डॉ. नंदिता पालशेतकर
गेलं वर्ष अनेक बाबतीत करोनानं गिळलं खरं, पण म्हणून काही निसर्गाचं चक्र थांबत नाही. फुलं फुलत होती, फळांनी झाडं लगडत होती. पशुपक्षांची पिल्ल जन्माला येत होती तसंच या काळात अनेक कुटुंबात नव्या पाहुण्याची देखील चाहूल लागली. घरात बाळ येणार याचा आनंद काही वेगळाच असतो. पण या काळात त्या आनंदाला एक धास्तीची, भीतीची किनारही होती. गर्भधारणा झालेल्या स्त्रीला किंवा नव्यानं जन्माला आलेल्या बाळाला करोना पासून दूर ठेवण्याचं मोठ आव्हान डॉक्टरांपुढे तसंच कुटुंबियां पुढेही होतं. घरामध्ये स्वच्छतेचे नियम काटेकोरपणे पाळले जाणे गरजेचे होते. गर्भवती स्त्रीच्या आहाराकडे विशेष लक्ष देणं गरजेचं होतं. एरवी सर्वसाधारण परिस्थितीत स्वच्छतेचे वा आहाराचे नियम इतके काटेकोरपणे पाळले जात नव्हते जे या काळात पाळले गेले. त्यामुळे या काळात जन्माला आलेली बाळं कदाचित् अधिक निरोगी असू शकतील. जर हे खरं असेल तर हे नियम पुढे कायम पाळले जाणे अत्यंत आवश्यक आहे.
काहीही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुण्याची सवय लावून घ्या किंबहुना बाहेरून कुठूनही घरी आलात की हात–पाय स्वच्छ धुतलेच पाहिजेत.
गर्भधारणा प्लॅन करण्यापूर्वी किमान ३ महिने आधी शरीराला आसनांची, मनाला ध्यानाची सवय लावावी. सकाळी शक्य तितक्या लवकर रोज किमान पंधरा मिनिटं योगासनं आणि ध्यानधारणेमुळे शरीर आणि मन ताजेतवाने होऊन स्नायूंना शक्ती मिळते.
गर्भधारणेपूर्वी हिमोग्लोबिनचे प्रमाण तपासून बघावे. हिमोग्लोबिनचे प्रमाण १२% किंवा त्यापेक्षा जास्त असले पाहिजे. थॉयरॉइडची तपासणी करुन घ्यावी. मधुमेह, रक्तदाब यासारख्या अचानक अणि कधीकधी तत्कालीन उद्भवणार्या रोगांचीही तपासणी करुन घ्यावी.
स्त्रीने वजनावर नियंत्रण ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. जर लग्नानंतर काही कारणाने वजन खूप वाढले असेल तर ते आटोक्यात आणून मगच बाळाचा विचार करावा.
बाळाची चाहूल लागली की डॉक्टर कोण असावा या गोष्टीचा सगळ्यात पहिल्यांदा विचार केला पाहिजे. गर्भवती स्त्रीमध्ये आणि
डॉक्टरांमध्ये सुसंवाद असणं अतिशय आवश्यक आहे. जे
डॉक्टर संवाद साधणं टाळत असतील किंवा प्रश्नांना समाधानकारक उत्तरं देत नसतील त्या डॉक्टरांकडे आपले पूर्ण नऊ महिने सोपवतांना दहा वेळ विचार करा.
प्रसूतीगृह स्वच्छ असावेच; त्याचबरोबर तिथला स्टाफही कार्यतत्पर असावा. प्रसूतीगृहात जास्तीतजास्त आधुनिक सोयी असाव्यात. होणार्या आईची तसेच बाळाची योग्य तपासणी व काळजी घेतली जाईल अशाच प्रसूतीगृहाची निवड करावी.
गर्भधारणेनंतर आरोग्य उत्तम राखण्यासाठी पचनसंस्था उत्तम असावी त्यासाठी पचनसंस्थेबरोबरच दातांच्या आरोग्याची काळजीही घेतली पाहिजे. श्वसनक्रिया उत्तम राहाण्यासाठी नियमित प्राणायाम करावा. रक्ताभिसरण उत्तम राहावे म्हणून नियमित योगासने करावी.
हाय प्रोटीन आणि कॅल्शियम रिच अन्नाचे सेवन.
गर्भावस्थेत मातेकडून मुलाला जो अन्नपुरवठा होत असतो, जी पोषक मूलद्रव्य, संरक्षक पेशी त्याच्यापर्यंत पोहोचण्याची प्रक्रिया घडत असताना ती स्त्री जर आनंदी असेल, तिच्या मनात सुखाची भावना असेल तर अशी सुखाची भावना मनात निर्माण करणारी जी रासायनिक द्रव्यं असतात तीसुध्दा आईकडून मुलाकडे जातात.
आई होण्याचा विचार केल्यावर करियरला दुय्यम स्थान देऊन येणार्या बाळाला अग्रक्रम दिला पाहिजे. तुमच्या हिंडण्या-फिरण्यावर बंधनं येतात, खाण्या-पिण्याच्या सवयी बदलाव्या लागतात म्हणून चिडचिड करुन मानसिक तोल ढळला तर याचा परिणाम गर्भावर होणार असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.
बाजारातलं किंवा
हॉटेलमधलं काहीही खाऊच नका. रेस्टॉरंटमध्ये खावंस वाटलंच तर ते रेस्टॉरंट स्वच्छ असावं याची खबरदारी घेतलीच पाहिजे. किंवा बाहेरचे पदार्थ घरी आणून अग्नीवर ठेवून पूर्ण गरम करा…
मायक्रोवेव्हमध्ये नाही…मगच खा.
भुकेपेक्षा खूप जास्त खाऊ नये तसंच खूप कमीही खाऊ नये. त्यापेक्षा गरम भात, वरण, साजुक तूप, कोशिंबीर, तूप
लावलेल्या पोळ्या, हिरवी भाजी, एखादे कडधान्य, ताक असा सात्विक आहार सगळ्यात उत्तम.
आहारात भिजवलेले अंजीर, काळ्या
मनुका, बदाम, खजूर, डाळिंब याचाही समावेश करावा. रात्रीच्या आहारात पण हलकी मुगाची खिचडी किंवा फळे, दूध…. शक्यतो गायीचे असावे…. यांचा समावेश करावा.
शारीरिक विधींना (लघवी/शौच) थांबवून ठेऊ नये. बर्याच स्त्रियांना या काळात जास्त वेळा लघवीला जावे लागते. याची त्यांना लाज वाटते अशीही उदाहरणे बघण्यात आहेत. अशा वागण्याचा परिणाम गर्भावर होत असतो हे लक्षात ठेवलं पाहिजे.
वेड्यावाकड्या ठिकाणी, वेडेवाकडं बसणं, ताडताड चालणं वा धावणं, वेडवाकडं वाकणं, अती वजन उचलणं, उंचावर चढणं, उगाचच दमणं, कोणत्याही वाहनातून वेडावाकडा प्रवास करणं, अती व्यायाम करणं किंवा पोहोणं या सारखे कोणतेही शारीरिक श्रम कटाक्षाने टाळलेच पाहिजेत. त्याचप्रमाणे सतत झोपून किंवा बसून राहाणं हे ही योग्य नाही. आपल्याला झेपतील तशी आणि तितकीच कामं करावीत.
घट्ट कपडे वापरु नयेत. कपडे स्वच्छ, कोरडे, सैलसर आणि मऊ कपडे वापरावे. बाहेरून आल्यावर कपडे बदलण्याची सवय ठेवावी. तसेच रात्री झोपतांना दिवसभराचे कपडे बदलून झोपावे.
या काळात शरीरातली उष्णता वाढते. त्यामुळे स्रियांना सतत ए.सी. मध्ये किंवा फुलस्पीड फॅन खाली बसावंसं वाटतं. थंड पाण्याने अंघोळ करावीशी वाटते, जे अजिबात योग्य नाही. हातपाय उबदार राहिले पाहिजेत. दिवसातून दोनदा अंघोळ केलीत तरी पाणी किमान कोमट तरी असलेच पाहिजे.
डॉक्टरांच्या सल्ल्याने आठवडाभराचा जेवणाचा
प्लॅन आखा. नियमीतपणे व्यायाम, योगासने करा. कोणत्याही प्रकारचे टेन्शन घेऊ देऊ नका. मातृत्वाशी ओळख करून देणारा हा काळ खूप अद्भुत असतो. त्याचं मनापासून स्वागत करा, आनंदाने अनुभवा म्हणजे हे नऊ महिने अजिबात जड जाणार नाहीत.