अनिकेत परशुराम आपटे

‘आज रात बारा बजे से… संपूर्ण देश लॉकडाऊन होने जा रहा है। जो जहाँ है, वही रहे  बाहर नहीं निकलना है“ । २२ मार्च या दिवशी मोदीजींचे हे शब्द कानी पडले आणि माझ्यासह जवळ जवळ सर्वांचंच धाबं दणाणलं.

लॉकडाऊनच्या पहिल्या दिवसापासून कामासाठी बाहेर पडणार्‍यांनीच त्या काळातली खरी परिस्थिती अनुभवली…….

एकमेकां सहाय्य करू

सुट्टी कोणाला नको असते..!! पण अशी जबरदस्तीची सुट्टी… बरं, घरातल्या बायकांसाठी दुष्काळात तेरावा महिना म्हणजे कामवाल्या बायका येणं बंद झालं. झाड-लोट, कपडे-लत्ते, भांडी-कुंडी आणि स्वयंपाक, असे चार सामने त्यांच्यासमोर उभे ठाकले. कामाचं विभाजन हा उत्तम आणि एकमेव पर्याय समोर होता. आई व बायकोने स्वयंपाकघराचा ताबा घेतला तर झाड-लोट आणि कपडे-लत्ते ही जबाबदारी माझ्यावर आली.

‘एकमेकां सहाय्य करू…“ हे वचन जसं घरात दिसू लागलं, तसं ते सोसायटीतही जाणवलं. २२ मार्चला ती घोषणा झाल्या झाल्या सोसायटीच्यों प्aूेAज्ज्ु rदल्ज् वर चर्चा सुरू झाली. काय करायचं… सामान कसं काय आणायचं… सुरक्षेचं कसं करायचं… हे विषय ओघाने आलेच. माझ्यासह सोसायटीतल्या अजून दोघांनी ही जबाबदारी स्वीकारली.

बदललेला दृष्टिकोन

अत्यावश्यक सेवांमध्ये बँकांचाही समावेश होता. त्यामुळे काहीही झालं तरी बँका सुरूच राहणार होत्या. मी बँक कर्मचारी असल्याने मला काही झालं तरी कामावर जावंच लागणार होतं.  लॉकडाऊनचं कडक पालन सुरू असल्याने येणार्‍या ग्राहकांची संख्या जवळ जवळ नगण्यच होती. पण आमच्याबरोबरची  ग्राहकांची बदललेली वागणूक नक्कीच जाणवत होती. मेलेले उंदीर पकडावे तसे काही ग्राहक आम्ही दिलेल्या नोटा, कागद हाताळायला लागले; तर भिकार्‍यासमोर पैसे फेकावेत तसे काही ग्राहक पैसे व कागद आमच्यावर लांबूनच फेकू लागले. अशा वेळी वाटायचं, ‘या अशा अपमानित करणार्‍या, हेटाळणी करणार्‍या ग्राहकांसाठी का आम्हाला बसवलं इथे…“ पण यातही काही ग्राहक आमची काळजीही करत होते. ‘स्वत:ची काळजी घ्या… लवकर घरी जा… आज काम नाही झालं तरी चालेल, माणसं कमी आणि काम जास्त हे मला माहीत आहे…“ अशी वाक्य ऐकताना नवा हुरूप यायचा कामाचा…

अपेक्षाभंग आणि कानगोष्टी

काहींच्या मते २१ दिवसांचा हा कैदवास होता. तो संपत येण्याची तारीख जशी जवळ येत होती, तसे सगळे आनंदीत होऊ लागले. एका बाजूला जिथे लॉकडाऊन संपणार ही चर्चा होती तिथेच दुसरीकडे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याच्याही बातम्या येत होत्या. अशातच आपल्या सर्वांच्या अपेक्षांना सुरूंग लावणारा, लॉकडाऊन वाढल्याचा निर्णय समोर आला. इतके दिवस एक सुट्टी  म्हणून घेतलेले हेच दिवस लॉकडाऊन वाढल्याने आता वेगळेच वाटू लागले. कोरोनाबद्दलची भीती आता वाढू लागली होती. त्यातच कानगोष्टींना ऊत आला. कोणी सांगत होतं, ‘कोरोना काही जात नाही… आपण सगळे मरणार यामुळे…“ कोणी बोलत होते, ‘हा कोरोना आता आपलं शरीरच नाही तर पैसाही पोखरणार… नोकर्‍या जाणार… खायची भ्रांत पडणार…“ अफवांना ऊत येत होतां.

अंगवळणी पडले सारे… दारात आले कोरोनाचे वारे…

हे लॉकडाऊन आता माझ्यासह सर्वांच्याच अंगवळणी पडलं होतं. जसं लॉकडाऊन वाढत गेलं तसे ग्राहकांच्या काळजीचे सूरही बदलत गेले. ‘मिळतात ना इतक्या सवलती, मग करा की जरा जास्तीची कामं…“

अचकत-बिचकत का होईना, पण धीम्या गतीने आणि योग्य ती काळजी घेऊन आयुष्य सुरू होतं. असं असतानाच एक दिवस मी ऑफीसच्या कामात व्यस्त होतो तेव्हा घरून फोन आला. बातमी ऐकून शॉकच बसला. आमच्या सोसायटीत एकाच परिवारातल्या तिघांना कोरोनाची लागण झाली होती. इतकी दक्षता घेऊनही, स्वच्छतेबाबत पूर्ण निगा राखूनही कोरोनाचं संकट सोसायटीत शिरलंच होतं. यामुळे आम्ही सर्वचूा हेग्दह मध्ये होतो. आठवड्याभरात ती तिघं परत देखील आली. त्या परिवाराची गाडी पूर्वपदावर येईपर्यंत सर्व बिर्‍हाडकरूंनी आळी-पाळीने त्या परिवाराच्या दिवसभराची खान-पान व्यवस्था आपल्या हाती घेतली…

वागणुकीतला बदल

सोसायटीतल्या सर्वांनी त्या बाधित परिवाराला सावरायला आणि पुन्हा उभं रहायला मोलाची मदत केली खरी; पण बाहेरच्या जगाची आमच्याशी असलेली वागणूक मात्र बदलली. आमच्या सोसायटीत कोरोनाचा शिरकाव झाल्याची बातमी आस-पासच्या दुकानांमध्ये, वसाहतींमध्ये वार्‍यासारखी पसरली. त्यावेळी सामान देताना, ते आमच्याकडे टाकल्यासारखं करणे, ‘त्या परिवाराला काही दिवस दूर का पाठवत नाही तुम्ही…“ अशी सतत विचारणा करणे, ‘तुमच्याकडून कॅश किंवा कार्ड पेमेंट आम्ही घेणार नाही… गूगलपे फोनपे नसेल तर सामान घेऊ नका…“ असं सांगणे, हे प्रकार काही दुकानदारांकडून व्हायला लागले. शिवाय परिसरातील काही राहिवासी तर, आम्ही कोणी अस्पृश्यच आहोत असे वागत होते आमच्यासोबत…

इतकंच कशाला, मी ज्या शाखेत काम करतो तिथल्या काही ग्राहकांपर्यंतसुद्धा ही बातमी पोहोचली. तेव्हा काही ग्राहक तर माझ्याकडे पाहूनही न पाहिल्यासारखं करू लागले. एक-दोन ग्राहकांनी तर चक्क त्यांची खाती बंद करून शाखेतून काढता पाय घेतला. हे सर्व पाहून मन खूप व्यथित झालं. या लोकांमधले अर्धे-अधिक लोक मी राहतो त्याच परिसरातले असल्याने, मी अगदी लहान असल्यापासून आम्ही एकमेकांना ओळखत होतो. ते काका, ती मावशी, ते दादा, लहानपणापासून इतके मोकळे वागले माझ्याशी, आणि आज ही अशी तिरस्काराने भरलेली वागणूक… आणि तीही माझीच नाही, तर सोसायटीतल्या कोणाचीच काहीच चूक नसताना… पण करावे काय… शेवटी, ‘आलिया भोगासि…“ असंच म्हणावं लागेल आता… कोरोनाने  नुसती मानवी शरीरंच नष्ट केली असं नाही, तर जिवंत व धडधाकट व्यक्तींची बुद्धीही भ्रष्ट केली हेच खरं…

संकट काही थांबणार नाहीजगरहाटी चालू राही

पहिला लॉकडाऊन, मग दुसरा, तिसरा, चौथा… गेले साडेपाच महिने हेच चक्र सुरूच राहिले. मला खात्री आहे, भाईंच्या  ‘असा मी आसा मी“ मधले भिकाजी कडमडेकर जोशी आज असते तर नक्कीच म्हणाले असते, ‘तूंस सांगतो मी बेमट्या…  हा कोरोना नावाचा विषाणू, सावकाराच्या व्याजासारखा आहे हो… व्याज जसें कर्ज घेणार्‍याची पाठ सोडीत नाही, तसेंच हा विषाणूदेखील आता आपल्याला चिकटला आहे हो… तेंव्हा, घाबरत बसण्यापेक्षा आपणच आपली काळजी घ्यायची आणि कामाला लागायचे, कसें…