रास तरी होऊ नये.“ विनायकराव अगदी हताश, उदास होऊन बोलत होते…..

    ‘उठा…“ कौसल्याबाई उठून उभ्या राहात म्हणाल्या. विनायकराव गोंधळून उभे राहिले…. ‘या माझ्याबरोबर बाहेर….“ म्हणत त्या त्यांना बाल्कनीत घेऊन गेल्या….. ‘बाहेर नजर फिरवा जरा. एकटे कुठे आहात तुम्ही….बघा बरं बाहेर. अहो हा आजार चार दिवसांसाठी आहे. आज ना उद्या यातून मार्ग निघेलच. पण हा अनुभव आयुष्यभर जपून ठेवावा असा होऊ शकतो की. कामाच्या धकाधकीत, झाडं, पानांचा बदलता रंग, रंगबिरंगी पक्षी…. हे सगळं किती आनंद देऊन जातं हे माहिती तरी होतं का? स्वतःशीच कुढत बसण्यापेक्षा हा आनंद अनुभवा. मनात जपून ठेवा. म्हणजे कधी उदास, एकटं वाटेल ना तेव्हा मनाच्या कुपीतून या आठवणींचा दरवळ मनभर पसरवायचा. बघा मनाबरोबर शरीरही कसं ताजतवानं होईल.“

    ‘ आता या एकटेपणावर एक उतारा मिळालाय,“ समोर फुलत्या गुलमोहराकडे एकटक बघत ते म्हणाले, ‘रोज गुलमोहोराच्या किती कळ्या उमलल्या ते बघायचं.“

    ‘एकट्यानं कशाला? दोघं मिळून बघू.“ कौसल्याबाईंच्या बोलण्यावर त्यांनी चमकून त्यांच्याकडे बघितलं…. ‘खरंच म्हणतेय. एकटेपणा मलाही खायला उठतोच की. नवरा गेला, मुलगी आपल्या घरी आहे ती ही परदेशी…. कौसल्याबाईंनी हात पुढे केला…..

    त्या पुढे केलेल्या हाताकडे ते गोंधळून बघत राहिले….तशी कौसल्याबाईच म्हणाल्या, ‘जास्त विचार नका करू. नवीन नातं आलंय तुमच्या आयुष्यात तर स्वीकारा. या बंदिस्त काळाची भेट समजा… खात्री बाळगा  हे आपलं मैत्रीचं नातं नक्कीच खूप सुंदर असेल, शाश्वत प्रेमाचा अनुभव देणारं….मैत्रीचं प्रेम म्हणा किंवा प्रेमाची मैत्री म्हणा.“

    कौसल्यार्बाइंच्या डोळ्यात बघत विनायकरावांनी त्यांच्या पुढे केलेल्या हातावर आपला हात ठेवला तेव्हा त्यांच्या चेहर्‍यावरही छान, मोकळं हसू फुललं होतं, अगदी बाहेर सूर्यास्त होतांना गुलाबी, निरभ्र झालेल्या आकाशासारखं.

    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter