•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Archives for लेख

    फेब्रुवारी २०२५ – तू सुखकर्ता, तू दु:खहर्ता !

    या वर्षी शनिवार १ फेब्रुवारी रोजी मध्यान्हकाळी आणि प्रदोषकाळी माघ शुक्ल चतुर्थी असल्याने याच दिवशी श्रीगणेश जयंती, विनायक चतुर्थी, तिलकुंद चतुर्थी आणि वरद चतुर्थी आहे. मंगळवार हा गणेश आराधनेचा वार समजला जातो. या वर्षी मंगळवारी श्रीगणेश जयंती आल्याने “अंगारक योग” आलेला आहे.

    श्रीगणेश हा चौदा विद्या, चौसष्ट कलांचा अधिपती आहे. तो गणनायक आहे. आपणही आयुष्यात एक विद्या आणि एका कलेत पारंगत झालो तर आपले जीवन सुखी व आनंदी होईल. नेतृत्व गुण आपल्या अंगी यावयास हवेत. गणपती हा मातृ-पितृभक्त होता. आपण हे गुण जर आपल्या अंगी बाणवले तर ती खरी गणेशपूजा ठरेल.

    गणपतीचे एकूण तीन अवतार मानले गेले आहेत. या तीन अवतारांचे तीन जन्मदिवस आपण साजरे करीत असतो. पहिला अवतार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी “पुष्टिपती विनायक जयंती” म्हणून आपण साजरा करीत असतो. दुसरा अवतार भाद्रपद शुक्ल चतुर्थीला “श्रीगणेश चतुर्थी” म्हणून पार्थिव गणेश पूजन करून आपण साजरा करीत असतो. तिसरा अवतार हा माघ शुक्ल चतुर्थीला “गणेश जयंती” म्हणून आपण साजरा करीत असतो.

    माघ महिन्यातील पूजावयाची मूर्ती ही मातीची किंवा धातूचीही चालते. तसेच भाद्रपद महिन्यातील गणेश चतुर्थीला जशी घरोघरी मातीची गणेश मूर्तीची पूजा केली जाते तशी माघातील गणेश जयंतीला प्रत्येक घरी पूजा केली जात नाही. तशी परंपरा किंवा प्रथाही नाही. गणेश मूर्तीची नेमकी किती दिवस पूजा करून मूर्तीचे विसर्जन करावयाचे तेही कोणत्याही मान्यवर धर्मशास्त्रग्रंथात सांगितलेले नाही. काही ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव साजरे केले जातात. काही कुटुंबात गणेश जयंतीला परंपरेप्रमाणे व्रत केले जाते.

    गणेश जयंतीच्या दिवशी नक्तव्रत आचरून धुंडीराजाचे पूजन करावे आणि तिळसाखरेचे किंवा तिळगुळाचे मोदक अर्पण करावेत असे सांगण्यात आले आहे. दिवसभर उपवास करून सूर्यास्तानंतर आकाशात नक्षत्रतारका दिसू लागल्यावर भोजन करण्याचीही प्रथा आहे. गणेशाने नरांतक राक्षसाचा वध करण्यासाठी कश्यपाच्या कुटुंबात विनायक या नावाने अवतार घेतला म्हणून ही विनायकी चतुर्थी जास्त प्रसिद्ध आहे.

    या चतुर्थीला तिलकुंद चतुर्थी म्हणतात. षोडशोपचारे गणेशपूजन करून तिळमिश्रित गुळाच्या लाडवाचा नैवेद्य अर्पण करतात. कुंदफुलांनी गणेशाची आणि सदाशिवाची पूजा करून रात्री जागरण करतात म्हणून या चतुर्थीला “तिलकुंद चतुर्थी” असेही म्हणतात. या तिथीला स्नान, दान, जप व होम कर्म केल्यास गणेशकृपा राहते अशीही उपासकांची श्रद्धा असते.

    धुंडीविनायक

    गणेशाला धुंडीराज हे नाव कसे पडले याविषयी स्कंदपुराणात एक कथा आहे. दिवोदास नावाचा राजा काशीमध्ये राहून राज्य करीत होता. त्यावेळी सर्व देव काशी नगरी सोडून निघून गेले. परंतु काशी नगरीचा विरह भगवान शंकरांना सहन झाला नाही. भगवान शंकरांनी काशी नगरीतून दिवोदासचे उच्चाटन करण्यासाठी गणेशाला त्याच्या गणांसह काशी नगरीत पाठवले. गणेशाने ज्योतिषी बनून काशी नगरीत प्रवेश केला. त्याने या विद्येमुळे काशी नगरीत लोकप्रियता मिळविली. दिवोदासाच्या राजवाड्यातही गणेशाने ज्योतिषामुळे प्रवेश मिळवला. ज्योतिषी स्वरूपात वावरणार्‍या गणेशाने दिवोदासाला भविष्यही सांगितले. त्यामुळे दिवोदासचे काशी नगरीतून उच्चाटन झाले. मंदार पर्वतावरून शंकराचे काशी नगरीत आगमन झाले. तसेच सर्व देवही काशी नगरीत आले. भगवान शंकर गणेशावर प्रसन्न झाले. त्यांनी गणेशाला “धुंडीराज” हे नाव बहाल केले. त्या वेळेपासून काशी नगरीत धुंडीवनायक प्रसिद्ध झाला. काशी नगरीत धुंडीविनायकाचे प्रसिद्ध मंदिर आहे.

     आधुनिक काळात

    आवाहन, आसन, पाद्य, अर्घ्य, आचमन, स्नान, वस्र, यज्ञोपवीत, गंध, पुष्प, धूप, दीप, नैवेद्य, मंत्रपुष्प, प्रदक्षिणा आणि नमस्कार या सोळा उपचारांनी केलेली पूजा म्हणजे षोडशोपचार पूजा होय. कोणत्याही देवतेची पूजा आपण का करतो? त्या देवतेचे गुण आपल्या अंगी यावेत यासाठी ती देवता आदर्श मानून त्या गुणांची पूजा आपण करीत असतो. गणपती हा चौदा विद्या आणि चौसष्ट कलांचा अधिपती आहे. आपणही आयुष्यात विद्या-कला अवगत केल्या तर आपले जीवन आपण सुखी व आनंदी करू शकतो. गणपतीची उपासना म्हणजे विद्या-कला यांची उपासना! तप म्हणजे मेहनत! भक्ती म्हणजे ही साधना करताना साधावयाची एकाग्रता होय. गणपती हा सुखकर्ता व दु:खहर्ता आहे. आपणही गरीब, दीनदुबळ्या लोकांच्या जीवनातील दु:ख कमी करून सुखी होण्यासाठी त्यांना मदत करायला पाहिजे. गणेश हा गणांचा नायक होता. तो लढवय्या होता, तो चतुर होता. आपणही त्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून तसे बनण्याचा प्रयत्न करायला पाहिजे आहे. मन पवित्र ठेवले तर आपल्या हातून पवित्र कार्य घडण्यास मोठी मदत मिळत असते. गणेशपूजा ही त्यासाठीच करावयाची असते.

    गणपतीने देवान्तक, नरांतक आणि इतर अनेक दुष्ट राक्षसांचा नाश केला. आपल्या अंगीही गणेशाचे गुण अंगी बाणवून आपल्यातील आणि समाजातील अस्वच्छता, अनीती, अनाचार, आळस, अंधश्रद्धा, अनारोग्य इत्यादी राक्षसांचा नाश करावयाचा आहे.

    गणेश हा मातृभक्त होता. भारतीय कुटुंबव्यवस्था ही जगातील एक उत्कृष्ट आहे. भारतीय संस्कृती ही एक आदर्श संस्कृती आहे. आज अनेक देशात भारतीय लोक गेलेले आहेत. तेथे ते आपले सण-उत्सव साजरे करीत असतात. गणेशोत्सव हा तर लोकप्रिय उत्सव आहे. तो खर्‍या अर्थाने जागतिक उत्सव झाला आहे.

    श्रीगणेश आणि शेंदूर

    गणेशाची मूर्ती शेंदूर रंगाची का दिसते त्यासंबंधी एक कथा पुराणात आहे. पूर्वी सिंदुरपूर नगरामध्ये नरांतक राजा राज्य करीत होता. तो अतिशय दुष्ट होता. प्रजेला त्याचा खूप त्रास होई. प्रजा त्याला कंटाळली होती. हे पाहून श्रीगणेशाने सिंदुरपूरवर स्वारी केली. नरांतक आणि श्रीगणेश यांचे तुंबळ युद्ध झाले. गणपतीने आपले धनुष्य घेतले. त्याला तीक्ष्ण बाण जोडला आणि प्रत्यंचा ओढली. तो बाण नरांतकाच्या छातीत घुसला. नरांतक जमिनीवर कोसळला. त्याचे सैन्य घाबरून पळून गेले. श्रीगणेशाला विजय मिळाला. सर्वांनी श्रीगणेशाचे कौतुक केले. गणपतीच्या गणांनी विजयोत्सव साजरा करताना गणपतीच्या अंगाला शेंदूर लावला. अनेक आभूषणे दिली. त्याच्या कपाळावर चंद्र ठेवला. या गणपतीचे सर्वांनी कौतुक केले. पार्वतीने गणपतीला शाबासकी दिली. श्रीगणेशाला सर्व देवांनीही मान दिला. भाद्रपद शुक्ल चतुर्थीला त्याला सिंहासनावर बसविले. देव, गंधर्व आणि ऋषीमुनींनी त्याचा सत्कार केला. ऋषींनी त्याला एकवीस मोदकांचा नैवेद्य दाखविला. देवांनी गणेशाच्या मस्तकावर दूर्वांच्या एकवीस जुड्या वाहिल्या. कुबेराने तर गणेशाच्या मस्तकावर रत्नजडित असा मुकूट चढविला. तेव्हापासून दरवर्षी भाद्रपद शुद्ध चतुर्थीला घरोघरी गणेश मूर्ती आणल्या जाऊ लागल्या. त्याचे पूजन होऊ लागले.

    Read more

    जानेवारी २०२५ – डिजिटल साक्षरता म्हणजे काय, त्याचे महत्त्व आणि शिक्षणातील आव्हाने?

    आपल्या वेगवान, सतत बदलणार्‍या डिजिटल जगात, डिजिटल साक्षरता हे एक अपरिहार्य कौशल्य आहे. यामध्ये केवळ माहिती शोधण्याची आणि त्याचे मूल्यांकन करण्याची क्षमता नाही तर विविध तंत्रज्ञानाचा वापर करून ती तयार करण्याची आणि प्रभावीपणे संप्रेषण करण्याची क्षमता देखील समाविष्ट आहे. डिजिटल साक्षरता म्हणजे केवळ विशिष्ट साधने कशी वापरायची हे जाणून घेणे नव्हे; हे आमच्या तंत्रज्ञान-चलित समाजात अनुकूल आणि माहितीपूर्ण राहण्याबद्दल आहे.

    डिजिटल साक्षरतेचे महत्त्व

    आपल्या वेगाने विकसित होत असलेल्या जगात, डिजिटल साक्षरता एक अपरिहार्य कौशल्य बनले आहे. तंत्रज्ञानाने आपल्या जीवनातील प्रत्येक पैलूमध्ये प्रवेश केला आहे, सामाजिक संवादापासून ते शिक्षणापर्यंत, माहिती अचूकपणे ओळखण्याची आणि प्रमाणित करण्याची क्षमता सर्वोपरि आहे. या डिजिटल युगात, केवळ उपकरणे आणि सॉफ्टवेअर कार्यक्षमतेने वापरणे इतकेच नाही; ते तुमच्या वैयक्तिक डेटाचे संरक्षण आणि

    ऑनलाइन धोक्यांपासून स्वत:चे संरक्षण करण्याबद्दल आहे. तुम्ही वैयक्तिक, शैक्षणिक किंवा व्यावसायिक हेतूंसाठी डिजिटल लँडस्केप नेव्हिगेट करत असलात तरीही, डिजिटल साक्षरता हा तुमचा होकायंत्र आहे, ज्यामुळे तुम्ही या गोंधळलेल्या

    ऑनलाइन क्षेत्रात माहिती, सुरक्षित आणि निपुण राहू शकता. तुमच्या डिजिटल साक्षरतेच्या कौशल्यांचा सन्मान करून डिजिटल गेममध्ये पुढे राहा – आधुनिक जगात यशाची एक महत्त्वाची गुरुकिल्ली.

    १. ऑनलाइन सुरक्षा

    इंटरनेट ही एक विशाल जागा आहे आणि दुर्भावनापूर्ण व्यक्ती किंवा गट सतत संशय नसलेल्या वापरकर्त्यांचे शोषण करण्याचे नवीन मार्ग शोधत असतात. आपण सर्व धोके दूर करू शकत नसलो तरी, एक शक्तिशाली संरक्षण म्हणजे डिजिटल साक्षरता. अत्यावश्यक ज्ञान, जागरूकता आणि व्यावहारिक साधने आत्मसात करून, विद्यार्थी त्यांची गोपनीयता आणि सुरक्षितता ऑनलाइन संरक्षित करण्याची त्यांची क्षमता लक्षणीयरीत्या वाढवू शकतात. ही कौशल्ये ऑनलाइन धोक्यांपासून संरक्षण म्हणून काम करतात, ज्यामुळे व्यक्तींना डिजिटल जगामध्ये आत्मविश्वास आणि लवचिकतेने नेव्हिगेट करण्यात मदत होते.

    २. डिजिटल शैक्षणिक प्रगती

    आजच्या वेगाने विकसित होत असलेल्या शैक्षणिक परिदृश्यात, डिजिटल साक्षरता कौशल्ये केंद्रस्थानी आहेत. गेल्या दशकात ख्-१२ शिक्षणामध्ये तंत्रज्ञानाच्या व्यापक एकीकरणामुळे, संगणक, टॅब्लेट आणि इंटरनेट वापरण्यात प्रवीणता ही मूलभूत गरज बनली आहे. ही कौशल्ये विद्यार्थ्यांना ऑनलाइन लर्निंग

    प्लॅटफॉर्मवर अखंडपणे नेव्हिगेट करण्यासाठी आत्मविश्वास आणि सक्षमता प्रदान करतात. ज्यांच्याकडे ही कौशल्ये नाहीत ते शिक्षणाच्या या डिजिटल युगात संघर्ष करत आहेत. शिवाय, आता बहुतेक प्रमाणित मूल्यांकन ऑनलाइन केले जात असल्याने, तंत्रज्ञानामुळे येऊ शकणार्‍या विचलितांमध्ये लक्ष केंद्रित करण्याची क्षमता विद्यार्थ्यांनी विकसित करणे अत्यावश्यक आहे.

    ३. आजीवन कौशल्य

    अत्यावश्यक जीवन कौशल्ये वाढवण्यात डिजिटल साक्षरता महत्त्वाची भूमिका बजावते. हे व्यक्तींना प्रभावी ऑनलाइन अभिव्यक्ती सक्षम करून आणि डिजिटल प्लॅटफॉर्मद्वारे सहकार्याला प्रोत्साहन देऊन त्यांच्या संवादक्षमता वाढविण्यास सक्षम करते. शिवाय, डिजिटल साक्षरता गंभीर विचार कौशल्ये सुधारण्यात योगदान देते कारण ती व्यक्तींना

    ऑनलाइन माहितीची विश्वासार्हता ओळखण्यासाठी सुसज्ज करते.

    ४.  डिजिटल इक्विटी

    आजच्या डिजिटल युगात डिजिटल इक्विटी ही एक महत्त्वाची समस्या आहे. घरे आणि शैक्षणिक सेटिंग्जमध्ये तंत्रज्ञान वाढत्या प्रमाणात प्रचलित होत असताना, डिजिटल साक्षरता कौशल्यांमध्ये, विशेषत: विद्यार्थी आणि तरुण व्यावसायिकांमध्ये लक्षणीय अंतर आहे. ही तफावत डिजिटल जगात पूर्णपणे सहभागी होण्याच्या आणि करिअरच्या संधींचा लाभ घेण्याच्या त्यांच्या क्षमतेत अडथळा आणू शकते. त्यामुळे, डिजिटल लँडस्केप प्रभावीपणे नेव्हिगेट करण्यासाठी या व्यक्तींना आवश्यक कौशल्ये आणि ज्ञानाने सक्षम करण्यासाठी डिजिटल साक्षरता शिक्षणाला प्राधान्य देणे महत्त्वाचे आहे. शिक्षणाद्वारे डिजिटल डिव्हाईड कमी करून, आम्ही हे सुनिश्चित करू शकतो की प्रत्येकाला, त्यांची पार्श्वभूमी काहीही असो, आमच्या डिजिटल-च-लित समाजात यशस्वी होण्याची वाजवी संधी आहे.

    Read more

    डिसेंबर २०२४ – व्यसन, भावनिक आरोग्य आणि हीलिंग

    प्रथम आपण व्यसन (Addiction) म्हणजे काय ते जाणून घेऊ या. शब्दकोशाप्रमाणे एखाद्या गोष्टीची तीव्र इच्छा होणे म्हणजे व्यसन, ज्याच्यामुळे आपली शारीरिक व मानसिक हानी होते. अलीकडच्या काळापर्यंत व्यसनाचे वर्गीकरण म्हणजे केवळ दारू, जुगार, बेकायदेशीर ड्रग्स इत्यादी म्हणून केले जात होते. जसजसा काळ बदलला आणि गॅझेट्‌स हा प्रत्येकाच्या दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे तसतसे एक नवीन व्यसन समोर आले आहे आणि ते म्हणजे “गॅझेट व्यसन” (Gadget Addiction). गॅझेट्‌स म्हणजे विशेषत: मोबाईलने संपूर्ण जग एका छोट्या बॉक्समध्ये वेढले आहे, जे प्रत्येकजण आपल्याबरोबर कुठेही बाळगू शकतो. सध्या मोबाईलला दुसरा पर्याय नाही आणि त्यामुळेच त्याचा वापर वाढला आहे. हात आणि मणक्याचे आजार यासारख्या आरोग्याच्या धोक्याबरोबर मोबाईलमुळे तुमच्या भावनिक आरोग्यालाही धोका निर्माण होतो. प्रत्येकालाच हे जाणवले असेल आणि प्रत्येक जण हे वाचताना ह्याच्याशी सहमत असाल/ असेल.

    गॅझेट्‌स विशेषत: मोबाईलच्या व्यसनाधीन होण्यापासून तुम्ही स्वत:ला कसे सुरक्षित ठेवू शकता हे मी शेअर करण्यापूर्वी व्यसनाची कारणे काय आहेत हे समजून घेण्यासाठी आपण थोडे खोलात जाऊ या. मानव हा सामाजिक प्राणी आहे आणि भावनिक स्तरावर त्याच्या मूलभूत गरजा म्हणजे प्रेम, काळजी, प्रशंसा, करुणा, दया इत्यादी आहेत. विविध सोशल मीडिया प्लॅटफॉर्म द्वारे फॉलोअर्स, लाइक्स, कमेंट्‌स इत्यादीच्या रूपात ही गरज मोठ्या प्रमाणात गॅझेट्‌स पूर्ण करतात. एकदा का तुम्ही सोशल मीडियावर ते प्राप्त करण्यास सुरुवात केली की ती भावनिक गरज पूर्ण होऊ लागते आणि मनातील पोकळी भरायला सुरुवात होते. गॅझेट्‌सने प्रदान केलेल्या प्रत्येक लाइक्स व कमेंट्‌स मध्ये तुम्ही हळूहळू अडकत जाता आणि तुम्हाला समजण्याआधी गॅझेट तुमच्यावर कब्जा करतात. सतत सोशल मीडियावर आपण ऑनलाइन असण्याची शर्यत सुरू होते, यामुळे तुम्ही आपलं खरं आयुष्य जगण्यापासून दुरावता.

    पहिले लक्षण म्हणजे फोमो (Fear of missing out) यामुळे प्रत्येक क्षणी तिथे ऑनलाईन (online) असण्याची आणि दिसण्याची गरज निर्माण होते. १०० पैकी ९५ लोक याला बळी पडतात आणि सतत ह्या भीती आणि दबावाखाली असतात की आपण काहीतरी मिस आऊट केलंय. आपण जमावापासून दूर होतोय (fear of being left out) ही भीती मानवाच्या मनातील सर्वांत खोल भीती आहे आणि ती नकळत ट्रिगर होते. तुम्ही आजूबाजूला बघाल तेव्हा तुमच्या लक्षात येईल, की अनेक लोक त्यांच्या जीवनातील विविध पैलूमध्ये “मै रह गयी” ह्या वर्तणुकीचे स्वरूप दर्शवीत असतात. सोशल मीडियाचा वापर करताना अजून एक फायदा असा होतो की तुम्ही तुमच्या इच्छेनुसार दुर्लक्ष करु शकता, ब्लॉक करू शकता आणि डिलीट ही करू शकता जे तुम्ही वास्तविक जगामध्ये करू शकत नाही पण “अति तेथे माती” ही म्हण अगदी खरी आहे. ज्याक्षणी
    गॅझेट तुमच्यावर हावी होतो त्याक्षणी ते व्यसन बनते. ज्यामुळे शारीरिक आणि भावनिक गुंतागुंत होण्यास सुरुवात होते.

    यावर मात करण्याची पहिली पायरी म्हणजे तुमच्याऐवजी दुसरे काहीतरी तुमच्या जीवनावर हुकुमत गाजवत आहे हे सत्य स्वीकारणे. एकदा जागरुकता आली की छोटे छोटे बदल आणि सोपे लक्ष्य सेट करून सुरुवात करा. आजच्या काळात गॅझेट न वापरणे हा पर्याय नाही तर आपल्या आयुष्यावर नियंत्रण ठेवणे ही एक निवड आहे. तुम्ही तुमच्या जीवनावर नियंत्रण का निवडू इच्छिता याची यादी करा. काही लोकांसाठी ही यादीच प्रेरणा बनू शकते, गॅझेटचा वापर मर्यादित करण्यासाठी. पण बहुसंख्य लोकांसाठी हे घडणार नाही. अशा परिस्थितीत गॅझेट्‌वर आवश्यक असलेल्या महत्त्वाच्या कामांची यादी करा, जसे की कुटुंब – मित्रांना कॉल करणे, जगातील घडामोडींची महिती, ऑनलाइन व्यवसाय इत्यादि. तुमच्या गरजेनुसार प्राधान्य द्या आणि त्यानुसार वेळेचे नियोजन करताना वास्तववादी होऊन करा म्हणजे तुम्हाला हे वेळेचे नियोजन मोडण्याचा मोह होणार नाही. आता स्वत:बरोबर थोडेसे कठोर (strict) राहून या वेळेच्या नियोजनाचे पालन करा, हे बहुतांशी लोकांकरता काम करेल.

    आता काही मूठभर लोक शिल्लक राहतील ज्याच्यासाठी हे उपयोगी पडणार नाही. अशा लोकांकरता हे गॅझेट व्यसन कोठून येते हे पाहण्याची आणि त्याकडे लक्ष देण्याची गरज येथे आहे, हे विविध उपचार पद्धती वापरून केले जाऊ शकते जसे समुपदेशन, रेकी, प्राणिक हिलिंग, पास्ट लाइफ रिग्रेशन (past life regression), संमोहन थेरपी, थीटा हिलिंग इत्यादि.

    प्रत्येक उपचार पद्धतीची स्वत:ची एक स्वतंत्र उपचार करण्याची पद्धत असते आणि ते उपचार घेणार्‍यांना जे उत्तम आहे तेच देते. कोणत्याही उपचार पद्धतीचा जास्तीत जास्त फायदा मिळवण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे त्या हीलिंगमध्ये विश्वास आणि समर्पण. हीलिंग एक प्रकिया आहे जी तुमच्या आयुष्याला चांगल्या रीतीने कलाटणी देते. उपचार पद्धतीमुळे नवीन संधी चालून येतात, बरे होण्यासाठी जागरुकता निर्माण होते. जी ट्रिगर आणि पोकळी गॅझेट्‌ भरून काढत होती, ती हिल होते.

    या अनोख्या तंत्रज्ञाने भावनिक उपचार प्राप्त करणार्‍यांना त्यांच्या अंतर्मनामध्ये खोलवर जाऊन मूळ कारणं शोधण्यासाठी आणि त्याचे विश्लेषण करण्यास मदत करते. उपचार पद्धतीमुळे दु:ख, पोकळी, एकटेपणा इत्यादीसाठी उत्तरे मिळतात. या उपचारपद्धतीमुळे वरील कारणाचे विविध स्तरांवर हीलिंग होते. जसे ग्रुप कॉन्शिअसनेस, बालपणाचे संस्कार, गर्भातील ट्रॉमा, पूर्वजांचे पॅटर्नस्‌, मागील जीवन (past life) इत्यादि.

    आनंदी आणि परिपूर्ण जीवन जगणे हा तुमचा जन्मसिद्ध हक्क आहे. उपचार पद्धती ही ब्रह्मांडाने तुम्हाला प्रदान केलेली साधने आहेत ज्यामुळे तुम्ही तुमचे जीवन आनंदी बनवू शकता. हीलिंगचा उपयोग करून तुमचे जीवन हिल करा.

    – निलिमा अमित

    Read more

    नोव्हेंबर २०२४ – साड्यांची काळजी घेण्यासाठी काही टिप्स

    • भारी आणि किंमती साड्या, काठा-पदराच्या साड्या नेहमी उलटी घडी घालून सुती कपड्यात गुंडाळून ठेवा. या साड्यांमध्ये डांबर गोळ्या ठेवू नका. त्यामुळे जर काळी पडते. या साड्यांना नेहमी ड्रायक्लिनिंग करा. वेळोवेळी त्यांच्या घड्या बदला.
    • ऑरेगंजा, टिश्यू, चंदेरी या साड्यांना दाबून ठेवू नका त्यामुळे घडीच्या ठिकाणी या साड्या फाटण्याची शक्यता असते. जर साडीवर काही सांडलं, पडलं तर लगेच स्वच्छ करा. पूर्ण साडी धुवू नका. कारण संपूर्ण साडी खराब होण्याची शक्यता असते. साडीवर पातळ कपडा ठेवून मगच अशा साड्यांना इस्त्री करा.
    • जरीच्या साड्यांना एकदा नेसल्यानंतर धुवू नका. या साड्यांना घरातच धुणे योग्य. धुताना पाण्यात थोडसं मीठ घाला व स्ट्राँग डिटर्जंटचा वापर टाळा. धुतल्यानंतर अशा साड्या न पिळता निथळायला ठेवा आणि पाणी निघून गेल्यावर वाळत टाका.
    • नेसलेली साडी काढल्यानंतर लगेच घडी घालून ठेवू नका किंवा धुवायलाही टाकू नका. आधी ती वाळत घाला, जेणेकरून घाम सुकून जाईल.
    • शालू वापरून झाल्यानंतर चांगला सुकू द्या, जेणेकरून घामामुळे तो खराब होणार नाही. शालू काही तासांपुरता तुम्ही वापरला असाल, पण वापरून झाल्यानंतर तो ड्राय-क्लिनिंगला देणं जास्त महत्त्वाचं आहे. ड्राय-क्लिनिंग करून झाल्यानंतर शालू वर्तमानपत्रात गुंडाळून ठेवू नका. शालूच्या घड्या घालताना बटर पेपरचा वापर करा. नेहमी महागड्या साड्या सुती कपड्यात बांधून ठेवा. साडी सुती कपड्यात बांधून ठेवताना त्यात इतर कोणत्याही साड्या ठेवू नका. महागड्या व सिल्कच्या साड्यांवर इस्त्री करताना त्यावर पाणी मारून इस्त्री करणं टाळा. मोती किंवा खड्याची कलाकुसर केलेल्या साड्या घडी करून ठेवताना त्यातला कलाकुसर केलेला भाग आत ठेवा. आणि उलट्या बाजूने घडी करा. यामुळे मोती किंवा खडे दुसर्‍या साड्यांना अडकून निघणार नाहीत.
    • घडी करून ठेवलेल्या साडीची काही महिन्यांनी घडी उसवा असं केल्याने साडीवर सुरकुत्या पडणार नाहीत.
    • सिल्कच्या साड्यांची चमक काही काळानंतर जाते किंवा त्यावर काळसर रंगाची छटा येते, त्यामुळे त्या पॉलिश करून घ्या. घरच्या घरी साडी धूत असाल तर गरम पाण्याचा वापर करू नका.
    • प्रत्येक स्त्रीकडे साड्यांचा भरपूर स्टॉक असतो. पण वेळेअभावी त्यांची देखभाल करणं, काळजी घेणं जमत नाही आणि मग आपल्या आवडत्या साड्या खराब होतात. पण थोडासा वेळ काढलात आणि थोडीशी काळजी घेतलीत तर निश्चितपणे तुमच्या जुन्या साड्या वर्षानुवर्षे नव्यासारख्या राहतील..

    Read more

    ऑक्टोबर २०२४ – ज्येष्ठांचे आयडियल आरोग्य

    ज्याची कालांतराने झीज होत राहते ते म्हणजे शरीर. जगामध्ये कुठलीही गोष्ट असो मग ती सजीव असेल किंवा निर्जीव ह्याची निसर्गनियमाप्रमाणे कालांतराने झीज होतेच.

    आपण आता म्हातारे झालो असे स्वत:च आपण समजू लागलो तर शरीरातसुद्धा त्­याप्रमाणे क्रिया घडू लागतात. वृद्ध लोकांचा आत्मविश्वास सर्वच बाबतीत कमी व्हायला लागलेला दिसतो. त्­यातच आजार झाले म्हणजे तर ते हतबलच होतात. त्­यांच्­यावर एक प्रकारचे मानसिक दडपण येण्यास सुरुवात होते आणि ह्याच सततच्­या दडपणामुळे शरीरसुद्धा आजाराशी दोन हात करू देत नाही आणि त्याची तीव्रता त्­या व­यात जास्त जाणवू लागते.

    म्हातारपण म्हणजे दुसर्‍यांदा बालपण जगणे. आपले वय जसजसं वाढत जाईल तसतसं आपला विचार करण्याचा दर्जा ही वाढतच गेला पाहिजे.

    जिंदगी बडी होनी चाहिए – लंबी नही. समाजात राहणारा प्रत्­येक नागरिक हा कालांतराने वृध्द होणारच असतो. एखाद्या माणसाला त्­याचे व­य विचारले की आपल्­या जन्मतारखेप्रमाणे आपले वय किती आहे ते सांगतो यालाच कालक्रमाला धरून सांगितलेले वय असे म्हणता ­येईल. व्­यवहारामध्ये असे व­य सांगणे योग्­य असले तरी आपले शारीरिक, मानसिक व सामाजिक वय किती आहे ह्याच्­ा प्रत्येक व्­यक्तीने विचार केला पाहिजे. एखादा ५० वर्षांचा माणूस २५-३० वर्षाचा माणसाएवढा दिसतो किंवा अगदी तिशीतला माणूस ५० वर्षाचा माणसाएवढा दिसू लागतो. शरीरातील अवयवांवर आणि पेशींवर कालमानाप्रमाणे झालेला परिणाम ह्याला जैविक व­य किंवा Biological Age असे म्हणतात.

    थोडक्यात काय तर शारीरिक किंवा जैविक वय प्रत्येक व्यक्तीप्रमाणे बदलणारे असते. नियमीत व्यायाम, चौकस व पौष्टिक आहार आणि आदर्श जीवनपद्धती जर आचरणात आणली तर म्हातारपणीसुद्धा बरेचसे वृद्ध फिट राहू शकतात. शारीरिक वयाप्रमाणे मानसिक वयही प्रत्येक व्यक्तीप्रमाणे वेगळे असते. काही मानसिक कारणांमुळे जसे नैराश्य, एकाकीपणा, सतत मानसिक दडपण, आर्थिक विवंचना, कर्जबाजारी होणे, अतिमहत्त्वाकांक्षा किंवा चिडचिडेपणा, निरुद्योगी माणसांमध्ये जास्त काळ राहणे ह्यामुळे एजींग प्रोसेस लवकर होत जाते त्यामुळे मानसिक शांती फार महत्त्वाची आहे.

    शरीराची झीज किंवा विनाश होऊ द्यायचा नसेल तर सर्वात सोपा उपाय म्हणजे शरीराचा सतत वापर करीत राहणे. आपल्या शरीरात जी काही ऊर्जा किंवा शक्ती असते ती काम करत राहिल्यामुळेच टिकून राहते.

    वयोमानानुसार शरीरामध्ये खालीलप्रमाणे काही विशिष्ट बदल दिसून येतात.

    ) शरीरातील चरबी : शरीरातील चरबीचे प्रमाण वयाच्या २० ते ६०व्या वर्षापर्यंत खूप जास्त असते व नंतर ते हळूहळू कमी होऊ लागते.

    ) चयापचय (मेटाबॉलीझम) : वयाच्या पन्नाशीनंतर चयापचय क्रियेचा वेग मंदावू लागतो. जितका आहार आपण पूर्वी घेतो त्यापेक्षा आहाराचे प्रमाण कितीतरी पटीने कमी होते.

    ) रक्तदाब : वय जसजसं वाढत जाते तसतसं रक्तवाहिनीची प्रसरण पावण्याची क्षमता कमी कमी होत जाते. त्याची लवचिकता कमी होते व ते संकुचित होतात व त्यामुळे रक्ताचा दाब वाढतो.

    ) ब्लडशुगर : प्रत्येक व्यक्तीला शरीरातील विशिष्ट ऊर्जा टिकवण्यासाठी साखरेची गरज असते. रक्तातील साखर आवश्यकतेप्रमाणे शरीरातील सर्व भागात पोहचवली जाते परंतु जसे जसे वय वाढते तशीतशी शरीरातील रक्ताची साखर वापरून घेण्याची क्षमता कमी व्हायला लागते त्यामुळे रक्तातील साखरेचे प्रमाण वाढू लागते. शरीरातील स्वादुपिंडाची कार्यशक्ती कमी होते व मधुमेहाची शक्यता निर्माण होते.

    ) सांध्याचे दुखणे : वय झालं की सांधेदुखी होणारच, अशी आपण आपल्या मनाची तयारी करतो. परंतु तरुणपणात काळजी घेतल्यास उतारवयात हा रोग आपल्याला त्रास देऊ शकत नाही. कारण हल्ली उपलब्ध असणार्‍या आधुनिक औषधोपचारामुळे हा आजार अगदी सहजपणे नियंत्रणात आणता येतो. संधिवाताचा जर विचार केला तर पुरुषांच्या  तुलनेत स्त्रियांमध्ये संधिवाताचे प्रमाण अधिक आढळून येतं. शरीरात कॅल्शियमची कमतरता असल्यास भविष्यात स्त्रियांना संधिवात होण्याची शक्यता जास्त असते.

    ज्येष्ठांसाठी काही महत्त्वाच्या टीप :

    १) दिवसा शक्यतो झोपू नये. परंतु रात्री मात्र कमीत कमी ७ ते ८ तास झोप घ्यावी.

    २) दिवसातून थोडे थोडे तीन चार वेळा मोजकेच खावे.

    ३) रात्रीचे जेवण शक्यतो हलके घ्यावे.

    ४) वजनावर नियंत्रण ठेवावे.

    ५) नियमितपणे जमेल तेवढा व्यायाम करणे जसे चालणे, सायकलींग, बागकाम व काही घरची कामे इ.

    ६) तंबाखू, धूम्रपान व मद्यपान पूर्णपणे वर्ज्य करावे.

    ७) थंड पदार्थ शक्यतो टाळावेत.

    ८) औषधे घेण्याची जरूरी असेल तरच ती घ्यावीत आणि ती सुद्धा वैद्यकीय सल्ल्यानेच घ्यावी. स्वत:च्या मनाने सेवन करू नयेत.

    ९) वार्धक्यामध्ये वात दोषाचे प्रमाण वाढलेले असते त्यामुळे वातुळ पदार्थ किंवा कडधान्याचा वापर जास्त करू नये.

    १०) रोज किमान १ ग्लासभर दूध तरी प्यावे.

    साधी साधी तत्त्वे जर आचरणात आणली तर आयुष्यमानाचा नाही तर जीवनमानाचा दर्जासुद्धा सुधारतो.

    समर्थ रामदाससुद्धा म्हणतात,

    ओषध न घे व्यथा पथ्य न पाळे सर्वथा

    न मिळे आली या व्यधा तोचि एक मूर्ख

    Read more

    सप्टेंबर २०२४ – फळं आणि भाज्यांचे महत्त्व

    आपला रोजचा आहार हा फळं आणि भाज्याने भरपूर असायला हवा. त्याचं मुख्य कारण हे – की त्यांच्यातील रेषेमय पदार्थ आपल्या आतड्यांची हालचाल होण्यासाठी उपयोगी पडतात.

    ) फळं खाण्याबद्दलचे नियम:-

    सामान्यत: फळं ही रिकाम्या पोटी खावीत. त्याचं कारण असं की, आपण जेव्हा सकाळी उठतो तेव्हा आपल्या पोटामध्ये येणार्‍या अन्नाच्या स्वागतासाठी पाचक रस हे तयार झालेले असतात. आणि हे पाचक रस, पित्त स्वरूपामध्ये असतात त्यामुळे त्यांना शमन करण्यासाठी किंवा त्यांना पचन करण्यासाठी सुरुवातीला थोडंसं पित्तशामक असं अन्न जर घेतलं तर दिवसभर आपल्या शरीरामध्ये हे पित्त आपलं कार्य नीट करत राहतं.

    आपण खाल्लेले फळांचे तुकडे  अशा रसामध्ये परिवर्तित केले जातात. आता हा रस बनत असताना पोटाची थोडीशी जी हालचाल होते त्याचा परिणाम आपल्या पोटामागे असलेल्या आपल्या मोठ्या आतड्यावर होतो. आणि त्याच्यामुळे आपल्याला शौचास होण्याससुद्धा मदत होते.

    ) फळांचा अतिरेक झाला की काय होतं

    कुठल्याही गोष्टीचा अतिरेक टाळावा. आपण कधीतरी नुसती फळं खातो. की खरंच आपल्याला दुपारी जेवण खूप जड झालंय आणि आपल्याला संध्याकाळी काही खायचं नाहीये. अशावेळी आपण विचार करतो की आपण फक्त फळं खाऊ अशावेळी नुसती फळं खाल्ली तरी चालेल. पण नुसतीच फळ खाणं आणि बाकी काही न खाणं याच्यामुळे आपल्याला सकस आहार किंवा पौष्टिक आहार मिळत नाही. कारण फळांमध्ये जरी चांगले रस आणि आपल्याला पाहिजे ती विटामिन्स छोट्या प्रमाणामध्ये असली, तरी प्रोटीन्स किंवा प्रथिनं ही त्याच्यामध्ये नसतात. त्याच्यामुळे त्याच्या जोडीला तुम्ही थोडे अक्रोड, बदाम, किंवा एखादा उकडलेलं अंडं, शेंगदाणे, चणे असं खाल्लं तर खूप चांगलं.

    फळांमध्ये पपई, अननस ही दोन्ही फळं उष्ण असतात. त्यामुळे ती उष्ण काळात टाळावीत.

    आता कुठल्या ऋतूमध्ये काय खायचं?

    ज्या ऋतूंमध्ये ज्या भाज्या होतात त्या ऋतूमध्ये त्या भाज्या खाव्यात. हल्ली आपल्याकडे खूप चंगळ असल्यामुळे प्रत्येक ऋतूमध्ये आपल्याला सगळ्या भाज्या मिळतात. पण एक छोटासा आपण विचार केला तर चातुर्मासामध्ये आपण काही भाज्या वर्ज्य ठेवतो. त्या तशा खाल्ल्या नाहीत तर आपल्या शरीरामध्ये वातपित्त कफाचं संतुलन राहतं आणि नाही तर पित्त वाढणं किंवा वात वाढणं हे त्रास आपल्याला होऊ शकतात. ज्या भाज्यांमध्ये पाण्याचं प्रमाण जास्त आहे जसे दुधी, शिराळी, घोसाळी, पडवळ, काकडी या सगळ्या भाज्या रात्री खाल्ल्याने आपलं पोट हलकं राहतं. आणि इतर भाज्या आपण सकाळी खाऊ शकतो. त्यामुळे ऋतूप्रमाणे मिळणार्‍या भाज्या जर आपण खाल्ल्या तर हे खूप चांगलं. म्हणजे आपण पावसाळ्यामध्ये पालेभाज्या टाळाव्यात, कारण पावसाळ्यामध्ये या पालेभाज्यांच्या वर अनेक किडे त्यांची अंडी घालतात आणि ती इतकी छोटी असतात ती आपल्याला ती डोळ्यांनी दिसू शकत नाहीत. त्यामुळे दिसायला जरी ती भाजी चांगली आणि ताजी दिसली तरीसुद्धा त्याच्यावर किड्याने घातलेली अंडी असू शकतात. म्हणून पालेभाजी ही पावसाळ्यामध्ये टाळलेली चांगली.

    अशा पद्धतीनेच आपल्याला काही भाज्या- पालेभाज्या अशा असतात की ज्या पावसाळ्यामध्ये खाव्या. अशा भाज्या जर तुमच्या आजूबाजूला मिळत असतील तर त्या अवश्य आणाव्यात. फळंसुद्धा त्या त्या ऋतूमध्ये मिळणारी खाल्ली तर त्या फळांचा आपल्याला खूप उपयोग होतो. आणि त्याच्यातील रेषा ह्या आपल्या आतड्यांची क्रिया आणि आतड्यांची हालचाल चांगली ठेवण्यासाठी उपयोगी पडतात. आतड्यांच्या हालचालीबद्दल थोडंसं परत सांगते – हल्ली लोकं खूप उशिरा जेवतात. जर आपण दहा वाजता जेवलो आणि नंतर थोडं शतपावली किंवा घरातल्या घरात हालचाल करून झोपलो नाही, तर सकाळी सहा वाजता उठल्याबरोबर आपलं पोट साफ होईल म्हणजेच आपल्याला शौचाला होईल, ही अपेक्षा ठेवणंच चुकीचं आहे. पण ही अपेक्षा लोकांची असल्यामुळे आणि मग पोट साफ झालं नाही म्हणून त्यांना वाटतं की, आपल्याला
    कॉन्स्टिपेशन आहे आणि म्हणून मग रेचक औषधं अतिप्रमाणामध्ये घेतली जातात हे चुकीचं आहे.

    आपलं अन्न पचायला आणि ते पचून आतड्यांमध्ये पुढे जाऊन मोठ्या आतड्यामध्ये येऊन ते शौच रूपामध्ये आपल्याला त्याची संवेदना व्हायला किमान आठ तास तरी आपण द्यायला पाहिजेत. त्याचबरोबर जर आपण दहा वाजता जेवण जेवलो, आणि त्याच्या अगोदरचेसुद्धा जेवण आपण आपल्याला पचेल ह्याच्यापेक्षा जास्त प्रमाणात जर घेतलेलं असतील तर ती सगळाच भार आपल्या पचनशक्तीवरती येतो.

    म्हणूनच जरी आपल्याला आज- उदाहरणार्थ कलिंगडं – टरबूज ही फळ थंडीमध्येही मिळत असली तरीसुद्धा आपण सारासार विचार करून ही फळ उन्हाळ्यात खाण्याची फळं आहेत, त्यामुळे ती आपण थंडीमध्ये टाळायला पाहिजे, असा विचार करून, आपण आपलं पूर्ण दिवसाच्या डायटचा एक प्लॅन तयार करावा. त्या डायट प्लॅनमध्ये प्रमाणबद्ध जेवण आणि ते जेवण पचेल याच्यासाठी प्रमाणबद्ध व्यायाम हे करणं अतिशय आवश्यक आहे.

    जाता जाता आहाराबद्दलच बोलत असल्यामुळे थोडं आणखी- आपण फळभाज्यांबद्दल बोललो, पण आयुर्वेदाप्रमाणे आपल्या जीवनात मांसाहारसुद्धा असणं आवश्यक आहे. आयुर्वेदाने सांगितले की तुम्ही हित आहार घ्या, मित आहार घ्या, आणि शाकाहारी व्हा. म्हणजे नुसतंच शाकाहारी खाल्ल्याने तुमच्या शरीरामध्ये हवी असलेली तत्त्वं तुम्हाला मिळत नाहीत.

     याचा नीट विचार करा, कारण आयुर्वेद हा आपला धर्मग्रंथ नव्हे. आयुर्वेद हा आपल्याला आपलं आयुष्य कसं चांगलं आपण घालवावं याच्याबद्दल पूर्ण मार्गदर्शन करणारा असा एक वेद आहे म्हणजे सत्य असं एक ज्ञान आहे.

    – डॉ. नियती चितलिया- बढे

    Read more

    ऑगस्ट २०२४ – विचार की अतिविचार

    तुमच्या बाबतीत असं कधी झालंय का? एखाद्या मित्र/मैत्रिणीचा मेसेज आला आहे आणि तुम्ही त्यावर भरपूर विचार करून त्याचा वेगळाच अर्थ काढला. प्रत्यक्षात मात्र जेव्हा त्या मित्र/मैत्रिणीशी बोलणं झालं तेव्हा ते तुम्हाला म्हणाले की, “अरे ते लिहून पाठवलं होतं तेवढेच मला म्हणायचं होतं. त्यामागे वेगळा काहीही विचार नव्हता.” आणि आपल्या लक्षात येतं हे आपण उगाचच बराच वेळ फालतू विचार करण्यात घालवलेला आहे.

    विचार असं जेव्हा आपण म्हणतो ना तेव्हा त्यातून दोनच गोष्टी समोर येतात एक म्हणजे विचार करणे आणि दुसरी म्हणजे अति विचार करणे.

    एखादा निर्णय घेताना माणूस जितका जास्त वेळ विचार करण्यात घालवतो ना तितका जास्त वेळ तो स्वत:च्या मनाला त्या निर्णयाबद्दल नकारात्मक विचार करण्यासाठी भरीला घालत असतो.

    नकारात्मक विचार किंवा अतिविचार हे फक्त आणि फक्त नुकसानच करतात.

    पण मग हे अतिविचार म्हणजे काय? हे सगळं नेमकं सुरू कुठून होतं?

    त्यामुळे मनावर आणि शरीरावर काय परिणाम होतात? आणि ते करणे थांबवायचं कसं? ह्या सगळ्या गोष्टींवर मला उत्तरं मिळाली ती समुपदेशक गौरी हर्षल कुलकर्णी (फोन नंबर ९७३०९६१०१४) यांच्या “अतिविचारांबद्दल असलेल्या “ऑनलाईन कार्यशाळे” मध्ये.

    त्यातल्याच काही गोष्टी मी आता तुमच्यासोबत शेअर करणार आहे.

    सगळ्यात आधी आपण जाणून घेऊ – अतिविचार/ overthinking म्हणजे काय?

    अति विचार म्हणजे नकारात्मक विचारांची एक अशी साखळी जी सतत भूतकाळात घडून गेलेल्या घटनांभोवती फिरत असते. ही साखळी आपल्याला त्याच त्याच घटनांमध्ये इतकं अडकवून ठेवते की आपण भविष्यकाळात येऊ घातलेल्या गोष्टींबद्दल सुद्धा नकारात्मक अति विचार करू लागतो.

    सध्याच्या काळात “अतिविचार करणे” ही एक गंभीर समस्या बनली आहे.

    अतिविचार करण्याने काय होतं?

    १. घडून गेलेली घटना, प्रसंग याबद्दल विचार करणे थांबवता येत नाही. आणि तसं करता न आल्याने ती व्यक्ती प्रत्यक्ष कृती करत नाही.

    २. त्याच त्याच घटनांमध्ये अडकून पडल्याने नकारात्मक विचार करण्यामध्ये वाढ होते.

    अति विचार करण्यामुळे होणारे परिणाम

    १. सतत चिंता करणे

    २. डिप्रेशन / नैराश्य येते

    ३. भीती

    ४. ताण

    ५. थकवा

    ६. निर्णय अक्षमता

    ७. एकटेपणा

    ८. व्यसनाधीनता

    ९. निद्रानाश

    १०. आत्महत्येचे विचार मनात येणे.

    अति विचार करण्याची कारणे

    १.   अतिसंवेदनशीलता

    २.   आत्मविश्वासाचा अभाव

    ३. स्वत:बद्दल योग्य भूमिका नसणे.

    ४.   भ्रामक कल्पना

    ५.   अतिकाम ओढवून घेणे

    ६. नकारात्मक स्व संवाद (निगेटिव्ह सेल्फ टॉक)

    अति विचार  करण्याने निद्रानाश आणि थकवा ह्या व्यतिरिक्त इतरही दुष्परिणाम शरीरावर होतात ते खालीलप्रमाणे

    १. अतिविचार केल्याने मेंदूवर सतत ताण येतो. आणि त्यामुळे चिंता विकृती (anxiety disorder) आणि मूड खराब होऊ शकतो.

    २. पचन संस्थेवर परिणाम होतो.

    ३. हृदयावर ताण येतो.

    ४. प्रतिकारशक्तीवरही परिणाम होतो.

    लहानपणी मनावर झालेले आघात

    बर्‍याचदा अतिविचार करण्याचे मूळ हे लहानपणी घडलेल्या एखाद्या प्रसंगांमध्ये सुद्धा दडलेले असू शकते. लहानपणी अपयश आल्यानंतर किंवा इतर कुठल्याही मार्गाने जर कोणी मानसिक खच्चीकरण करणारे शब्द उच्चारले असतील तर त्याचा मनावर होणारा आघात हा दूरगामी परिणाम निर्माण करतो.

    उदा. द्यायचे झाले तर….शाळेत एखाद्या शिक्षकांनी तुला जमणार नाही तू ढ आहेस अशा पद्धतीची वाक्य विद्यार्थ्यांसंदर्भात वापरणे किंवा ही अशी वाक्य पालकांकडून वापरली जाणे.

    अतिविचार थांबवण्यासाठी उपाय

    १. स्टॉप अँड पॉज मेथड

    अतिविचारांची साखळी सुरू झाली आहे असे लक्षात येताच स्वत:ला ऐकू येईल अशा पद्धतीने स्टॉप म्हणणे आणि नंतर मनाला दुसरीकडे वळवणे. Pause घेऊन त्या नकारात्मक विचारांना सकारात्मक विचारांनी बदलणे.

    २. नकारात्मक विचार सुरू होण्यासाठी कारणीभूत गोष्टी (ट्रीगर) निरीक्षणातून ओळखणे. त्यासाठी एका वहीत नोंद करणे.

    ३. स्वत:च्या भावना जाणून घेणे आणि त्या स्वीकारणे.

    ४. स्वत:शी बोलताना जाणीवपूर्वक सकारात्मक बोलण्याचा प्रयत्न करणे.

    ५. मेडीटेशनचा सराव करणे.

    ६. निसर्गाच्या, पशु-पक्ष्यांच्या सान्निध्यात वेळ घालवणे.

    ७. सोशल मीडियाच्या वापरावर नियंत्रण ठेवणे.

    ८. मनाला प्रसन्न करणार्‍या गोष्टी करणे.

    ९. छंद जोपासणे. पुस्तक वाचन, संगीत ऐकणे वगैरे

    १०. योग्य आहार आणि जीवनशैली स्वीकारणे.

    आणि सगळ्यात महत्त्वाचे जर हे सगळे जमत नसेल तर योग्य वेळी योग्य तज्ञांची मदत घेणं.

    – कल्याणी मोडक

    Read more

    जुलै २०२४ – आर्थिक मंदी – फसवी का खरी

    आर्थिक मंदी म्हणजेच अर्थव्यवस्थेच्या विविध क्षेत्रांमध्ये आलेली लक्षणीय घट ज्यामुळे देशाच्या सकल देशांतर्गत उत्पादनामध्ये (GDP) घट होते. सर्वसाधारणपणे जर अशी घट सलग दोन किंवा अधिक तिमाही कालावधीमध्ये दिसून आली तर ती आर्थिक मंदीची चिन्हे समजली जातात. वित्तसंस्था, कारखाने, सेवा क्षेत्रे, पर्यटन, निर्यात, कृषी अशा अर्थव्यवस्थेमधील विविध महत्त्वाच्या घटकांमध्ये मागणीअभावी मोठ्या प्रमाणात उदासीनता दिसून येते.

    आर्थिक मंदीचे परिणाम एखाद्या साखळीसारखे असतात. एका घटकाचा परिणाम दुसर्‍या घटकावर होतो आणि दुसर्‍याचा तिसर्‍या घटकावर. जर तुम्ही सध्याची विकसित देशातील परिस्थिती बघितलीत तर लगेच समजून येईल की उत्पादनाच्या म्हणजेच पुरवठ्याच्या तुलनेत जास्त असलेली मागणी हे त्या देशातील प्रचंड वाढलेल्या महागाई दरामागील मुख्य कारण आहे. मागणी आणि पुरवठा हे महागाईचे दोन मुख्य घटक. या दोन घटकांमध्ये जर योग्य संतुलन साधले गेले तर महागाई आपोआप नियंत्रित राहते

    सध्या जगातील विकसित आणि बलाढ्य अर्थव्यवस्था जसे अमेरिका, युरोपियन महासंघ, इंग्लंड, कॅनडा इ. खूप प्रचंड प्रमाणात वाढलेल्या महागाई दरास सामोरे जात आहेत. हा महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी दोन उपाय सर्वसाधारणपणे उपलब्ध असतात. मागणी कमी करणे आणि पुरवठा वाढवणे. पुरवठा संवर्धनामध्ये सरकारी धोरणांची महत्त्वपूर्ण भूमिका असते आणि हे तुलनेने वेळखाऊ काम आहे. मागणी नियंत्रण साधारणत: मध्यवर्ती बँकेच्या अखत्यारीत येते आणि व्याज दरातील बदलांमधून हे साधता येते आणि याचे परिणाम जलद गतीने दिसून येतात. सध्या या सर्व देशातील मध्यवर्ती बँका हा वाढता महागाई दर आटोक्यात आणण्यासाठी जलद परिणाम करणार्‍या उपायाचा उपयोग करत आहेत ते म्हणजे व्याज दर वाढ.

    सध्या विकसित देशांमधील वाढलेले व्याज दर हे ह्या त्या देशांमधील मागणी कमी होण्यास कारणीभूत होत आहेत. जगातील बाकी विकसनशील आणि अविकसित अर्थव्यवस्था ह्या बर्‍याच प्रमाणात ह्या मोठ्या देशांमधून येणार्‍या मागणीवर अवलंबून असतात कारण अशा देशांतील असलेल्या देशांतर्गत मागणीवरील मर्यादा, अविकसित अर्थ बाजार इ.

    आता वरील नमूद केलेल्या विश्लेषणाच्या पार्श्वभूमीवर भारताचा विचार केला तर काही गोष्टी सहज लक्षात येतील. आपल्याकडे खूप मोठ्या प्रमाणात असलेली देशांतर्गत मागणी. आपली प्रचंड लोकसंख्या अशावेळी आपले एक बलस्थान होते. म्हणजे आपल्या उत्पादनांसाठी जागतिक मागणी कमी झाली तरी आपली प्रचंड देशांतर्गत मागणी ही पोकळी मोठ्या प्रमाणावर भरून काढेल. आणि जर पुरवठ्याची बाजू बघायची तर अनेक सरकारी योजना जसे की, काही क्षेत्रांसाठी करमुक्त मुदत (Tax Holidays), उत्पादन संलग्न बक्षिसी (Production Linked Incentive) इ. गोष्टी पुरवठा मजबूत करण्यास मदत करतात.

    रिझर्व्ह बँकेच्या कडक नियंत्रणामध्ये असलेल्या आणि जागतिक दर्जाच्या सेवा देणार्‍या बलवान देशांतर्गत पतसंस्था हे आपले अजून एक वैशिष्ट्य जे आपल्याला जागतिक अर्थकारणामध्ये होणार्‍या बदलांपासून एक संरक्षक कवच देते. त्याचप्रमाणे भारतातील सेवा क्षेत्र, आयटी आणि बिझनेस प्रोसेस आउटसोर्सिंग (बीपीओ) यांची जागतिक उपस्थिती लक्षणीय आहे. या क्षेत्रांना तात्पुरते अडथळे येऊ शकतात, परंतु आउटसोर्सिंग सेवांची मागणी स्थिर राहू शकते कारण सर्व कंपन्या कठीण आर्थिक काळात किफायतशीर उपाय शोधतात. भारत जागतिक अर्थव्यवस्थेचा एक भाग असताना, इतर देशांच्या तुलनेत त्याची एकात्मता काहीशी कमी आहे. हे जागतिक आर्थिक धक्क्यांच्या तात्काळ प्रभावापासून काही प्रमाणात संरक्षण करू शकते.

    आपण आधी पाहिलेल्या अर्थव्यवस्थेमधील सर्व महत्त्वाच्या घटकांचा जर भारतीय दृष्टिकोनातून विचार केला तर एक अंदाज बांधता येऊ शकेल की जागतिक मंदीचा भारतावरील प्रभाव हा नक्कीच मोठ्या प्रमाणात नसेल. हे जरी खरे असले तरी जागतिक मंदीचा आणि होणार्‍या परिणामांचा अंदाज बांधणे हे खूपच क्लिष्ट आहे आणि विवध भू-राजकीय आणि बाह्य घटकांवर अवलंबून आहे. अर्थात मध्यवर्ती बँक आणि सरकार हे सुद्धा मंदीचे परिणाम कमी करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करतातच.

    आता या सर्व वैयक्तिक नियंत्रणापलीकडे असलेल्या गोष्टींचा ताण आपण किती घ्यायचा हे प्रत्येकाने स्वत: ठरवले पाहिजे. मंदी म्हणजे १०/१५ दिवसांत लगेच येणारी गोष्ट नाही. आणि मंदीची चिन्हे दिसताच देशातील सर्व यंत्रणा मंदीचे परिणाम कमी करण्यासाठी योग्य ती पावले उचलत असतात. त्यामुळे योग्य वैयक्तिक आर्थिक नियोजनातून आणि उत्पन्नाच्या स्तोत्रांच्या विविधीकरणातून आपणसुद्धा आपल्या जीवनात एक संरक्षक कवच तयार करू शकतो जे आपल्याला मंदी सारख्या परिस्थितीमध्ये सुद्धा मार्ग काढण्यास पूरक ठरतील.

    Read more

    जुन २०२४ – मधुमेह आणि आपण

    दिवसेंदिवस मधुमेहींची संख्या वाढत चालल्याचं आपण ऐकतो आहोत. आपला देश मधुमेहाची राजधानी होतेय हेही आपल्याला चांगलंच ठाऊक आहे. पण याचा नेमका अर्थ काय लावायचा हे कधी कधी आपल्याला कळत नाही. आज आपण याच विचाराचा मागोवा घेणार आहोत.

    यातला पहिला प्रश्न म्हणजे आपलं असं काय चुकलंय म्हणून आपल्यापैकी अनेकांची शुगर वाढायला लागली आहे? याचं  उत्तर तितकंसं कठीण नाही. संपूर्ण आशिया खंडाच्या बाबतीत एक गोष्ट निश्चित आहे. आपणही आशिया खंडाचा भाग असल्यानं आपल्याला हा नियम लागू होतो.

    तुम्ही आम्ही जन्मलो तेच शेतकर्‍याचे जीन्स घेऊन.  सगळं काही शेतीवर अवलंबून होतं. शेतकर्‍याचं उत्पन्न म्हणजे शेतमाल. कुटुंबाची उपजीविका करताना आपली मारामार व्हायची सगळंच तुटपुंजं साहजिकच कमी अन्नात गुजराण करावी लागायची. याला उत्तर म्हणून आपल्या जीन्सना स्वत:त तसे बदल करावे लागले. गेल्या काही दशकांमध्ये यांत्रिक शेती आणि त्या क्षेत्रातली एकंदर प्रगती यामुळं अन्नाची उपलब्धता वाढली. आपण प्रमाणाबाहेर खाऊ लागलो. त्याचा परिणाम म्हणून मधुमेह वाढला. अचानक खूप लोकांना हा त्रास व्हायला लागला.

    ही प्रगती खूप जलद होती. जीन्स बदलायला जो वेळ लागतो तो न मिळताच अन्नाची उपलब्धता आणि त्यावर मारलेला ताव याने आपली शरीराच्या आतली रासायनिक घडी बिघडली. मधुमेह, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल अशा लांब पल्ल्याच्या आजारांनी आपण त्रस्त व्हायला सुरुवात झाली. नुसतंच इतकं असलं असतं तरीही ठीक होतं. आपण घरचं सोडून परदेशी जीवनशैलीला जवळ केलं. तेही आपला घात करून गेलं. अचानक गेल्या काही दशकांमध्ये मधुमेह होणार्‍यांच्या संख्येत विलक्षण वाढ झाली.

    तरीही मुबलक अन्न मिळणारी पहिली पिढी तशी नशीबवान म्हणायला हवी. त्यांना मधुमेह झाला पण उतार वयात.  पण पुढच्या पिढीत मधुमेहासाठी पोषक जीन्सदेखील उतरले. अन्नाची उपलब्धता होतीच. व्यायामाला फाटा देणारी, व्यायामाची गरजच नाहीशी करणारी वाहनं आणि इतर यंत्रं लोकांना परवडू लागली. लोक ती मोठ्या प्रमाणात वापरू लागले. परिणाम असा झाला की शरीराची गरज आणखी कमी होत असताना खाणं मात्र बेसुमार व्हायला लागलेली पुढची पिढी अधिक कमी वयात जीवनशैलीच्या आजारांना बळी पडू लागली. जग बदललं. जास्त गुंतागुंतीचं बनलं. तणाव वाढले. त्या तणावांचा सामना करायला आवश्यक असलेली मोठी कुटुंबं संपली. व्यसनाधीनता वाढली. सगळं एकत्र येऊन त्याचा जो स्फोटक परिणाम अपेक्षित होता तो झाला. आता आपल्याला कमी वयात रक्तदाब, मधुमेह, कोलेस्ट्राल, हृदयरोग आपल्या बोकांडी बसले. आज जी तरुण मंडळी कमी वयात हृदयरोगाला बळी पडताहेत, स्रियांना गरोदरपणात मधुमेह होतोय, मोठ्या प्रमाणात पाय कापले जाताहेत. मूत्रपिंडं निकामी होताहेत, यकृतात चरबी साठल्यानं फॅटी लिव्हरसारखे प्रश्न निर्माण होताहेत, हे काही अचानक घडलेलं नाही. गेल्या काही दशकातल्या आपल्या चुकांचा तो परिणाम आहे.

    मूळ प्रश्न आहे तो आपण यातून काही शिकतो आहोत का?

    दुर्दैवानं याचं उत्तर नाही असंच द्यावं लागेल. आपण आजही आजारी पडू तेव्हा बघू, तेव्हा डॉक्टरांना दाखवू हाच विचार बाळगून आहोत. मधुमेहाची प्रत्यक्ष लक्षणं दिसतील तेव्हाच रक्त तपासून घेतोय. या आजारात दुखत नाही खुपत नाही म्हणून डॉक्टरांनी एकदा चिट्ठी लिहून दिली की त्याच चिठ्ठीवर कित्येक वर्षं औषध घेत राहतो. मनाला वाटेल तेव्हा औषधं बंद करतो. कुठल्याही बाबा, भगताचं ऐकतो. गूगल,
    वॉट्‌सअॅप वर फिरणार्‍या संदेशांना आपलंसं करतो. कोणी काहीही सांगितलं तर त्यावर पूर्ण विश्वास ठेवतो. पाय, मूत्रपिंड, कोलेस्ट्रॉल, डोळे, रक्तदाब तपासून घेत नाही. खाण्यापिण्याचे, व्यायामाचे नियम पाळत नाही. प्रत्येक गोष्ट औषधांनी केली पाहिजे यावर विसंबून राहतो.

    आज आपल्याला हे नक्कीच बदलावं लागेल. ती काळाची गरज आहे. आजारी पडल्यानंतर डॉक्टरांचा उंबरा झिजवण्यापेक्षा आजारी पडू नये यासाठी काहीतरी केलं पाहिजे. साहजिकच प्रश्न येईल की नेमकं काय करायचं?

    पहिली गोष्ट अर्थातच पुढच्या पिढीला हे जीवनशैलीचे आजार होऊ नयेत याबद्दल आग्रही असलं पाहिजे. सुदैवानं हे आजार काही दोनचार दिवसात होत नाहीत. म्हणजेच आपल्याला भरपूर वेळ मिळतो. उदाहरणार्थ, प्रत्यक्षात मधुमेह होण्याच्या किमान दहा बारा वर्षं आधी त्या पोषक असं वातावरण शरीरात तयार होत असतं. याचा अर्थ आपल्या हातात दहा बारा वर्षं असतात. हृदयरोगाचा प्रत्यक्ष झटका येण्याच्या काही वर्षं अगोदर कोलेस्ट्रॉल वाढत असतं, हृदयाच्या रक्तवाहिन्या ब्लॉक व्हायला लागलेल्या असतात. एकंदरीत या सर्व आजारांमध्ये ते आजार होऊ नयेत म्हणून प्रयत्न करायला भरपूर वाव असतो. त्या वेळेचा पुरेपूर उपयोग करणं आपल्याला शक्य असतं.

    अर्थात प्रथम आपल्याला काहीच होणार नाही हा विचार बाजूला ठेवून ही कास धरायला हवी. हे आजार चिकटले की, आयुष्यभर साथ सोडत नाहीत याची जाणीव धरून कमी वयातच जीवनशैली बदलायला सुरुवात करायला हवी. आईवडिलांपैकी एकाला मधुमेह असल्यास विशी पंचविशीत आणि दोघांनाही असल्यास पंधरा वीस वर्षांचे असतानाच सुरुवात करायला हवी. कारण सध्या पस्तीस चाळिशीत मधुमेह झालेल्यांची संख्या खूप जास्त आहे. तेव्हापासून खाण्यापिण्याच्या सवयी बदलता येतील. व्यायामाच्या संधी शोधून त्या प्रयत्नपूर्वक उपलब्ध करायला हव्यात.

    एका गोष्टीचा प्रचंड उपयोग होऊ शकतो. वैद्यकीय वंशावळ हा माझा आवडीचा विषय. कारण जीन्समध्ये काही दोष असला तर त्याचा सुगावा खूप लवकर लागण्याची शक्यता या एका गोष्टीने वाढते. याला खर्च देखील नसतो. तुम्ही तुमच्या फॅमिली डॉक्टरांशी बोलतात की झालं.

    ती शक्यता वाटलीच तर उद्याची वाट ना पाहता आजच जीवनशैलीतल्या बदलांना सुरुवात करता येईल सवयी सुधारणं सहज शक्य आहे. पार्ट्या कमी करून घरचं खाणं, त्यातही भाज्या, फळं, कच्च्या पदार्थांपासून बनवलेली सॅलड, सुका मेवा, पालेभाज्या अशांवर भर द्यावा. थंड पेयं, ड्रिंक्स, गोड पदार्थ कमीत कमी करता येतील. तळलेले तुपकट पदार्थ टाळता येतील.

    व्यायाम करायला जिममध्येच जायला हवं असं नाही. चालणं फुकट असतं. दिवसातून त्यासाठी नियमित वेळ काढता येईल. रिक्षासाठी धावपळ करण्यात जो वेळ त्या वेळेत चालत घर गाठणं सहज शक्य आहे हे लक्षात ठेवायला हवं. वाईट सवयी सांभाळण्यासाठी खर्च येतो. त्या करून आणखी औषधांचा खर्च वाढवण्यात काय अर्थ असतो?

    इतकं करूनही असले आजार वाट्याला आलेच तर वेळीच उपचार करून, नियमित डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्या आजारांचा आपल्या आयुष्यावर दूरगामी परिणाम होणार नाहीत याची काळजी घेता येईल.

    – सतीश नाईक

    Read more

    मे २०२४ – पावसाळ्याचे सोबती

    आला पावसाळा… असं म्हणत असतानाच विविध आजारही सोबतीला येतात. या आजारांना वेळीच रोखायचं, तर आहारात काही पदार्थांचा वापर वाढवायला हवा. त्यात आलं, सुंठ आणि गवती चहा हे पदार्थ महत्त्वाचे आहेत.

    आले

    • जेवणात तिखटपणा येण्यासाठी लाल तिखट वापरण्याऐवजी आलं वापरणं श्रेष्ठ असतं. आलं वाटून त्याचा वापर केल्याने तो तिखटपणा बाधत नाही.
    • आल्याचा रस हा भूक वाढवणारा आहे.
    • आल्याच्या रसात, लिंबू रस, सैंधव घालून तयार केलेलं पाचक हे पचनक्रिया सुधारण्यासाठी उपयुक्त आहे.
    • आल्याच्या रसात डाळिंबाचे दाणे व खडीसाखर घालून सेवन केल्याने तोंडाला चव येते. पुष्कळ दिवस ताप येऊन गेल्यानंतर वरील मिश्रण घेतल्यास फायदा होतो.
    • जेवणापूर्वी मीठ व आल्याचा रस पाव चमचा घेतल्यास कोलेस्टेरॉल आटोक्यात राखण्यास मदत होते.
    • दम्याचा त्रास होत असल्यास आल्याचा रस, तूप (गायीचं) व खडीसाखर घेतल्यास दम्याचा त्रास कमी होतो.
    • पोट दुखत असल्यास आल्याचा रस व लिंबाचा रस एकत्र करून बेंबी सोडून अवतीभोवती चोळावा.
    • ज्यांना सर्दीचा त्रास असेल त्यांनी आल्याच्या रसात गूळ घालून ते पाण्यात पातळ करून नंतर नाकात घातल्यास फायदा होतो. मात्र तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसारच वरील प्रयोग करावा. कोणतेही सांधे दुखत असल्यास आल्याचा रस व मीठ यांच्या मिश्रणाने सांधे चोळावे. पायाच्या पोटरीतून गोळा येत असल्यास आल्याच्या रसात हिंग घालून तो रस चोळावा.

    सुंठ

    • आलं सुकल्यानंतर सुंठ तयार होते. सुंठ ही उत्तम आम्लपाचक आहे. म्हणजेच शरीरात होणार्‍या फाजिल संचिताचं ती पचन करते. शरीरात जी विषद्रव्य निर्माण होतात ती पचवायला सुंठ मदत करते.
    • सुंठवडा हा रामनवमीला वाटण्याची पद्धत आहे. खरं तर रामनवमी ही वसंत ऋ़तुमध्ये येते. सुंठवडा त्या दरम्यान सेवन केल्याने कफाचा त्रास आटोक्यात राहातो. पण पावसाळ्यात देखील सुंठ, तूप व गूळ यांची गोळी करून ती रोज घेतल्याने पोटाचे विकार होत नाहीत. बरेच वेळा आमांशजन्य शौचाला होते. त्यात सुंठीचं चाटण मध घालून सेवन केल्याने फायदा होतो.
    • पोटात दुखून जर शौचाला होत असेल तर सुंठ, बारशिंग व खसखस पावडर करून त्यात खडीसाखर घालून द्यावं.
    • सुंठ पाण्यात उकळून ते पाणी निम्मं करून प्यायल्याने पचनशक्ती सुधारते. असं पाणी घेतल्याने तापावर नियंत्रण राखता येतं.
    • वारंवार खोकला येत असल्यास सुंठ व खडीसाखर घ्यावी. पुष्कळ प्रमाणात ढेकर येत असल्यास सुंठ व गूळ घ्यावा. अजीर्ण झाल्यानंतर सुंठ व ताक घेतल्याने फायदा होतो.
    • आम्लपित्त झालं तर सुंठ व आवळा चूर्ण खडीसारेबरोबर घेतल्याने फायदा होतो.
    • कोणत्याही प्रकारची सूज आली असता त्यावर सुंठ उगाळून लेप करावा.
    • सुंठ पावडरचं नस्य केल्याने सर्दी कमी होते. मात्र तज्ज्ञांकडूनच नस्य करावं.

    गवती चहा

    • पावसाळ्यात गवती चहा खूप प्रमाणात उपलब्ध असतो. गवती चहाची वाफ घेतल्याने घाम येतो. ताप आल्यानंतर अशी वाफ घ्यावी.
    • सर्दी झाली तर गवती चहा, सुंठ, मिरं व दालचिनी यांचा काढा फायदेशीर होतो.
    • गवती चहाचं तेल हे सांधेदुखीवर लाभदायक असत. गवती चहाचा काढा व खडीसाखर घेतल्याने लघवीला साफ होते.
    • गवती चहा उत्कृष्ट वातसारक आहे. ह्याचा काढा घेतल्याने पोट फुगणे व या त्रासात फरक पडतो.
    • कंबरदुखीवर गवती चहाचं तेल लावल्यास फायदा होतो.
    • थोडक्यात, पावसात होणार्‍या छोट्या-मोठ्या त्रासांना जर वेळीच अटकाव करायचा असेल, तर घरातच उपलब्ध असणार्‍या या सोबत्यांचा नीट उपयोग करायला हवा.
    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter