जयश्री देसाई

ज्या काळात करोनाबद्दल सगळ्यांच्याच मनात भीती बसली होती; ज्या काळात या रोगाबद्दलच्या अफवांचं पीक आलं होतं; नेमकं त्याच काळात मी व माझे पती सुधीर… दोघांनाही एकदमच करोना झाला होता. आम्ही यातून सुखरुप बाहेर पडलो. मात्र या काळात आलेले काही बरे- वाईट अनुभव खूप समृद्ध करून गेले. या रोगाबद्दल माध्यमांतून जनजागृती सुरु असून सुद्धा या बाबत गैरसमजच जास्त होते. म्हणून त्या काळातले अनुभव लिहून ठेवावेसे वाटले.

१७ जून रोजी मला अचानक दिवसभर खूप ढेकर आले. रात्री मला व माझे पती सुधीर या दोघांनाही अचानक सर्दीचा अटॅक आल्यासारखे झाले. सुधीरची सर्दी खोकल्यात परिवर्तित झाली होती तर मला गुरुवारी दुपारी अचानक २ पर्यंत ताप चढला. मी लॉक डाऊन सुरु झाल्यापासून घराबाहेरच पडलेली नसल्याने करोनाची शंका सुद्धा माझ्या मनात आली नाही. सुधीरही बँक वा तत्सम कार्यालयांतच…आणि तोही क्वचितच जात होता. एकदाच फक्त तो मोठ्या मार्केटला गेला होता. त्यामुळे त्यालाही हा खोकला हवा बदलामुळे आला असावा असेच वाटले. त्यात आम्ही घरात व बाहेर सगळ्या दक्षता पाळत होतो. त्यामुळे करोनाच्या शक्यतेवर आम्ही फुलीच मारली होती. आमचा मुलगा आदित्य मात्र कोणतीही ‘रिस्क“ घ्यायला तयार नव्हता.

आमच्या घराशेजारीच प्रख्यात हार्ट सर्जन डॉ. अनिल तांबे यांचे हॉस्पिटल आहे.  तो मला तिथे घेऊन गेला. डॉक्टरांनी ७ दिवसांचा कोर्स दिला व त्याने जर बरे वाटले नाही तर करोनाची टेस्ट करावी लागेल असे सांगितले आणि करोनाची टांगती तलवार माझ्या मानेवर लटकायला लागली.

सुधीरचा सगळा भर कमीत कमी औषधे घेणे यावर असतो. शरीरात नैसर्गिकरित्या बरे होण्याची शक्ती असते यावर त्याचा दृढ विश्वास. त्यामुळे त्याने ४ दिवस अंगावर काढले. मात्र प्रचंड व सततच्या खोकल्याने त्याची होणारी अवस्था बघवत नव्हती. अखेर त्यालाही डॉक्टरकडे जाण्यास आम्ही भाग पाडले. त्या अनुभवावरुन एक नक्की की करोनाची भीती असो वा नसो, वयोमानानुसार आपल्या आजाराचा विचार करावा. साठीच्या पुढे आणि वयवर्ष पंधराच्या आत साधा सर्दी – खोकला झाला तरी घरगुती उपचार करत वेळ न काढता डॉक्टरांकडे जाणे हे उचित. आपली रोग प्रतिकार क्षमता चांगली असेल, आणि आपण तातडीने डॉक्टरकडे गेलो तर करोना आपले काही वाकडे करु शकत नाही हा अनुभव त्या काळात करोनाची शिकार झालेल्या अनेकांनी घेतला असेल.

त्यावेळी तर करोनाचे काळेकुट्ट ढग चांगलेच दाटून आलेले होते. सुधीरला डॉक्टरांनी औषध तर दिले. पण त्याला बरे वाटेना. शेवटी २७ तारखेला त्यांनी त्याचे औषध बदलून दिले पण तातडीने करोनाची टेस्ट करायला सांगितली. ठाण्यात कॅडबरी जंक्शनच्या फ्लाय ओव्हरच्या खाली असलेल्या तपासणी केंद्रावर जाऊन त्याने शनिवारी २७ जूनला टेस्ट केली. सोमवारी दुपारी महापालिकेतून फोन आला की सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आली आहे.  मात्र ठाणे महापालिकेचे खरोखर कौतुक करायला हवे इतका चांगला अनुभव आम्हाला आला. घरातच क्वारंटाइन होण्यासारखी स्थिती आहे की नाही ते त्यांनी आदित्यला विचारले. ती स्थिती आहे हे समजल्यावर घरातच क्वारंटाइन करताना काय काय खबरदारी घ्यायची याचे सविस्तर मार्गदर्शन त्यांनी आमच्या आदित्यला केले व तेवढ्यावरच न थांबता सुधीरला महापालिकेने घरपोच एक कफ सिरप दिला तर आदित्यला करोना होऊ नये म्हणून सहा टॅबलेट्‌स दिल्या!

मी तोवर बरी झाले होते. फक्त थोडी सर्दी होती. मात्र सुधीरची टेस्ट पॉझिटीव्ह आल्यावर सोमवारीच मी जाऊन टेस्ट करून आले. माझ्याही टेस्टचा रिपोर्ट बुधवारी पॉझिटीव्ह आला आणि मी दुसर्‍या बेडरुममध्ये क्वारंटाइन झाले. मला काहीच लक्षणे नसल्याने पालिकेतर्फे मला फक्त बिकॉस्युल झेड आणि सी व्हिटामिन च्या गोळ्या खाण्यास सांगण्यात आले .

पालिका तेवढेच करून थांबली नाही त्यांनी सोसायटीच्या दारावर येथे करोना पेशंट आढळल्याचे नमूद करणारा फ्लेक्स तर लावलाच. पण पूर्ण सोसायटीत निर्जंतुकीकरण केले. सोसायटीला एक सॅनीटायझर पंप भेट दिला आणि तेवढ्यावरच न थांबता वारंवार आम्हाला काही हवे आहे का याची चौकशी केली. अगदी ‘मेडिकल वेस्ट“ची योग्य तर्‍हेने विल्हेवाट लावली जाते आहे की नाही याचीही चौकशी केली. आमच्याकडे ‘मेडिकल वेस्ट“ तयारच होत नाहीय असे आदित्यने सांगितल्यावर सुद्धा त्यांनी त्यासाठी एक पिवळ्या रंगाची कचर्‍याची पिशवी देण्याची तयारी दर्शवली. मात्र तेवढ्यात ठाण्यात पूर्ण लॉक डाऊन जारी झाला आणि ते राहिले. त्याची आम्हाला तशीही गरज नव्हतीच.

पोलिसांचेही फोन आले. त्यांनीही चौकशी केली आणि आमच्याकडे करोना रुग्ण आढळल्याने सोसायटीत कुणी त्रास दिला तर त्याची तक्रार करण्याचेही त्यांनी सांगितले.   आम्ही जरी पोलिसांत तक्रार केली नाही तरी आमच्या सोसायटीत काही जणांकडून आम्हाला वाळीत टाकण्यासारखे अनुभव आले. आमच्याकडचा कचरा न उचलणे, आम्ही जेवणाचा डबा लावला, पण त्याला आत न येऊ देणे असे काही प्रकार घडले.

हा विषाणू फक्त आणि फक्त डोळे, नाक व तोंडातून आत जाऊ शकतो. त्यामुळे कचरा न उचलणे, डबेवाल्याला आत न येऊ देणे वा काही सोसायट्यांमध्ये करोनामुक्त झालेल्या  सभासदांनाही लिफ्ट वापरु न देणे वा त्यांना त्यांच्याच घरात विलगीकरण करू न देणे… सुरवातीला अज्ञानातून हे प्रकार सर्वत्र, सर्रास घडत  होते जे सरत्या काळानुसार कमी होत गेले.

यथाअवकाश आम्ही करोना मुक्त होऊन आमचं सामान्य जीवन जगू लागलो. आज तर त्या रोगाच्या फक्त आठवणी मनात उरल्या आहेत. पण त्या काळानं आम्हांला काही चांगले अनुभवही दिले.  अतिशय सुखद अनुभव आम्हाला दिला तो आमच्या लेकानं… आदित्यने! तो या सगळ्या काळात आमची आई झाला होता. त्याने खूप केलं….आम्ही  लवकर बरे झालो याचं श्रेय त्यालाही तितकंच जातं. आपण केलेले संस्कार आणि आपली आपल्या घरच्यांशी, नातलगांशी असणारी वागणूक मुलांच्या मनावर परिणाम करत असते, ज्याचा अनुभव, वेळ आली की येतो, हे ही आदित्यच्या वागणुकीवरुन पुन्हा मनावर ठसलं. काळ्याकुट्ट अनुभवालाही रुपेरी किनार असतेच! फक्त ती बघण्याची दृष्टी आपल्यालाच विकसित करावी लागते!