•   
  • संपर्क – +९१ ०२२-35578528    

  •     इमेल – sainirnay.images@gmail.com      

  • Posts by admin

    डिसेंबर २०२३ – हृदयरोग टाळण्यासाठी

    उच्च रक्तदाब हा वैद्यकीयदृष्टया आणि सामाजिक आरोग्याच्या दृष्टीनेही एक महत्त्वाचा विषय बनतो आहे. व्यक्तीचं वय जसजसं वाढत जाईल, तसा उच्च रक्तदाबाचा त्रास हा अपरिहार्य ठरत आहे. वाढत्या वयानुसार या आजाराचा प्रादुर्भाव वाढत असून ६० ते ६९ वर्ष या वयातील ५० टक्के रूग्णांमध्ये आणि ७० किंवा अधिक वयाच्या अंदाजे ७५ टक्क्यांपेक्षा अधिक रूग्णांमध्ये ही समस्या आढळते. किंबहुना, ५५ ते ६५ वर्षे वयापर्यंत उच्च रक्तदाब नसणार्‍या पुरूष आणि महिलांमध्ये हा आजार उद्भवण्याची शक्यता अंदाजे ९० टक्के इतकी असते.

    उच्च रक्तदाबाची अनेक कारणे असतात. त्यापैकी अनुवंशिकता, वय, लिंग या गोष्टी आपल्या हातात नसतात. परंतु याशिवाय आपले रक्तदाब वाढवणार्‍या अनेक गोष्टी आपल्या हातात असतात. उदा; समतोल आहार, निव्यर्सनी राहणे, रक्तातील कोलेस्ट्रॉल व साखरेचं प्रमाण या गोष्टीवर ताबा ठेवल्यास आपल्या रक्तदाबावर आपोआप नियंत्रण राहते. १२०/८० हा रक्तदाब सर्वसामान्य समजला जातो. जेव्हा ही पातळी वर चढते आणि तो १३०/९० होतो तो सहन न होण्याइतका रक्तदाब समजला जातो. ही पातळी ओलांडली की तो उच्च रक्तदाब समजला जातो.

    उच्च रक्तदाब हा कोणतेही लक्षण न दर्शविता कधी होतो हे कळत नाही म्हणून या आजाराला “सायलंट किलर” असे संबोधिले जाते. हृदय, मेंदू व मूत्रपिंड या महत्त्वाच्या अवयवांच्या निरोगी आरोग्याकरिता रक्तदाब हा सामान्य असणे फार गरजेचे आहे. उच्च रक्तदाबाच्या आजारामुळे हृदय निकामी होणे, हृदयविकाराचा झटका येणे, किडणी निकामी होणे अशा जीवघेण्या आजारांना तोंड द्यावे लागते. वाढत्या शहरीकरणामुळे मानसिक ताणतणाव, नात्यातील गुंता व कामाच्या डेडलाईन यांचा वाढता ताण लक्षात घेता आजची तरूण पिढी ही उच्च रक्तदाबाच्या आजाराला बळी पडत आहे. उच्च रक्तदाब हा हृदयविकाराचा धोका उद्भवण्याचं एक स्वतंत्र कारण असून त्यामुळे हृदयविकाराचा धोका दुप्पट ते तिपटीने वाढू शकतो. उच्च रक्तदाबामुळे हृदयावर विविध प्रकारचे परिणाम होऊ शकतात.

    या आजारामुळे हृदयास रक्तपुरवठा करणार्‍या रक्तवाहिन्या कठिण होतात आणि त्यावर सूज येते. त्यामुळे त्यांचा रक्तवाहक मार्ग अरूंद होऊन परिणामत: हृदयास कमी प्रमाणात रक्तपुरवठा होतो. (अँजायना, इस्केमिक हार्ट डिसीज, कोरोनरी हार्ट डिसीज) तसंच या आजारामुळे हृदयविकाराचा झटका येण्याचीही शक्यता असते. किंबहुना ज्या लोकांना अचानक हृदयविकाराचा झटका येतो त्यांच्यामध्ये उच्च रक्तदाबाचा विकार आधीपासूनच असल्याचे आणि त्याचे निदान आणि उपचार झाले नसल्याचे आढळून येते.

    हृदयाचे स्नायू ताठर होण्याची समस्या ज्याला लेफ्ट व्हेण्टिक्युलर हायपरटॉफी असं म्हणतात. ही देखील या आजारामुळे उद्भवू शकते. भविष्यात हृदयवाहिनीशी संबंधित आजार होऊन मृत्यू होण्याची शक्यता असल्याची सूचना या समस्येमुळे रूग्णास मिळू शकते.

    उच्च रक्तदाबामुळे हृदयावर अधिक ताण येतो आणि हृदयाकडून अपेक्षित असलेल्या कार्यापेक्षा अधिक कार्य हृदयाला करावं लागतं. यामुळे हृदयाचा आकार मोठा आणि लहान होण्याची कृती क्रमश: घडत राहते आणि याचा परिणाम हृदयाचे कार्य बंद पडण्यामध्ये होतो.

    उच्च रक्तदाबाच्या समस्येमुळे रक्तदाबाचा आपोआप वाढवणारा स्तर किंवा मुख्य रक्तवाहिन्या ताठर होण्याची आनुषंगिक क्रिया यामुळे हृदयाच्या कार्यावर परिणाम करणारे विकार उद्भवतात. अपेक्षित स्तरापेक्षा अधिक प्रमाणात असलेला रक्तदाब हा हृदयास कमी रक्तपुरवठा झाल्याने उद्भवणार्‍या ५० टक्के आजारांस कारणीभूत ठरतो. तसंच अंदाजित आकडेवारीनुसार आकुंचित रक्तदाबातील २० एमएम एचजी किंवा प्रसारित रक्तदाबातील १० एमएम एचजीपर्यंतच्या वाढीमुळे प्रत्येक वेळेस हृदयविकाराने मृत्यू होण्याचा धोका दुपटीने वाढू शकतो.

    भारतात गेल्या काही वर्षात उच्च रक्तदाबाचे प्रमाण खूप वेगाने वाढत असून ही एका चिंताजनक बाब आहे. तंत्रज्ञानातील प्रगतीमुळे व आधुनिक सुखसोयीमुळे बैठ्या जीवनशैलीत वाढ झाली आहे. त्याचबरोबर रोजच्या आहारामध्ये वाढलेले जंक फूड, धुम्रपान, मद्यपान तसेच मानसिक ताणतणाव यामुळे उच्च रक्तदाबाचे प्रमाण वाढीस लागले असून हृदयविकार होण्यामागे मधुमेहाप्रमाणे उच्च रक्तदाब हे ठळक कारण समोर येत आहे. रक्तदाबाचे नियंत्रण वेळेवर न झाल्यास आपल्या शरीरात बरीच गुंतागुंत निर्माण होते.

    उच्च रक्तदाब रोखण्यासाठी:

    उच्च रक्तदाब टाळणे किंवा कमी ठेवणे हे आपल्या हातात असते.

     सर्वात प्रथम आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी रक्तदाब तपासणी करणे, प्रत्येकाचा रक्तदाब साधारणपणे आयुष्यभर बदलत राहतो.

     वजन आटोक्यात ठेवा. तुमचं वजन अधिक असेल, तर वजन कमी करायला तत्काळ सुरूवात करा.

     नियमित व्यायाम

     आहारातील मिठाचं प्रमाण कमी करा. अधिक प्रमाणात मीठ खाल्ल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता ४० टक्क्यांनी वाढते.

     फळं, भाज्या भरपूर प्रमाणात खा. लो-फॅट डायट घेण्याकडे कल असू दे.

     रिलॅक्सेशन आणि दीर्घ श्वास घेण्याचे व्यायाम केल्याने फायदा होतो.

     दिवसभरात भरपूर प्रमाणात कॉफी घेतल्याने रक्तदाब वाढण्याची शक्यता असते. म्हणूनच कॉफीचे प्रमाण कमी करा.

     रात्री पुरेशी झोप घ्या.  यामुळे दिवसभराचा थकवा, ताणतणाव दूर होतात.

    उच्च रक्तदाबापासून काही अंशी बचाव करण्यामध्ये आहाराची महत्त्वाची भूमिका असते. आहारात लोणी, तूप कमी प्रमाणात खावं. ज्यांनी कॅल्शिअम मिळेल, असे पदार्थ खावेत. दूध, हिरव्या भाज्या, डाळी, संत्रे, स्ट्रॉबेरी, बदाम, केळे, सीताफळ अशा पदार्थामध्ये ते जास्त असतं. उच्च रक्तदाबाच्या व्यक्तींनी सूप, सॅलेड, आंबट फळे, लिंबू पाणी, नारळाचं पाणी हे घेणं फायदेशीर ठरतं. गाजर, फ्लॉवर, पालक, टोमॅटो, कांदा, पालेभाज्या यांचा आहारात समावेश असावा.

    दिवसांतून कमीतकमी ८ ते १० ग्लास पाणी घेतलं पाहिजे. त्याचप्रमाणे बदाम, अक्रोड यांचाही समावेश असावा.  सॉस, लोणी, बेकिंग पावडर यापासून दूर राहावं. त्याचप्रमाणे मासांहार पदार्थही जास्त प्रमाणात खाऊ नयेत. याशिवाय सपाट रस्त्यावरून मोकळ्या हवेत फिरण्याचा व्यायाम करणं, पुरेशी विश्रांती घेणं, तसंच चिंता, काळजी चिडचिडेपणा टाळून मानसिक स्वास्थ्य टिकवणं हे देखील तितकंच गरजेचं ठरतं.

    रक्तदाब आणि हृदयविकार यांच्यामध्ये सातत्यपूर्ण आणि चिरंतन राहणारं नातं आहे आणि त्याच्याशी अन्य कोणत्याही शारीरिक धोक्यांचा संबंध नाही. रक्तदाब जितका अधिक, तितकाच हृदयविकाराचा झटका आणि हृदय बंद पडणे या समस्या उद्भवण्याची शक्यता अधिक असते.

    उच्च रक्तदाबामुळे ९० टक्के रूग्णांमध्ये हृदय बंद पडण्याची समस्या वाढीस लागते आणि हृदय बंद पडण्याचा धोका दुपटी-तिपटीने वाढतो. त्यामुळेच या आजाराकडे दुर्लक्ष करून उद्भवणारे भयंकर परिणाम टाळण्यासाठी उच्च रक्तदाबाच्या आजाराचं त्वरित निदान आणि त्यावरील योग्य उपचार करणे आवश्यक आहे.

    Read more

    नोव्हेंबर २०२३ – विष्णुजींचा फ्रुटफंडा

    वावाबोट

    साहित्य : लांबसर मोठा पेरू १ नग, मिक्स फ्रुट जेली अर्धी वाटी,
    व्हॅनिल कस्टर्ड १ वाटी, मध २ चमचे.

    कृती : व्हॅनिला कस्टर्ड : दोन चमचे कस्टर्ड दोन कप दुधात
    मिसळून चवीनुसार साखर घालावी व मंद आचेवर घट्ट करून घ्यावे. किंवा एका भांड्यात पाणी गरम करून गॅसवर ठेवावे, त्याच्या आतमध्ये बसणार्‍या भांड्यात कस्टर्डचे मिश्रण ठेवून ढवळावे. घट्ट झाल्यावर
    गॅसवरून उतरवावे. (याला डबल बॉयलिंग प्रोसेस म्हणतात, यामुळे कस्टर्ड जळत नाही.)

    वावाबोट : पेरूचे लांबट भागाचे मधोमध दोन भाग करून बियांचा भाग काढून टाकावा व पेरूला थोडेसे वाफवून घ्यावे. त्यामध्ये जेली घालून सर्व्हींग प्लेटमध्ये पहिल्यांदा कस्टर्ड ओतून त्यावर ही पेरूची बोट ठेवावी. वरून बदाम, पिस्त्याचे काप व मधाने सजवून थंड करून सर्व्ह करावे.

    सीताफळाचा जॅम

    साहित्य : सीताफळाचा गर २ वाट्या, साखर १  वाटी, १ लिंबाचा रस किंवा सायट्रीक अॅसिड छोटा चमचा, जिलेटीन अर्धा चमचा.

    कृती : सीताफळाचा गर, साखर, सायट्रिक अॅसिड व पातळ केलेले
    जिलेटीन एकत्र करून घट्ट होईस्तोवर शिजवा. थंड झाल्यावर बाटलीत भरून ठेवा.

    डाळिंब मॉकटेल

    साहित्य : डाळिंबाचा रस अर्धा ग्लास, शुगर सिरप २ चमचे, सोडा वॉटर अर्धा कप, क्रश आईस, कोकोनट मिल्क अर्धा कप, आल्याचा रस १ चमचा.

    कृती :  सर्व प्रथम डाळिंबाचा रस, आल्याचा रस, साखर व कोकनट मिल्क एकत्र करावे. नंतर एका ग्लास मध्ये क्रश आईस व वरील तयार केलेले मिश्रण एकत्र करून सर्व्ह करावे. सर्व्ह करतेवेळी सोडा वॉटर व वरून पुदीन्याचे पान घालून सर्व्ह करावे.

    चिकूचा हलवा

    साहित्य : चिकू ५०० ग्रॅम, खवा १५० ग्रॅम, साखर चवीनुसार, साजूक तूप ४ चमचे, वेलची बेदाणे, बदाम पिस्त्याचे काप, दूध अर्धी वाटी, वर्ख.

    कृती : चिकू चांगले धुवून, साल काढून, त्याचा गर काढून घ्या.
    नॉनस्टीक पॅनमध्ये तुपावर हा गर भाजून घ्या. यातले थोडे पाणी आटले की दूध गरम करून जरूरीपुरते घाला. साखर,वेलची दाणे घालून चांगले मिसळून घ्या. वरुन बदाम पिस्त्याचे काप, वर्ख लावून सर्व्ह करा.

    क्रिस्पी बनाना

    साहित्य : ४- ५ केळ्याची स्वच्छ धुतलेली साल, कॉर्नस्टार्च अर्धी वाटी, मीठ चवीनुसार, आले-लसूण पेस्ट, अर्ध्या लिंबाचा रस, चाट मसाला, तिखट, तेल तळायला.

    कृती : केळ्याची साल स्वच्छ धुवून त्याच्या लांब पट्टया कापून घ्याव्यात. त्याला लिंबू, मीठ, आले-लसूण पेस्ट चोळून ठेवावी. त्यानंतर कॉर्नस्टार्चमध्ये घोळवून डीप फ्राय करावे.

    वरून चाट मसाला लावून सर्व्ह करावे. अतिशय कुरकरीत असा हा स्नॅकचा वेगळा प्रकार आहे

    काळ्या मनुकांचे लाडू

    साहित्य : काळ्या मनुका २ वाट्या, भरडलेले काजू किंवा
    शेंगदाणे १ वाटी, मिल्क पावडर २ चमचे, बारीक साखर अर्धी वाटी.

    कृती : शेंगदाणे किंवा काजू मंद आचेवर भाजून भरडून घेणे. त्यानंतर त्यात मिल्क पावडर घालणे. सर्व मिश्रण एकत्र करून त्याचे लाडू बांधणे. तयार केलेले लाडू बारीक साखरेमध्ये घोळून खायला देणे.

    किसमिस चटणी

    साहित्य : किसमिस २ वाट्या, तिखट अर्धा चमचा, एक लिंबाचा रस, आले अर्धा इंच, मीठ चवीनुसार.

    कृती : किसमिस स्वच्छ धुवून घ्यावे. थोडा वेळ पाण्यात भिजवून त्यातील पाणी काढून टाकणे. नंतर यात तिखट, मीठ, आलं मिसळून मिक्सरवर बारीक करून घ्या. जरूरीपुरते पाणी मिसळून पातळ चटणी करू शकता.

    आंब्याचे रोल

    साहित्य : आंब्याचा रस २ वाट्या, बदाम पिस्त्याचे काप १ चमचा, पिठीसाखर २ चमचे, खवा ४ चमचे, वर्ख.

    कृती : आंब्याचा रस
    नॉनस्टीक पॅनवर घालून मंद आचेवर जाळीदार डोसा तयार करून घ्या,
    किंवा मायक्रोव्हेवच्या काचेला तेल
    लावून त्यात १० मिनिटे पसरवून ठेवल्याससुद्धा डोसा छान जाळीदार होतो. नंतर यावर खवा, सुक्या मेव्याचे काप, पिठीसाखर घालून चाकुच्या सहाय्याने लांब पट्या
    कापून प्रत्येक पट्टीची गुंडाळी करणे. सुरळीच्या वड्यासारखी त्यावर वर्ख लावून सर्व्ह करा.

    Read more

    ऑक्टोबर २०२३ – पाण्यामृत

    पाणी म्हणजे जल, आणि जल हे जीवन आहे… ह्यावरून पाण्याचं का­य महत्व आहे ते नक्कीच जाणवतं. पृथ्वीवरील सर्व सजीवांचं जिणं पाण्यावरच अवलंबून आहे. मनुष्­याला पाण्­याची गरज फक्त पिण्यासाठीच नव्हे, तर दररोज अनेक गोष्टींसाठी असते. औद्योगिक क्षेत्रात तर पाण्­याची खूपच आवश्­यकता असते. शेतकर्‍­यांकरता तर पाण्­याची गरज सर्वात मोठी आहे.

    तर सांगायची गोष्ट म्हणजे, आपल्या जीवनात पाणी हा एक अत्­यंत महत्वाचा घटक आहे. पाण्­याशिवाय आपण जगण्­याचा विचारही करू शकत नाही. जशी आपल्­याला पाण्याची गरज असते, तशीच निसर्गातल्या प्रत्­येक घटकाला पाण्याची गरज असते. मनुष्­य, प्राणी, झाडं ही पाण्­याशिवा­य मरुनच जातील, नाही का? आपल्­या पृथ्वीवरील सगळ्­या सजीवांचं जीवन पाण्यावरच अवलंबून आहे. मनुष्याचा खरा दागिना हा पाणीच आहे हे म्हटलं तर खोटं ठरणार नाही.

    आपलं शरीर हे ६० टक्के पाण्­यानेच बनलं आहे. शरीरातलं पाण्­याचं प्रमाण जर १० टक्केहून कमी झाले तर आपण जगूच शकणार नाही. आपल्याला आपलं शरीर निरोगी आणि स्वस्थ ठेवायचं असेल तर भरपूर पाणी पिणे हा एक खूप मोठा पर्याय आहे. पोटाचे विकार, अॅसिडीटी ह्यावर पाणी हा एक उत्तम उपाय आहे. त्वचा सुंदर ठेवायची असेल तर भरपूर पाणी प्­यायल्­याशिवाय प­र्या­यच नाही. जर पाणी कमी प्या­यलो तर नाना तर्‍हेचे विकार होऊ शकतात. अजीर्ण, गॅसेस, थकवा येणे, मूत्रविकार, त्वचा विकार, चेहर्‍­यावर पिटीका येणे इत्यादी. जर गरम पाणी पिण्­याची सव­य लावून घेतली, तर बर्‍याच आजारांपासून लांब राहू शकतो. गरम पाणी पचायला हलकं असतं. तसंच गरम पाण्यानी अजीर्ण होत नाही. अन्न लवकर पचतं, शरीराला जडपणा वाटत नाही, पायावरची सूज निघून जाते, वजन कमी होतं, किडनीचे आजार लांब राहतात.

    दिवासातून ८ ते १० ग्लास पाणी प्या­यल्­यामुळे उष्णतेचे विकार होत नाहीत, थकवा जाणवत नाही, लघवीला साफ होते आणि म्हणून मूत्राश­याचे विकारही कमी होतात. स्रि­यांमध्ये ­युरीन इन्फेक्शनचं प्रमाण कमी होतं. जेवण करण्यापूर्वी १ किंवा २ ग्लास पाणी प्यावे; जेणेकरून भूकही कमी लागते आणि अन्न पचा­यला मदत होते. जेवण झाल्यानंतर खूप पाणी पिण्यापेक्षा जेवण्याआधी पाणी पिणे कधीही योग्­य असते. योग्य प्रमाणात पाणी प्यायल्याने  आपले डोळे साफ आणि स्वच्छ राहतात. आपली दृष्टीही साफ होते. पाणी हे आपल्­या त्वचेवर मॉइश्चरा­यजरचं काम करत असतं. ज्­याने आपली त्वचा टवटवीत आणि उज्ज्वल राहते.

    तरुण दिसण्­याकरिता महागड्या सौंदर्य प्रसाधनांवर पैसे खर्च
    करण्­यापेक्षा दिवसातून कमीत कमी ६ ते ८ माठे ग्लास पाणी पिणे गरजेचे आहे. पाण्यामुळे त्वचा मऊ व तजेलदार राहते. योग्­य प्रमाणात पाणी प्यायल्याने  आपला मेंदू संतुलित राहतो आणि एकाग्रता वाढते. पाणी व­य लपव­ण्याच काम अगदी चोख पार पाडत असतं.
    व­यामुळे शरीरावर येणार्‍या सुरकुत्­या घालवायचे कामही पाणीच करते. दिवसातून ३ वेळा पाण्याने चेहरा स्वच्छ धुतल्याने चेहर्‍यावर येणार्‍या पिटीकांपासून आपण दूर राहू शकतो आणि चेहरा तजेलदारही दिसतो. तर भरपूर पाणी प्­यायल्­याने वजन आटोक्­यात राहण्यासही मदत होते. टेन्शन, स्ट्रेस, जागरण यामुळे डोळ्­यांवर खूप मोठा परिणाम होतो. डोळे लाल होणे, जळजळणे, डोळ्­याखाली काळी वर्तुळे येणे, सुरकुत्­या येणे ­या सगळ्­यांवर एकमेव उपाय म्हणजे भरपूर पाणी पिणं हाच आहे. पाण्याने डोळ्­यांखालची व चेहर्‍­यावरची सूजही कमी होते.

    निसर्गानं आपल्­या पदरात पाण्याचं देणं अगदी भरभरून टाकलं आहे, आपण ते देणं नतमस्तक होऊन स्वीकारावं आणि जीवेभावे सांभाळावं, इतकीच त्­या निसर्गाची अपेक्षा…आणि पाण्­याचं आपल्या जीवनातलं अनन्­य साधारण महत्त्‌व लक्षात घेता ही अपेक्षा अवास्तव तर नक्कीच नाही! तेव्हा वेळीच डोळे उघडू ­या आणि निसर्गाच्­या अपेक्षेला खरे उतरू ­या! वाढती लोकसंख्­या, खूप मोठ्या प्रमाणात होणारं औद्योगीकरण, झाडं तोडणे, जल प्रदूषण, कमी पाऊस… आहेत त्या जलसाठ्यांचा गैरवापर. त्या सगळ्­या गोष्टींमुळे पाण्­याची टंचाई आपल्याला जाणवते­य. आपल्या आयुष्यातला हा खूप गंभीर मुद्दा आहे. पाणी कसे / किती / कधी प्यावे कुठेतरी वाचलं किंवा कोणीतरी सांगितलं की जास्त पाणी प्यायला सुरुवात करा­यची हे ­योग्­य नाही. प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीप्रमाणे शरीराची पाण्याची गरज वेगळी असू शकते. त्यामुळे एकच नियम सगळ्यांना लागू होईलच असं नाही. काही लोक अवास्तव पाणी पितात तर काही लोकांना अजिबातच पाणी आवडत नाही किंवा १/२ ग्लास पेक्षा ते जास्ती पाणी पिऊच शकत नाहीत ही दोन्ही टोकं योग्य नाहीत. आपल्या आरोग्याची जीवनरेखा आपल्या पेशींवर अवलंबून असते आणि पेशींची कामे सुरळीत होण्यासाठी त्यामध्ये इतर जीवनसत्त्‌व आणि प्रथिनं तर आवश्यक आहेतच पण पाण्याचे प्रमाण योग्य राखणे पण जरुरी आहे.

    काय कराल?

    तहान लागेपर्यंत प्रतिक्षा करू नका. जेवणानंतर लगेच किंवा जेवण करण्यापूर्वी पाणी पिण्याचे टाळा.

    आदर्श वेळ : अन्न सेवन केल्यावर एक तासानंतर पाणी प्या.

    आपल्याला जेव्हा तहान लागते त्यावेळी आपल्या शरीरात आधीच पाण्याची कमतरता झालेली असते. म्हणून तहान लागेपर्यंत न थांबलेलंच बरं. आपण योग्य पाणी पितो आहोत का हे बघण्यासाठी आपल्या लघवीचाच रंग बघा. तो पाण्यासारखा रंगहीन हवा. योग्य वेळी म्हणजे दोन जेवणांमध्ये पाणी प्यावे. जेणेकरून पोषक तत्त्‌व मिळतील, पण जास्तीच्या कॅलरीज मिळणार नाहीत. वजन आटोक्यात राहील, पण एनर्जी भरपूर मिळेल.

    काही पाण्याच्याच पाककृती :

     काकडी + पुदिना पाणी  = १ काकडीचे बारीक स्लाइसेस + ८-१० पुदिन्याची पाने.  कलिंगड + तुळस =  १ कप कलिंगडाचा पल्प  + ५-६ तुळशीचे पाने  लिंबू / संत्रे पाणी =  २ लिंबांचा रस किंवा १ संत्र्याचा पल्प  सफरचंद + दालचिनी पाणी = सफरचंदाचे बारीक काप + दालचिनीचे तुकडे  वेलची आणि गुलाब पाकळ्या  पेरू  + लाल मिरची बिया  अननस + पुदिना पाणी  लिंबू + आल + सैंधव मीठ  बडीशेप / जिरा / धणे पाणी या पाण्याच्या पाककृती करण्यासाठी साधारण १ लिटर पाणी वापरावे आणि फळं / हर्बस्‌ घातल्यावर ४ तासांसाठी इन्फ्युजन होण्यासाठी ठेवावे.

    Read more

    सप्टेंबर २०२३ – इमेज मॅनेजमेंट

    जेव्हा लोक तुम्हांला पहिल्यांदा भेटतात तेव्हा पहिल्या काही सेकंदातच तुमच्याविषयी मत बनवितात. हे पहिलं मत तुमच्या बाह्य रुपावर ठरत असतं…म्हणजेच तुम्ही कसे दिसता, कसे बोलता, कसे वागता, कपडे कसे घालता….वगैरे!  या तुमच्या बाह्य रुपावरूनच तुमची गुणवत्ता, शिक्षणाचा दर्जा, तुमची वागणूक, स्वभाव, राहाणीमान इतकंच नाही तर अगदी आर्थिक परिस्थितीविषयी देखील समोरचा माणूस आडाखे बांधून मोकळा झालेला असतो, आणि हे त्याचं मत त्याच्यापुरत तरी ठाम असतं. भले ते तुम्हांला चुकीचं वाटत असेल, पण त्याच्यासाठी हे मत बरोबरच असतं. पुढे तुमची आणि त्या माणसाची घनिष्ट ओळख झाल्यावर कदाचित्‌ त्याला तुमचं खरं व्यक्तिमत्व कसं आहे हे कळेल, पण तोपर्यंत त्याच्या डोक्यात मत इतकं घट्ट भिनलं असेल की तुमच्याशी वागतांना त्याचे परिणाम कुठे ना कुठे जाणविल्याशिवाय राहाणार नाहीत. कारण तुम्ही त्याच्या मनात तुमच्याविषयी एक प्रतिमा निर्माण केलेली असते. ती पूर्णतया पुसून काढणं कठीणच नाही तर काही प्रमाणात अशक्यच असतं. यालाच तर इमेज मॅनेजमेंटच्या भाषत्ेा “फर्स्ट इंप्रेशन” म्हणजेच पहिल्यांदा पडणारी छाप किंवा प्रभाव म्हणतात.

    हे फर्स्ट इंप्रेशन किंवा पहिल्यांदा पडणारी छाप उत्तम असावी याकरता आपल्याकडून काय प्रयत्न करावे हे सांगण्याआधी इमेज मॅनेजमेंट म्हणजे काय? तुमची पहिल्यांदा पडणारी छाप ही प्रभावशाली असावी यासाठी तुम्हांला मदत करून याचं व्यवस्थापन करायला शिकवणं म्हणजे इमेज मॅनेजमेंट.

    तर आता तुमच्या उणीवा झाकून फर्स्ट इंप्रेशन कसं चांगलं पाडू शकाल या विषयी थोड जाणून घेऊ या.

    आजचा लेख खास अशाच युवापिढीसाठी आहे ज्यांना आज तयार केलेली प्रतिमा पुढच्या आयुष्यात ही खूप गरजेची ठरणार आहे, तेव्हा प्रतिमा कशी बनवावी आणि समोरच्याच्या मनात कशी ठसवावी, या दोन्ही विषयी मी इथे सांगणार आहे….. कॉलेज जीवन म्हणजे मुक्त, उन्मुक्त आयुष्य, हा समज, अनेक मुलांच्या मनात असतो. खरंतर हा गैरसमज असतो.कारण इथे तुमचा जो शिक्षणाचा, संस्कारांचा पाया घातला जाणार असतो, त्यावर तुमचं पुढचं संपूर्ण आयुष्य अवलंबून असतं. तेव्हा याच वयापासून आपण काय कपडे घालतो आणि चार लोकात कसे वागतो, याचं भान ठेवणं खूप आवश्यक आहे.

    इथून बाहेर पडतांनाच तुम्हांला प्रचंड स्पर्धेच्या जगाला तोंड द्यायचं असतं. याच जगाचं आजचं प्रचलित नाव आहे “कॉरपोरेट वर्ल्ड!” याची सुरवात होते ती नोकरी मिळविण्यासाठी द्याव्या लागणार्‍या मुलाखतींपासून. तेव्हा इंटरव्ह्यूला जातांना काय काळजी घेतली पाहिजे, पेहराव कसा असला पाहिजे, आचरण कसे असले पाहिजे…ज्यायोगे आपली सक्षम आणि प्रगल्भ प्रतिमा  तयार होईल आणि इंटरव्ह्यूमध्ये यश मिळण्यासाठी जो आत्मविश्वास लागतो तो वाढेल…..

     नोकरीसाठीच्या मुला-खतीत फक्त शैक्षणिक गुणवत्ता उत्तम असून उपयोग नाही तर तुमचे वागणे, बोलणे, पेहराव, बॉडी लँग्वेंज या सगळ्यावर तुमची गुणवत्ता ठरवली जात असते.

     तुम्ही त्या पदासाठी लायक आहात की नाही? तुमचं वागणं कंपनीच्या कल्चरशी साजेसं आहे की नाही? तुम्ही त्या वातावरणात मिसळून जाऊ शकाल की नाही? या सगळ्याचं निरीक्षण मुलाखतकार त्या २५/३० मिनिटांच्या अवधीत करणार असतो, तेव्हा त्याच्या त्या निरीक्षणाला वाव मिळेल असं तुमचं वागणं असणं अपेक्षीत असतं.

     इंटरव्ह्यूच्या दिवशी तुमचं स्वास्थ चांगलं असलं पाहिजे. कोणत्याही प्रकारची दमणूक किंवा चिंता चेहर्‍यावर बॉडी लँग्वेजमधून दिसू नये.

     आदल्या रात्री उत्तम झोप घ्या. सकाळी भरपूर पाणी प्या, ज्यायोगे तुम्ही ताजेतवाने दिसाल.

     निघतांना योग्य तितकेच खा. खूप जास्त किंवा खूप कमी खाऊ नका. अती खाणे किंवा उपाशी राहाणे दोन्हीमुळे चेहर्‍यावर परिणाम होत असतो.

     मुलाखतीच्या आधी किमान अर्धा तास तुम्ही तिथे पोहोचलेला असला पाहिजे. ज्यामुळे तुम्हांला निदान थोडा वेळ तरी स्वत:शी शांतपणे विचार करता येईल.

     मुलाखतीच्या ठिकाणी पोहोचलात की आधी फ्रेश होऊन या. तुमचा चेहरा, कपडे व्यवस्थित आहेत किंवा नाही याची खातरजमा करून घ्या. आपलं नाव येण्याआधी पाच मिनिटे आपल्याला दिलेल्या जागी बसा. नाव पुकारताच आत्मविश्वासाने आत जा. मात्र आत जाण्यापूर्वी परवानगी घेऊनच आत जा.

     चेहर्‍यावर हसू असावे. सर्वाना अभिवादन करून, सांगितल्यावर मगच खुर्चीत बसावे. बसतांना खूपच रेलून आरामात किंवा अगदीच टोकावर टेन्शन आल्याप्रमाणे बसू नये. खूर्ची आवाज न करता, सावकाश हाताने खेचून घेऊन व्यवस्थित ताठ बसता येईल असे बसावे.

     विचारलेल्या प्रश्नांची मोजक्या शब्दात उत्तरे द्यावी.  अती फाफटपसारा असू नये. त्याच प्रमाणे अती संक्षिप्त उत्तरेही देऊ नयेत. उत्तरे देतांना चेहर्‍यावर अहंभाव किंवा कुत्सितपणा किंवा अगदीच केविलवाणेपणा नसावा. समोरच्याच्या डोळ्याला डोळे देऊन उत्तरे द्यावी. खाली बघून किंवा इकडे-तिकडे बघत उत्तरे देऊ नयेत.

     बोलतांना सावकाश, स्पष्ट, पण न रेंगाळता बोलावे.

      तुमच्याविषयी सांगा म्हंटल्यावर स्वत:ची थोडक्यात पण पूर्ण माहिती देता आली पाहिजे. त्यात तुमची व्यक्तिगत माहिती, शिक्षण, छंद, आवडी-निवडी आणि ध्येय हे मुद्दे आले पाहिजेत.

     दातांची व केसांची योग्य निगा राखली पाहिजे. पिवळे किंवा डाग पडलेले दात आणि तोंडाला दुर्गंधी नसावी. त्यासाठी माऊथ
    वॉशने तोंड स्वच्छ ठेवा. तोंडात काहीही चघळत राहू नये. केस स्वच्छ धुतलेले, नीट विंचरलेले असावेत.

     कपडे स्वच्छ धुतलेले, इस्त्री केलेले असावेत. कपडे, मोजे Eिकवा शूज्‌ यांना घामाची किंवा इतर दुर्गंधी येत नाही ना याची काळजी घ्यावी. परफ्युमचा वापर करत असाल तर सौम्य सुगंधाचे असावे.

     शर्ट सौम्य रंगाचा व
    फॉर्मल असावा. शर्ट इन केलेला असावा. जर नोकरीची गरज आणि मागणी असेल तरच टाय लावा अन्यथा नको. गडद रंगाची ट्राऊझर, काळा बेल्ट आणि काळे स्वच्छ शूज्‌ असावेत.

     अॅक्सेसरीज्‌ मोजक्याच असाव्यात, ज्यामुळे तुमच्या पेहरावाला उठाव येईल.

     हातांनी टेबलावरच्या कोणत्याही गोष्टींनी खेळू नका. सारखा चेहर्‍याला, केसांना वा कपड्यांना हात लावू नका.

     मुलींनी नोकरीचे स्वरूप बघून भारतीय, किंवा वेर्स्टन फॉर्मल किंवा फ्युजन कपडे निवडावे. साडी हा पेहराव कोणत्याही प्रकारच्या लुकसाठी चांगला दिसतो. मात्र साडी वा सलवार-कमिज भरजरी वा टिकल्या वगैरे लावलेले फॅन्सी नसावेत. ज्वेलरी मोजकी असावी. वेर्स्टन पेहरावावर स्कार्फ घेणार असाल तर तो सोबर रंगाचा असावा.

    नोकरी मिळल्यावर आता काय कसंही वागू असं होत नाही. नोकरीच्या ठिकाणी जर तुमची वागणूक उत्तम नसेल तर कामाचा दर्जा चांगला असूनही नोकरीत तुम्ही पुढे जाऊ शकणार नाही.

     सगळ्यांशी स्वत:हून आणि आत्मविश्वासाने बोला. मात्र बोलण्यात सतत स्वत:बद्दलची प्रौढी नसावी. आपल्याबद्दल सांगा. तसेच दुसर्‍याबद्दल ऐकून घेण्याचीही तयारी ठेवा. ऑफिस कल्चरप्रमाणे स्वत:ची वागणूक ठेवा. वेगळं वागण्याचा प्रयत्न कराल तर तुम्ही एकटे पडाल हे लक्षात ठेवा.

     कामाच्या ठिकाणी हेवेदावे, लावालाव्या करणं, भांडण लावून देणं टाळावं. हे सगळं थोडा काळंच खपून जाणारं असतं, याचे दूरगामी परिणाम वाईट होतात हे लक्षात ठेवा.

    Read more

    ऑगस्ट २०२३ – तयारी सणांची

    सुंदर दिसण्यासाठी काही खास सण-समारंभच असायला हवेत असं अजिबात नाही. नाहीतर वर्षभर पार्लरमधून जी सातत्यानं वर्दळ दिसते ती दिसलीच नसती…..ते ही फक्त स्त्रियांच्याच नाही तर पुरूषांच्या पार्लरमधूनही! आधीची तयारी

    मरीन फेशियल : ज्यांची त्वचा कोरडी असते त्यांनी मरीन फेशियल करावे, ज्यामुळे त्वचेची आर्र्दता वाढते व चेहरा कमी कोरडा दिसतो.

    चॉकलेट फेशियल : त्वचा तरतरीत करते.

    आईस बॉल फेशियल : सुरकुत्या कमी करण्यास मदत करते.  त्याचबरोबर बॉडी स्पा करून घेतल्यास छान फ्रेश वाटतं. बॉडी स्पा करायचा नसेल तर किमान मॅनिक्युअर, पॅडीक्युअर तर अवश्य करून घ्यावं.

    आजच्या बहुतांश स्त्रिया एकावेळी चार आघाड्यांना तोंड देत असतात. नोकरी-मुलं असतंच, शिवाय घराची साफसफाई… या दगदगीमुळे आलेला शीण घालविण्यासाठी स्वत:साठी थोडा वेळ व पैसा खर्च करणे आजच्या धकाधकीच्या आयुष्यात फार गरजेचे आहे. गृहिणी हा कुटुंबाचा केद्रबिंदू आहे. ती टवटवीत व आनंदी-उल्हसित असेल तर सारं कुटुंब हसत राहतं. ज्या स्त्रियांना पार्लरची ट्रीटमेंट फार महागडी वाटते, त्यांनी घरी आपल्यासाठी वेळ ठेवावा व घरच्या घरी फेशियल व हातापायाची काळजी खालीलप्रमाणे घ्यावी.

    .   स्वच्छता : तांदळाची पिठी, मसूर डाळीचे पीठ, संत्रे किंवा लिंबू याची साल थोडी किसून, थोडे ओट्‌स, पाण्यात एकत्र करून हा लेप चेहरा, हात-पाय-मान जमल्यास पाठ ह्यावर १० मिनिटे लावावा नंतर पाण्याने धुऊन टाका.

    . संवर्धन : कोणतेही शुद्ध तेल किंवा मलई ह्यासारखे स्निग्ध पदार्थ घेऊन त्यात सुगंधासाठी गुलाब पाकळी किंवा मोगर्‍याची फुले टाकून रात्रभर ठेवल्यास तो सुगंध तेलात उतरतो. या तेलाने हातापायांना चेहर्‍याला आपल्याला येईल तसा मानेपासून वर व हनुवटीपासून कानापर्यंत असा चेहर्‍यावर तसेच बोटापासून खांद्यापर्यंत व गुडघ्याच्यावर मांड्यांपर्यंत आपल्याला जमेल तितकेच प्रेशर देऊन १० ते २० मिनिटे मसाज करा. हे तेल थोडा वेळ तसेच त्वचेवर राहून मग गरम पाण्याच्या टॉवेलने पुसून टाका.

    . लेप : लेप तयार करताना चंदनाची पावडर किंवा उटणे असल्यास त्यात पाणी न घालता काकडीचा रस किंवा कोरफडीचा गर किंवा कोणत्याही फळाचा ताजा काढलेला दोन चमचे रस घालून लेप करा. हा लेप चेहर्‍याला लावा. सुकल्यावर स्वच्छ धुऊन टाका. आंघोळ करतांना हाच लेप संपूर्ण शरीराला चोळा व कोमट पाण्यानं स्नान करा.

    . संरक्षण :  स्नानानंतर संपूर्ण कोरड्या त्वचेवर मॉइश्चरायझर किंवा अल्कोहोल नसलेले टोनर कापसाने लावा.

    आता तयारी कार्यक्रमाची

    केस मुलायम दिसण्यासाठी आपण शांपू झाल्यावर केसावर कंडीशनर जरूर लावावा. किंवा मेथी, रिठा, शिकेकाई, आवळा याच्या पावडरी समप्रमाणात एकत्र करून त्याचे कंडीशनींग करा.

    केसांना चांगले वळण देऊन स्टायलिश बनवायचे असेल तर ड्रायर किंवा कर्लिंग आयर्नचा उपयोग करून केसांना वळण देता येते किंवा केस सरळ करण्याची आयर्न वापरून कुरळे केस सरळ करता येतात. या ट्रिटमेंट पार्लरमध्ये घेता येतातच पण जर घरात त्यासाठी योग्य उपकरणं असतील तर घरच्याघरी करणंही काही कठीण नाही. लांब केस असणार्‍या स्त्रियांनी केसाच्या पुढच्या भागात थोडेसे ब्रेडींग करावे किंवा ब्रेडींगची वेणी घालावी. ती घालताना जर सोनेरी किंवा चंदेरी रीबीन किंवा डेकोरेशनचा वापर केला तर छान दिसेल.

    सध्या नॅचरल मेकअपची फॅशन आहे. जाड आयलायनर व काजल प्रामुख्याने वापरले जाते. रोजच्या मेकअपमध्ये फार भडकपणा नसावा पण आयशॅडो, लिपस्टीक,

    नेलपॉलीश हे ड्रेस किंवा साडी ह्यांना पूरक म्हणजेच कॉम्प्लिमेंटरी असावे.

    नखांवर डिझाईन काढण्याची खूप फॅशन आहे. काहीजणी पार्लरमध्ये जाऊन नखांवर डिझाईन्स करून घेतात, तर पेंटींगची आवड असेल तर त्यांना घरीदेखील नेल आर्ट करणे कठीण नाही. वेशभूषा ही केशभूषा व मेकअपला साजेशी किंवा दोन्ही एकमेकांना पूरक असावे. साधारण नियम असा आहे की, ज्यावेळी आपण खूप दागिने भरजरी साड्या किंवा ड्रेस किंवा साडी प्लेन किंवा साध्या सरळ रेषेतील डिझाईनचे ड्रेस असतील तर एखादाच सिग्नेचर दागिना आणि डोळ्यात भरण्यासारखा मेकअप असावा.

    खरंतर सुंदर दिसण्यापेक्षा, सुंदर, टापटीप राहाणं जास्त महत्त्वाचं असतं. छान प्रसन्न व्यक्तिमत्व आणि टापटीप राहाणीमान असेल तर सोने पे सुहागाच!

    चेहर्‍याची काळजी घेण्यासाठी 

    तेव्हा जे आपण खातोय, ते मी का खातो आणि माझं शरीर हे पचवू शकतंय का हा एकच प्रश्न स्वत:ला विचारुन खा. रोज रात्री झोपताना चेहर्‍याला हलक्या हाताने क्लिंन्झिंग लोशन लावावं. ते वेट टिश्यूनं साफ करावं. त्यामुळे दिवसभर चेहर्‍यावर चढलेला राप स्वच्छ होतो. त्यानंतर हलक्या हाताने मलमल किंवा
    कॉटनच्या स्वच्छ कपड्याने चेहरा पुसून घ्या. नंतर मॉईश्चरायझर लावावं.

    चेहरा फ्रेश ठेवण्यासाठी काही घरगुती उपाय

    १. चेहरा स्क्रब करण्यासाठी २ मोठे चमचे दही आणि ओट्‌सची पावडर एकत्र करुन हलक्या हाताने चेहर्‍यावर चोळावी.

    २. चेहर्‍यावर मुरुमं असल्यास १ छोटा चमचा दालचिनी आणि १ मोठा चमचा मध याचे मिश्रण लावावे.

    ३. चेहरा टवटवीत ठेवण्यासाठी १ चिमूट हळद, १ मोठा चमचा खोबरेल तेलात मिसळून चेहर्‍याला लावावे.

    ४. चेहरा साफ करण्यासाठी १ छोटा चमचा लिंबूरस आणि २ मोठे चमचे मध एकत्र करुन चेहर्‍याला लावावे.

    ५. चेहरा तेलकट असेल तर १ छोटा चमचा हळद, २ मोठे चमचे अॅलोव्हेरा जेल मिसळून लावावे.

    ६. त्वचेवर इन्स्टंट ग्लो हवा असेल तर २ मोठे चमचे दही व २ छोटे चमचे लिंबूरस एकत्र करुन लावावे.

    Read more

    जुलै २०२३ – या वर्षींचा अधिकमास श्रावण

    यावर्षी १८ जुलै पासून १६ ऑगस्ट पर्यंत अधिक श्रावण महिना आलेला आहे.

    अधिकमासाला “पुरुषोत्तम-मास” असेही म्हणतात. अधिकमास कसा व का येतो हे आपण आज पाहणार आहोत. तसेच अधिकमासात काय करावयाचे असते याचीही माहिती आपण घेणार आहोत.

    प्राचीनकाली शास्रकारानी सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे “आरोग्य” हे ओळखले होते. माणसाच्या शरीराचे आणि मनाचे आरोग्य जर चांगले असेल तर जीवन सुखी व आनंदी होऊ शकते हे जाणले होते. शरीराचे आरोग्य प्रामुख्याने आहावर अवलंबून असते. माणसाने जर ऋतूप्रमाणे आहार घेतला तर शरीराचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. जेव्हा ऋतू बदलतो त्यावेळी बरेच लोक आजारी पडतात कारण ते बदलत्या ऋतूप्रमाणे आहारात बदल करीत नाहीत. ऋतूप्रमाणे जर सण राहीले तर सणांप्रमाणे माणसे आहारात बदल करतील आणि त्यांच्या शरीराचे आरोग्य चांगले राहील. परंतू ऋतू हे सूर्यावर अवलंबून असतात आणि सण हे चंद्रावर अवलंबून असतात. म्हणून आपल्या पंचांगात चांद्र-सौर पद्धतीचा मेळ घालण्यात आलेला आहे. त्यामुळे ठराविक सण ठराविक ऋतूत येतात.

    उपवास करण्याचा श्रावण महिना पावसाळ्यात येतो. पावसाळ्यात बाहेर पाऊस पडत असल्याने माणसे बराच वेळ घरात असतात. साहजिकच शरीराचे चलन वलन कमी असल्याने शरीराला हलक्या आहाराची जरूरी असते. उपवासात हलके म्हणजे पचनास सुलभ असे पदार्थ आपण खातो. त्यामुळे शरीरातील मांद्य कमी होते. शरीर चपळ राहते. आधुनिक कालात शरीराचे मांद्य कमी करण्यासाठी “डाएटींग” करतात ना, हाच उद्देश त्यामागे असतो. पावसाळयात भूकही कमी लागते हलका आहार घेणे जरूरीचे असते. श्रावण महिना पावसाळ्यात आल्याने धार्मिक कारणाने माणसे उपवास करतात साहजिकच त्याचा शरीराच्या आरोग्यास फायदा होतो. थंडीत आपल्या शरीरास स्निग्ध पदार्थांची आवश्यकता असते, तसेच थंडीच्या मोसमात भूकही जास्त लागते म्हणून दीपावलीसारखा सण थंडीत येत असतो. संक्रांतीचा सणही थंडीत येतो त्यावेळी आपण तिळगूळ खातो. थंडीत शरीराच्या आरोग्यासाठी खूप आवश्यकता असते. उत्सवांमुळे मनाचे आरोग्य चांगले राहण्यास मदत होते. उत्सवात माणसे दु:ख, चिंता विसरून जातात. आनंदी होत असतात.

    चांद्रसौर मेळ: पंचांगात चांद्र आणि सौर पद्धतीचा मेळ घालण्यासाठी एक नियम तयार करण्यात आला आहे. मीन राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला चैत्र म्हणतात. मेष राशीत सूर्य असताना ज्या चांद्र महिन्याचा प्रारंभ होईल त्याला वैशाख म्हणतात. कधी कधी एका राशीत सूर्य असताना दोन चांद्र महिन्यांचा प्रारंभ होतो. त्यावेळी पहिला तो अधिकमास व दुसरा तो निजमास म्हणून धरला जातो.  ही गोष्ट वेगळ्या पद्धतीनेही समजून घेता येईल. तीस तिथींचा एक चांद्रमास होतो व ३६० तिथींचे (म्हणजेच बारा चांद्रमासांचे) एक चांद्रवर्ष होते. एका सौरवर्षाच्या काळात तशा सुमारे ३७१ तिथी होतात. म्हणजेच प्रत्येक चांद्रवर्ष हे सौर वर्षापेक्षा ११ तिथीने लहान असते. दरवर्षी ११ तिथी शिल्लक राहून ३० तिथी झाल्या की अधिकमास येऊन चांद्र आणि सौर पद्धतीचा म्हणजेच ऋतू आणि सण यांचा मेळ राखला जातो. जेव्हा अधिकमास येतो त्यावेळी तेरा महिन्यांचे म्हणजे ३९० तिथींचे एक चांद्रवर्ष असते.

    एकदा अधिकमास आल्यापासून मध्यम मानाने साडेबत्तीस चांद्रमहिन्यांनी पुन्हा अधिकमास येतो. स्पष्ट मानाने दोन अधिक मासांमध्ये कमीतकमी २७ महिने व जास्तीत जास्त ३५ महिने अंतर असते.

    चैत्र, वैशाख, ज्येष्ठ, आषाढ, श्रावण, भाद्रपद, आश्विन, कार्तिक व फाल्गुन या ९ महिन्यांपैकी कोणताही महिना अधिकमास होऊ शकतो. गंमतीने सांगायचे तर जर चाकरमान्यांचा पगार चांद्रमहिन्यांप्रमाणे देण्यात येत असता तर एका वर्षात तेरा आणि दिवाळीच्या बोनसचा एक जादा म्हणजे चौदा पगार मिळाले असते.

    क्षयमास: चांद्र महिन्यात सूर्याचा राशीबदल झाला नाही की जसा अधिकमास येतो तसेच कधी कधी एका चांद्रमहिन्यात सूर्याचा दोनदा राशीबदल  होतो त्यावेळी “क्षयमास” येतो. कार्तिक मार्गशीर्ष आणि पौष या तीन महिन्यांपैकी कोणताही क्षयमास होऊ शकतो. माघ हा महिना कधीही क्षय किंवा अधिकमास होत नाही. अर्थात या गोष्टी सूर्यगतीवरच अवलंबून आहेत. क्षयमास साधारणत: १९ किंवा १४१ वर्षांनी होतो. ज्यावर्षी क्षयमास येतो त्यावर्षी अधिकमासही येतो. शके १९०४ मध्ये (सन १९८३ मध्ये) पौष महिना क्षयमास होता. त्यावर्षी फाल्गुन अधिकमास आला होता. आता यानंतर शके २०४५ मध्ये (सन२१२३ मध्ये) मार्गशीर्ष क्षयमास येणार असून आश्विन अधिकमास येणार आहे.

    अधिकमासात काय करावे?

    अधिकमासात संपूर्ण दिवस उपवास, किंवा एक वेळ भोजन करावे. देवापुढे अखंड दीवा लावावा. ३३ अपूप म्हणजे अनारसे यांचे दान करावे ३३ अनारसे भगवान विष्णूला अर्पण करावेत असे सांगितले आहे. परंतु जावई हा विष्णूसमान मानला जातो. म्हणून अधिकमासात जावयाला ३३ अनारशांचे दान देण्याची प्रथा सुरु झाली असावी. इथे ३३ अंकाला विशेष महत्त्व प्राप्त झाले आहे. कारण तीन वर्षात वाढल्या गेलेल्या तेहतीस तिथी मानल्या जातात.

    अधिकमासात नित्य व नैमित्तिक कर्मे करावी. मात्र काम्य कर्माचा आरंभ व समाप्ती करू नये. केल्यावाचून गती नाही अशी कर्मे अधिकमासात करावयास हरकत नाही. नामकर्म, अन्नप्राशन, नित्यश्राद्ध हे संस्कार अधिकमासात करायला हरकत नाही. मात्र देवप्रतिष्ठा, चौल, उपनयन, विवाह, संन्यासग्रहण, वास्तुशांती, गृहारंभ या गोष्टी अधिकमासात करु नये असे सांगण्यात आले आहे.

    दान करा!

    अधिकमासात दान करावे असे सांगण्यात आले आहे. भारतीय संस्कृतींत दानाचे विशेष महत्व आहे. दान म्हणजे “डोनेशन” नव्हे. डोनेशन कोणी दिले आणि डोनेशन काय दिले ते जाहीर केले जाते. परंतु दान कोणी दिले आणि काय दान दिले ते गुप्त ठेवायचे असते. एका हाताने दिलेले दान दुसर्‍या हातालाही कळता कामा नये असे म्हटले जाते. अधिकमासाच्या निमित्ताने समाजातील गरजू गरीब लोकांना तसेच सामाजिक कार्य करणार्‍या संस्थांना मदत मिळावी हा त्यामागच उद्देश आहे.

    संस्कृतमध्ये दानासंबंधी सुंदर सुभाषित आहे.

    गौरवं प्राप्यते दानात्‌, न तु वित्तस्य संचयात्‌।

    स्थितिरुच्चै: पयोदानां, पयोधीनामध: स्थिति:॥

    – “दान केल्यामुळे माणसाला प्रतिष्ठा प्राप्त होते. धन साठविल्याने नव्हे. जसे (पाणी देणार्‍या) ढगाचे स्थान आकाशात उंचावर असते. परंतु (पाणी साठविणार्‍या) समुद्राचे स्थान खाली (खड्डयात) असते.”

    कविवर्य विंदा करंदीकर यांनी म्हटले आहे – “देणार्‍याने देत जावे, घेणार्‍याने घेत जावे, घेणार्‍याने देणार्‍याचे हात घ्यावे!” महर्षी व्यास आणि संत तुकारामानी म्हटले आहे. “इतरांना मदत केल्याने पुण्य प्राप्त होते आणि इतरांना त्रास दिल्याने पाप लागते.”

    संस्कृतमध्ये आणखी एक सुभाषितकार म्हणतात – दानेन तुल्यो विधिरस्ति नान्य:।

    लोभाच्च नान्यो ऽ स्ति रिपु: पृथिव्याम्‌॥

    विभूषणं शीलसमं न चान्यत्‌।

    संतोष तुल्यं धनमस्ति नान्यत्‌॥

    “दानासारखे या पृथ्वीवर दुसरे धर्मकृत्य नाही. लोभासारखा दुसरा शत्रु नाही. चारित्र्यासारखा दुसरा उत्कृष्ट अलंकार नाही आणि समाधानासारखे दुसरे धन नाही.” या अधिक श्रावण महिन्यात अन्नदान, वस्रदान, जलदान, श्रमदान, धनदान, विद्यादान, फलदान, अनरसे दान कराच.

    शिवाय रक्तदान, नेत्रदान – अवयव दानाचा संकल्प करता येईल. आपण आनंदाने, समाधानाने जगायचेच आणि जास्तीत जस्त लोकांच्या जीवनात आनंद-समाधानाची बाग फुलविण्याचा प्रयत्न करावयाचा हाच श्रावण अधिक महिन्याचा संदेश आहे.

    या पुढील अधिकमास असे येणार आहेत.

    १. १७ मे ते १५ जून २०२६ – ज्येष्ठ

    २. १६ मार्च ते १३ एप्रिल २०२९ – चैत्र

    ३. १९ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०३२ – भाद्रपद

    ४. १७ जून ते १५ जुलै २०३४ – आषाढ

    ५. १६ मे ते २३ जून २०३७ – ज्येष्ठ

    ६. १९ सप्टेंबर ते १७ ऑक्टोबर २०३९ – आश्विन

    ७. १८ जुलै ते १५ ऑगस्ट २०४२ – श्रावण

    ८. १७ मे ते १५ जून २०४५ – ज्येष्ठ

    ९. १५ मार्च ते १३ एप्रिल २०४८ – चैत्र

    १०. १८ ऑगस्ट ते १६ सप्टेंबर २०५० – भाद्रपद अधिकमास येणार आहेत.

    Read more

    जुन २०२३ – मुले आणि शिस्त

    बर्‍याच घरात “शिस्त” हा कळीचा मुद्दा असतो. मुलांना वाढवताना कोणत्या गोष्टी

    पाळाव्यात, कोणत्या गोष्टी पाळू नयेत यासाठीचे वेगळे वर्ग अस्तित्वात नाहीत. त्यामुळे स्वत:चे अनुभव समोर ठेवूनच पालक आपले पालकत्व निभावत असतात. ते स्वत: ज्या शिस्तीत वाढले तशीच परिस्थिती आपल्या मुलांच्या बाबतीत निर्माण करण्याकडे त्यांचा कल असतो. शिस्त हा आपल्या आयुष्याचा अविभाज्य घटक आहे. मनुष्याचा एकूण विकास हा याच्याशी बव्हंशी अवलंबून असतो. माणूस काही संकेत नियमितपणे पाळत आला आहे आणि अशा नियमांनुसार वागत आला आहे. अश्मयुगीन मानवाने शांतता राखण्याचे नियम अनुसरले नसते तर आपण “आज” पाहू शकलो असतो का?

    शिस्त म्हणजे नेमके काय? – आपण आपल्या जीवनाच्या सर्वच क्षेत्रांत शिस्त आणण्याचा प्रयत्न करत असतो, मात्र आपण जेव्हा शिस्त लावत असतो तेव्हा तसे करण्यामागील कार्यकारणभाव समजून घेणे आवश्यक असते. आजही आपण किंवा आपल्यासारखे कितीतरी जण कित्येक गोष्टींचे आंधळेपणाने अनुकरण करीत असतो. माझ्या आजोबांनी किंवा बाबांनी केले म्हणून मीही तसेच करणार. नियम म्हणजे नि-यम. मी तो पाळणारच असा विचार अनेकदा होताना दिसतो. स्वत:ला नियमांच्या चौकटीत बंदिस्त करून घेताना दिसतो. असे बंदिस्त करून घेताना “आज” त्याची खरच गरज आहे का, याचा सारासार विचारही कधी कधी केला जात नाही. परिणामी, अशा व्यक्ती घराबाहेर आणि घरात दोन्ही ठिकाणी तशाच वागतात आणि आपल्या शिस्तीचा बडगा दाखवित राहतात. त्यांनी मात्र या विशिष्ट शिस्तीची गरज किंवा महत्व लक्षात घेतलेले नसते, तसेच दुसर्‍या व्यक्तीची याबाबतीत वेगळी भूमिका असू शकेल, याचा ते विचारच करीत नाहीत. यातूनच अनेकदा पालकांवर त्यांच्या बालपणीचा काळ व अनुभव -यांचा पगडा जास्त असतो. त्यांच्या बालपणी त्यांच्यावर घालण्यात आलेले निर्बंध, अनेक बाबतीत करण्यात आलेली सक्ती या सर्वांचा जसाच्या तसा वापर ते त्यांच्या पुढच्या पिढीला म्हणजे त्यांच्याच मुलांना शिस्त लावण्यासाठी करतात. मात्र त्यावेळचा काळ व सांस्कृतिक वातावरण आणि आजचा काळ यात कमालीचा झालेला फरक त्यांच्या ध्यानात येत नाही. वस्तुत: शिस्तीमुळे जीवन सुलभ होते. आयुष्याला एक वळण लागते. मात्र जीवनाला नियमात बांधून घातल्यामुळे अनेकदा त्यातून प्रश्न निर्माण होतात. मग शिस्त असूच नये का? वडीलधार्‍यांचा आदर करूच नये का? असा याचा अर्थ नव्हे, पण त्यामागची कारणमीमांसा समजून घेतली आणि मुलांना असे वर्तन करायला लावले तर यातूनच त्याचे योग्य परिणाम मिळतील. पालकांनी मुलांना शिस्त जरूर लावावी. त्यासाठी ते ताठ असावेत. मात्र त्यामागची गरज व वातावरणातील परिवर्तन इ. बाबी विचारात घेण्याइतपत आपले धोरण लवचिकही ठेवावे. पालकांनी मुलांना अवास्तव, अमर्याद स्वातंत्र्य द्यावे असा याचा अर्थ नाही. मुलांमध्ये अनुभवांचे शहाणपण नसते. तसेच प्रत्येक गोष्टीचा अनुभव घेणेही शक्य नसते. अशावेळी दिपस्तंभाप्रमाणे मुलांना वाट दाखवण्यासाठी पालकांनी त्यांना वळण लावावे. त्यांना कोणताही निर्णय घेताना तो तारतम्याने घेणे जोवर साधत नाही, तोवर मुलांवर त्यासाठी पालकांचे मत घेण्याची सक्ती नव्हे, मात्र जबाबदारी टाकावी. कोणताही निर्णय मुलांवर लादण्यापेक्षा त्याचे चांगले-वाईट परिणाम त्यांना समजावून सांगून त्याची आवश्यकता स्पष्ट करावी. त्यातूनच हेतू साध्य होऊ शकतो. पालकांनी मुलांना विचार करण्याची मोकळीक द्यावी. एखाद्या परिस्थितीशी कसा सामना द्यायचा? त्यातून काय निष्पन्न होईलं िकंवा कसे वागले तर योग्य परिणाम मिळतील याचा विचार करण्यासाठी त्यांना प्रवृत्त करावे. त्यांना अशक्यता, स्वप्न, आशा, आकांक्षा आणि वास्तव यातील फरक जाणवून द्यावा, नवनवीन आव्हाने पेलण्याची क्षमता, समज-गैरसमज यातील तफावत जाणवण्याइतपत सक्षमता त्यांच्यात निर्माण करावी.

    एखादे वेळी, पालकांचे समज मुलांनी योग्या रीतीने खोडून काढले तर त्या समजांना चिकटून राहण्याची गरज नाही किंवा तुमचे मूल तुम्हाला जुमानत नाही असा समज करून घेण्याचीही गरज नाही. मुलांना समजून पालकांनी योग्य असे बदल स्वत:मध्ये करून घेतल्यास मुलं त्यांच्या अधिक जवळ येतील. एक पालक आपल्या मुलाला सर्वोत्तम सोयीसुविधा देण्याचा प्रयत्न करत असतो. मग ते शिक्षण असो, सोयीसुविधा असोत किंवा जीवनशैली असो. त्यासाठी त्याने एखादी मागणी केल्यास, पालकांनी त्याला, त्याची खरच गरज आहे का, याचा विचार करून त्याची पूर्तता केली पाहिजे. मात्र एखाद्या गोष्टीची मागणी अवास्तव किंवा अनावश्यक असल्याचे वाटले तर त्याबाबत त्याला विश्वासात घेऊन तशी मागणी अजिबात न पुरवणे श्रेयकर ठरेल! तुमचे एकुलते एक मूल आहे म्हणून त्याची मागणी पुरवणे, तुम्हाला आर्थिकदृष्ट्या शक्य आहे म्हणून किंवा तुमच्या बालपणी ती वस्तू तुमच्या पालकांनी तुम्हाला नाकारली म्हणून आज तिची गरज नसताना ती अजिबात देऊ नका. मुले त्यांच्या पालकांना “इमोशनल ब्लॅकमेल” सहज करु शकतात. पालकांच्या भावुकतेचा फायदा अशा मुलांना सहजपणे उठवता येतो. मग मुलांमधील आक्रस्ताळेपणा वाढतो. अनेक पालकांना तो मोडून काढणे अवघड वाटते. अशा वेळी मुलांना मारणे किंवा धाक दाखवणे याचा काहीच उपयोग होत नाही आणि शिस्तीचा मात्र पुरता बोजवारा उडतो.

    पालकांनी मुलांना शिस्तीचे नियम लावताना स्वत:ला तशाच नियमांमध्ये अडकवून घेतले पाहिजे. घरातील सर्वांनाच काही नियम लावण्यात आलेले आहेत आणि सर्वजण त्या नियमांचे पालन करत आहेत. याची जाणीव मुलांना आपसूक होणे आवश्यक असते. काही नियम केवळ मुलांपुरतेच असले तरी पालकांनी सतत त्यासाठी मुलांना शिक्षा न देता माफीचे धोरण ठेवणे अधिक योग्य ठरेल.

    मुलांबरोबर सुसंवाद ठेवावा. मुलांना बोलण्याची मुभा द्यावी त्यांची मते त्यांच्या बोलण्यातून व्यक्त होत असतात, त्यामुळे त्यांना मोकळे होऊ द्यावे. त्यांच्याशी वेळोवेळी चर्चा करावी. पालक म्हणून घेतलेला निर्णय त्यांच्या भवितव्याच्या दृष्टीने हितावह कसा आहे, याची जाणीव त्यांना करवून द्यावी. तसेच एकदा हाताला, मनाला, एकूणच वागण्याला लागलेली शिस्त मोठेपणी किती व कशी उपयुक्त ठरेल याची समज वेळोवेळी मुलांना त्यांच्याशी सुसंवाद साधून, प्रसंगी त्यांना बोलते करून आणावी.

    मूल म्हणजे जणू मातीचा गोळा. त्याला आकार द्यावा त्याप्रमाणे तो घडतो. त्याच्या वैचारिकतेला, भावनिकतेला, मानसिकतेला आकार देण्याचा प्रयत्न करण्यासाठी शिस्तीचा वापर करावा. शिस्तीमुळे त्यांच्यामध्ये उत्तम संस्कार, भावना व्यक्त करण्याची कुवत निर्माण करता येईल. शिस्तीखाली त्यांना नामोहरम करू नका तर त्यांचे जीवन फुलवा, विकसित करा.

    मुलाला मातीच्या गोळ्याची उपमा देण्यात आली असली तरी तो जिवंत गोळा आहे. तो भावना, आकलनशक्ती व उपजत स्वभाववैशिष्ट्य घेऊन जन्माला आला आहे, याचा पालक या नात्याने कधीच विसर पडू देऊ नका.

    Read more

    मे २०२३ – सौंदर्य टिकवण्यासाठी आहार

    सौंदर्य बघायला, आणि टिकवायला कोणाला आवडणार नाही? प्रत्येकाची सौंदर्याची व्याख्या जरी वेगळी असली, तरी सुंदर दिसायला कोणाला आवडणार नाही? शरीरातील प्रत्येक अवयव बांधेसूद असेल, प्रमाणबद्ध असले, तर ती व्यक्ती नक्कीच सुंदर दिसेल. हे सांगणं जितकं सोपं आहे, करणं आणि पुढे सांभाळून ठेवणं तितकंच कठीण आहे. नियमितता आणि चिकाटी, ह्याच्याबरोबर उत्कट इच्छा असणं जरूरी आहे. इच्छा दांडगी असेल तर माणूस आपल्या व्यापातून वेळ काढून हवी ती गोष्ट साध्य करू शकेल.  आपलं शरीर निरोगी आणि सुडौल ठेवण्यासाठी काय आहार घ्यावा आणि कायकाय टाळावं, त्याबद्दल आता थोड्या विस्ताराने. आपला आदर्श आहारतसं बघायला गेलं तर आदर्श आहार तो की ज्याच्यात, सगळी जीवनावश्यक तत्त्वं असतात. आज स्थौल्याचं प्रमाण इतकं वाढत चाललंय, त्याचं मुख्य कारण चुकीचा आहार. स्थूल शरीर बांधेसूद शरीरापेक्षा कमी सुंदर दिसतं. ते निरोगीसुद्धा नसतं.

    आपला आहार सकाळच्या नाष्ट्यापासून सुरू होतो.  सर्वसाधारण घरात पोहे, उपमा, पाव किंवा चहा पोळी याच प्रकारचा नाष्टा असतो. आणि बाहेर असलो तर वडा पाव, भजी…इत्यादी हे सगळे पदार्थ पोट तर भरतात. पण पोषण मात्र करत नाहीत.  नाष्ट्यामध्ये……

     मोड आलेले मूग किंवा हिरवे चणे शिजवून त्यांच्यावर कांदा, टोमॅटो घालून खावेत. किंवा इडली, डोसा, उत्तप्पा, सांबार आणि चटणीबरोबर खावेत.

     सगळ्या डाळी १ भाग आणि तांदूळ २ भाग घेऊन रात्री भिजत घालून सकाळी त्यांचे डोसे किंवा अडई करून खावेत.

    ह्या अशा प्रकारच्या नाष्ट्यामुळे आपल्या शरीराला ज्या पोषक तत्वांची गरज असते, ती सगळी मिळतात. त्यामुळे त्वचा तुकतुकीत आणि तेजस्वी दिसते. मात्र रोज एकाच प्रकारचा नाष्टा करू नये, त्यात विविधता असावी.

    आहारामागील तत्त्वं असं आहे की, तुम्ही पचवू शकाल, त्यापेक्षा अर्धा आहार घ्यावा. दर वेळी जेवताना, फक्त पोट भरणं हवेच, हे आपले ध्येय असू नये, तर पोषक तत्त्व मिळवून शरीराचे आरोग्य वाढवणे असायला हवे. खास करून जेव्हा आपलं वय लहान असतं, तेव्हा म्हातारपणाची बेगमी करायची असते आणि वय वाढत जातं तसतसं आरोग्य टिकवण्याकडे आपलं लक्ष केंद्रित करायचं. आज आपण निरोगी आहोत, तर हवे ते खा, अशा तंत्राने जगाल तर पुढे शरीर बेढबच नाही, तर जाड आणि असंख्य रोगांचं घर झाल्याने, त्वचा सुरकुतलेली, काळे डाग पडलेली, वाळलेली अशी, दिसायला अगदी विचित्र आणि आपल्या स्वत:लासुद्धा बघवणार नाही अशी होईल.

    माझ्या व्याख्यानात, आदर्श आहार वगैरे जेव्हा मी सांगते, तेव्हा प्रेक्षकांची एकच मागणी असते. ती अशी की हा सगळा आहाराचा बेत आमच्या रोजच्या धकाधकीच्या आयुष्यात बसवायचा कसा? सकाळी ७-७.३० ला निघायचं, घरातील सगळ्यांचा डबा करून निघायचं आणि दुपार, रात्रीचे मेन्यू ठरवायचे तरी कधी.

    वाचकहो त्यासाठी मी पर्याय सुचवते…… सुट्टीच्या दिवशी, एक आठवड्याची तालिका तयार करावी. त्यात सकाळच्या नाष्ट्यापासून रात्रीच्या जेवणापर्यंत सबंध आठ दिवसांचा मेन्यू असावा.

    घरातील इतरांची मदत घेऊन त्याप्रमाणे भाज्या, मासे, चिकनादी मांसाहार ह्यांची तयारी करून ठेवावी. या मेन्यूमध्ये लागणारे मसाले, चटण्या वाटून ठेवाव्यात. आणि प्रत्येक दिवशी, एक तास स्वयंपाकासाठी काढावा. घरातील स्त्री जी आपल्यासाठी इतकं काही करते, तिचं आरोग्य चांगलं राहावं यासाठी घरातील इतरांनी तिला सकाळी किंवा संध्याकाळी व्यायामासाठी वेळ द्यायला हवा आणि बायकांनीसुद्धा असा वेळ काढायलाच हवा. ह्या सगळ्या गोष्टी, सांघिक दृष्टिकोन ठेवूनच करता येतात. यासाठी सबंध परिवाराचा सहभाग हवा.

    घरातील सगळ्यांनीच पुढाकार घेऊन बाजारहाट, स्वयंपाक आणि मेन्यू प्लानिंग ठरवून आपसात वाटून घ्यावे. हे सगळं तयारी वगैरेचं झालं, पण मुख्य प्रॉब्लेम हा असतो, की सकाळी सकाळी घर सोडायचे असल्यास नाष्ट्यासाठी भूकच नसते.

     ह्यासाठी रात्री लवकरजेवणे आणि जेवणानंतर किमान वीस-पंचवीस मिनिटे चालणे हाच एक तोडगा आहे. त्याचप्रमाणे, सकाळी थोडा तरी व्यायाम करावा, म्हणजे जो काही थोडा बहुत नाष्टा घ्याल तो पचेल.

     सकाळी लवकर घर सोडणार्‍यांनी, नाष्ट्यासाठी एखादं फळ खावं. आणि वर जे पदार्थ सांगितेल आहेत ते डब्यात नेऊन ९-९.३० ला ऑफिसमध्ये खावेत. तिथे जर चहावाला येत असेल तर त्याला चहाऐवजी हळद घातलेलं दूध आणायला सांगावे. साखर न घालता घेता आलं तर जास्त चांगलं.

     दुपारी डब्यात पोळी कमी आणि भाजी जास्त असा आहार असावा. संध्याकाळी घरी आल्यानंतर चहा घेण्यापेक्षा थंड दूध घ्यावं. भूक लागलीच तर चणे शेंगदाणे, किंवा मोड आलेल्या मुगाची भेळ किंवा व्हेजिटेबल सँडविच घ्यायला हरकत नाही.

      रात्री जेवण तितक्याच लवकर जमेल तितक्या लवकर घ्यावे. वरील सगळे मुद्दे स्त्रिया आणि पुरुष दोघांना लागू होतात. नवरा आणि बायको या दोघांमधील व्यायाम तत्पर जो असेल त्याने दुसर्‍याला थोडे ढकलावे, सुदृढ करावे. तशीच घरकामात एकमेकाची मदत करावी.

    वाचकांनो, इथे एक गोष्ट सांगते – कारण, हा माझा अनुभव आहे की, मी जेव्हा लोकांना हे खा किंवा हे खाऊ नका सांगते तेव्हा त्यांची पहिली प्रतिक्रिया अशी असते “हे सगळं नाही बुवा जमणार, डॉक्टर मला करायला.”

    नवी गोष्ट करताना थोडा त्रास तर होणारच आहे, पण आपण हे सगळं स्वत:साठी तर करतोय, ह्या सगळ्यामुळे आपली त्वचा, आपलं शरीर आणि त्यामुळे आपलं मन निरोगी, तेजस्वी आणि चिरतरुण राहणार आहे. मग काय? करणार ना लवकरात लवकर सुरुवात?

    Read more

    एप्रिल २०२३ – चैत्रमहिमा

    चैत्र महिना हा हिंदू पंचांगातील पहिला महिना. नवीन वर्षाची सुरवात होते ती इथूनच. नवीन वर्षाचे स्वागत आपण चैत्र प्रतिपदेला गुढी पाडवा साजरा करून करतो.

    चैत्र प्रतिपदा ही तिथी फार महत्त्वाची मानली जाते. गुढी पाडवा साडे तीन मुहूर्तांपैकी एक मानला जातो. ह्याच दिवशी ब्रह्मदेवाने सृष्टिनिर्मितीला प्रारंभ केला असे म्हणतात. आधुनिक शब्दात सांगायचे तर हा सृष्टीचा वर्धापन दिवस किंवा वाढदिवस. नववर्षाचे स्वागत करण्यासाठी घरोघरी गुढी उभारण्याचा कार्यक्रम केला जातो. यासाठी घरातील सर्वजण लवकर उठून गुढी उभारण्याची तयारी करतात. एका उंच बांबूच्या काठीला धुवून स्वच्छ केले जाते. त्याला रेशमी साडी अथवा वस्र नेसवून त्यावर चांदीचा अथवा तांब्याचा तांब्या, कडूलिंब, आंब्याची पाने, साखरेची माळ, फुलांचा हार बांधून तिला सजवले जाते. घराच्या दारात अथवा खिडकीत गुढी उभारण्यात येते. गुढी हे स्नेहाचे, मांगल्याचे, उत्साहाचे आणि आनंदाचे प्रतिक मानले जाते. प्रत्येक मराठी घरात उत्साहात हा सण साजरा होतो. पण आपण गुढी का उभारतो? चैत्र महिन्याचे काय महत्त्व आहे? ह्या प्रश्नांची नेमकी उत्तरे अनेकदा ठाऊक नसतात. म्हणूनच ह्या लेखात वाचू या “चैत्रमहिमा.”

    चैत्र प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा शालिवाहन शकाची सुरवात मानण्यात येते. त्याविषयी कथा सांगण्यात येते की शालिवाहन नावाच्या कुंभाराच्या मुलाने मातीचे सैन्य तयार केले आणि त्यावर मंतरलेले पाणी शिंपडले. त्यामुळे मातीच्या त्या बाहुल्या जीवंत झाल्या. त्या सैन्याच्या जोरावर त्याने शत्रूचा पराभव केला. शालिवाहनाच्या ह्या पराक्रमाप्रीत्यर्थ शालिवाहन शक सुरू करण्यात आले. शालिवाहनाने मातीचे सैन्य जिवंत केले, म्हणजे काय केले? आज आपण याचा अर्थ घ्यायचा तो हा की त्याकाळातील लोक पराक्रमहीन, चैतन्यहीन झाले होते. शालिवाहनासारख्या नेत्याने त्यांना जागे केले. त्यांना लढण्याचे बळ दिले. अर्थात विजयाची प्रेरणा देणारा असा हा सण आहे.  गुढी म्हणजे तर विजयपताका. सुप्रसिद्ध भावगीत गायिका माणिक वर्मा यांनी गायलेले हे गीत आठवते ना ?

    विजयपताका श्रीरामाची

    झळकते अंबरी

    प्रभू आले मंदिरी

    श्रीराम वनवासातून पुन्हा

    अयोध्येला परत आले ते याच दिवशी म्हणूनच यशाची गुढी उभारून हा दिवस साजरा केला जातो. गुढी म्हणजे इंद्रध्वज असेही म्हणतात. असं म्हणतात की, महाभारताच्या आदिपर्वात उपरिचर राजाने इंद्राने त्याला दिलेली कळकाची काठी जमिनीत रोवली आणि नवीन वर्षाच्या सुरुवातीला तिची पुजा केली. या परंपरेचा आदर राखण्यासाठी गुढी पूजन केले जाऊ लागले. म्हणजेच गुढी उभारण्याची परंपरा फार प्राचीन आहे. महाराष्ट्रातील संतांनीही गुढीचा उल्लेख केलेला दिसतो. “टाळी वाजवावी गुढी उभारावी, वाट ती चालावी पंढरीची” हे संत चोखामेळा यांचे पद्य आपल्या परिचयाचे आहे. ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, “अधर्माचि अवधी तोडीं । दोषांचीं लिहिलीं फाडीं । सज्जनांकरवी गुढी । सुखाची उभवीं” समाजात सज्जनांचा विजय व्हावा, यासाठीच ही प्रार्थना. संत एकनाथ महाराजांच्या साहित्यात तर अनेकदा गुढीचा उल्लेख आढळतो. “सेवकु परचक्र विभांडी । तंव राजा उभारी यशाची गुढी । शिष्य परमानंदीं दे बुडी । तेणें गुरूसी गाढी सुखावस्था” यासारख्या उल्लेखावरून गुढी विजयाचे प्रतीक असल्याचे स्पष्टपणे लक्षात येते.  तुकाराम महाराजही म्हणतात “पुढें पाठविलें गोविंदें गोपाळां । देउनि चपळां हातीं गुढी ॥२॥”

    प्राचीन काळापासून ही जी गुढी उभारण्याची परंपरा सुरू आहे त्यापासून आपण नक्की काय बोध घ्यायचा हे आपल्याला कवयित्री बहिणाबाई किती छान सांगतात बघा.

    गुढीपाडव्याचा सन

    आतां उभारा रे गुढी

    नव्या वरसाचं देनं

    सोडा मनांतली आढी

    नवीन वर्षाचे स्वागत मोकळ्या मनाने करायचे, मागच्या वर्षात झालेली भांडणे, रुसवे-फुगवे तिथेच सरत्या वर्षाबरोबर विसरायचे आणि प्रेमाची गुढी उभारायची.

    वटवृक्ष

    एक झाड वादळ वार्‍यातही आपल्या मुळांना घट्ट धरून उभ असलेलं. जाणार्‍या – येणार्‍या वाटसरूला आपल्या सावलीनं कुशीत घेणारं, पिल्लांना आपल्या अंगा-खांद्यावर घरटी बांधायला आसरा देणारं. भूकेलेल्यांची भूक भागवणारं. असं प्रेमळ, परोपकारी, उदार मनाचं, सर्वांना सुख देणारं ते झाड आज अगदी एकाकी झालंय.

    जोवर त्याला पालवी होती, ते फळं देत होतं तोवर सर्व त्याच्या आश्रयाला येत होते. आज कुणी पिल्लही आपली घरटी बांधत नाहीत. कुणी वाटसरूही तिकडे फिरकत नाही. का तर पहिल्यासारखी हिरवीगार पाने त्या झाडाला नाहीत. गोड रसाळ फळे नाहीत, गार सावली नाही.  पण आज जेव्हा खरी गरज त्या झाडाला आहे. तेव्हा सर्वांनी आपली पाठ फिरवली. कुणी आपुलकीने, माणुसकीच्या नात्याने जर त्याला पाणी घातलं असतं तर ही वेळ त्या झाडावर आली नसती. उनाड ओसाड रानात उगवल्यासारखं आज ते वाटतय. पिल्लांची वाट बघतयं. कुणीतरी आपल्या कुशीत निजावं या आशेने जगतय. खरंच झाड आणि माणसाच्या आयुष्यात तरी काय फरक आहे? जोवर आपल्याकडे पैसा असतो. कुणाला द्यायला काहीतरी असतं तोवर सगळे जमा होतात. प्रेमाचा खोटा भास दाखवतात. पण ते प्रेम आपल्यावरचं नसून आपल्याकडे असलेल्या पैशावरचं असतं. मग पैसा मोठा की प्रेम. म्हणून सर्व काही विकत घेता येतं म्हणून पैशाला महत्त्व द्यायचं की प्रेमानं जग जिंकता येतं म्हणून प्रेमाला महत्त्व द्यायचं. पण प्रेम हे सर्वश्रेष्ठ आहे. नात्यांमध्ये असलेला ओलावा हा कायम असावा. आपलं म्हणून विचारणांर, मायेनं जवळ घेणारं प्रेम हे पैशाने विकत घेता येत नाही. प्रेम ही बाजारात विकणारी वस्तू नव्हे, माणसाच्या हृदयातील भावना आहे. जी आपोआप निर्माण व्हावी लागते. म्हणून आपल्या घरातल्या वटवृक्षांना आपुलकीचं पाणी पाजा. प्रेमाचा स्पर्श करा, मायेनं जवळ घ्या. त्यांच्या सावलीतच मोठे व्हा. आपलं स्वत:च अस्तित्त्व निर्माण करा पण त्यांच्या अस्तित्त्वाला धक्का लागणार नाही याचीही काळजी घ्या.

    Read more

    मार्च २०२३ – आनंदी राहण्याचे रहस्य

    आसपास असलेल्या वेदना, समस्या, ताण, तणाव यांमध्ये महत्त्वाचे असते ते आनंदी राहणे. समस्त मानसिक विकारांवर ‘‘आनंदी राहणे” हा एक उत्तम इलाज आहे.

    आनंदी राहणे म्हणजे काय?

    आनंद सर्वांना हवाहवासा असला तरी तो बाजारात विकत मिळत नाही. तो सकारात्मक विचारशैलीतून निर्माण होतो.

    रामदासांनी म्हटल्याप्रमाणे ‘‘जगी सर्व सुखी असा कोण आहे, विचारी मना तूच शोधूनी पाहे!” प्रत्यक्ष जीवनात सर्वसुखी कोणीच नसते. प्रत्येकाला दु:खाचा सामना करावा लागतोच. काहींना त्यांच्या समस्यांचा सामना करायला आवडते तर काहींना त्यांपासून पळ काढायला. या समस्यांना सक्षमपणे तोंड देणार्‍या व्यक्तींमध्ये निराश न होता संघर्ष करण्याची कुवत असते.

    एका बाजूला संघर्ष करून समस्यांवर विजय मिळवण्याची महत्त्वाकांक्षा ठेवणार्‍या व्यक्ती असतात तर दुसर्‍या बाजूला क्षणिक दु:खाने कोलमडून जाणारी, सतत गांजलेला, भविष्यातील समस्यांचा ताण वर्तमानात घेऊन वावरणारी कायम चिंतातूर राहणारी मंडळीही आसपास दिसतात. भगवद्‌गीतेत सांगितल्याप्रमाणे कोणत्याही परिस्थितीला तुम्ही कसे सामोरे जाता यावर तुमची क्षमता ठरते आणि समस्या सोडवण्याची क्षमता प्रत्येकात असते. मात्र समस्या सोडविण्याचा दृष्टिकोन स्वीकारण्याची काही जणांची तयारीच नसते.

     स्वत:चा स्वत:वर विश्वास असणे सर्वात महत्त्वाचे ठरते. या विश्वासाच्या बळावरच आयुष्यामध्ये मोठा पल्ला गाठणे शक्य होते. यासाठी काही सहज साध्य नियम पाळणे गरजेचे ठरते.

     लोकं काय म्हणतील या लोक लज्जेचे भय बाळगू नये.

     आयुष्यात नेहमीच शक्यतो आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. कोणत्याही प्रकारे लोक लज्जेचे भय बाळगून आनंदी राहता येत नाही.

    माणूस समाजशील प्राणी आहे. त्यामुळे बव्हंशी तो समाजावर अवलंबून असतो मात्र तरीही त्याला स्वत:चं अस्तित्वही असतं. ते विसरून तो जेव्हा फक्त लोकांचाच विचार करू लागतो तेव्हा तो इतरांना काय वाटेल या विचाराने स्वत:मध्ये तसा बदल करू लागतो. कधी-कधी स्वत:चं मन मारतो. अखेर दु:खी होतो. प्रत्येक कृतीचे उत्तर तुमच्याकडे असल्यास इतरांचा विचार करून दु:खी होण्याची गरजच काय? खरंतर सतत टीकेचा स्वर काढणार्‍यां पासून दोन हात दूर राहणेच उत्तम! कधीही कोणीही तुमच्यावर टीका केल्यास त्यावर कोणतीही प्रतिक्रिया न देता शांतपणे व्यक्त व्हा. या जगात सर्वांचे समाधान करण्याची चूक करू नका. जितक्या व्यक्ती तितक्या प्रवृत्ती. त्यामुळे सगळ्यांना वाटेल तसे करता येणे अवघडच आहे. त्यामुळे जे तुम्हांला योग्य वाटते तेच करा.

    आनंदी राहाणार्‍यांबरोबर रहा नकारात्मक विचार करणार्‍यांपेक्षा सकारात्मक विचार करणार्‍या व सदैव आनंदी राहणार्‍या व्यक्तीं बरोबर रहा. यामुळे येणार्‍या प्रत्येक समस्येकडे पाहण्याचा त्यांचा दृष्टिकोन वेगळा असतो. त्यांच्यासोबत राहण्यामुळे संगतीचा परिणाम होऊन आपली विचारसरणी देखील सकारात्मक होऊ शकते.

    सकारात्मक असणे म्हणजेच समस्या स्वीकारणे. त्यातून वाट काढणे होय. आपले निर्णय नेहमीच योग्य ठरतील असे नाही. कोणतेही निर्णय त्यामुळे होणार्‍या परिणामांवर अवलंबून असतात. परिस्थितीचा अंदाज घेऊन निर्णय घ्या. एका नाण्याला दोन बाजू असतात त्याचप्रमाणे घेतलेल्या निर्णयाचे परिणामही चांगले वाईट असू शकतात.

    तुमच्या विचार करण्याच्या पद्धतीवर तुमचा मूड ठरू शकतो. विचार एक केंद्री होऊ नकारात्मक होऊ लागले तर मूडही वाईट होईल. त्यामुळे नेहमी चांगला विचार करा. प्रत्येक गोष्टीचे चांगले-वाईट परिणाम होणारच. त्यामुळे वाईटातूनच चांगले शोधण्याचा प्रयत्न करा.

    आनंदाची वाट पाहत राहू नका लहान-सहान गोष्टींमधून मिळवण्याचा प्रयत्न करा. आनंदी रहा. आनंद ही मनोवस्था असून, ग्लास अर्धा रिकामा आहे किंवा अर्धा भरलेला आहे, असे म्हणणार्‍या दोन मनोवस्थांच्या प्रकारच्या सकारात्मक व नकारात्मक विचार करणार्‍या व्यक्ती असतात. आनंद मिळविण्यासाठी धडपड केली तर पदरी निराशाच येईल. छोट्या-मोठ्या घटना किंवा प्रसंगांमुळे तुम्ही घाबरून गेलात तर आनंदा पासून खूपच दूर निघून जाल. आनंदी राहण्याचा प्रयत्न करा. आनंद तुमच्या जवळ राहील अन्यथा तुमच्यापर्यंत येणारही नाही.

    सख्य संबंध अथवा मैत्रीसंबंध जोडा. एकही मित्र-मैत्रीण नसलेल्या व्यक्तीस दरिद्री म्हणतात. कारण अशा व्यक्तींजवळ त्यांच्या उरातील दु:ख, वेदना व्यक्त करून हलकी करण्यासाठी एकही व्यक्ती नसते. आनंदी व्यक्ती नेहमीच नवीन मित्रमंडळाच्या शोधात असतात. त्यांच्याशी प्रेमाचे, मायेचे सख्य संबंध प्रस्थापित करतात. ही एक सापेक्ष क्रिया आहे. जर तुम्ही एखाद्याला आनंद दिलात तर तो तुम्हांला आंनदी ठेवील. त्यामुळे चांगले, मित्रत्वाचे, सख्य संबंध जोडा व आनंदी व्हा.

    परिस्थितीतून आनंद मिळवण्याचा प्रयत्न करा :

    परिस्थिती मग ती कोणतीही असो कठीण परिस्थितीतही आनंदी राहण्याचा प्रयत्न करणे म्हणजेच अवघड परिस्थितीतून मार्ग काढणे होय. तुमच्या कठीण काळातही हसू शोधा, हसवा, हसत रहा. यामुळे चांगले विचार तुमच्या मनात निर्माण होतील आणि या विचारांच्या आधारे तुम्ही दु:ख, वेदना व प्रतिकूलता यांमधून वाट काढू शकाल. तुमच्या डोक्यात नकारात्मक विचारांनी गर्दी केली असेल तर थंड डोक्याने प्रतिकूलतेतून मार्ग काढणे शक्य होणार नाही.

    स्वत: हसा व इतरांना हसवा :

    ‘‘दिसते तसे नसते म्हणून जग फसते”. त्यामुळे एखाद्या हसतमुख व्यक्तीकडे पाहून त्याला कसलेही दु:ख नाही, असे म्हणून चालणार नाही किंवा सतत रडारड करणार्‍या व्यक्तींचे दु:ख मोठे आहे, असे समजूनही चालणार नाही. त्यामुळे हसत राहण्याची कला अवगत करा ती कोणत्याही भीतीचा सामना करण्यास आपल्याला सक्षम करते तसेच हसत राहण्याने मूडही आनंदीच होतो आणि अवघड प्रसंगातही तरून जाण्याचे बळ आपल्याला येते.भरपूर परिश्रम करा, स्वत:वर विश्वास ठेवा कोणीही तुमच्यापासून आनंद हिरावून घेऊ शकणार नाही.

    पूर्वानुभवांपासून धडा घ्या

    जर तुमच्या मनात काही कडू आठवणी असतील तर चांगल्या विचारांनी त्या पुसून टाकण्याचा प्रयत्न करा. आपल्या हातून घडलेल्या चुका पुन्हा होणार नाहीत याची दक्षता घ्या. तुमच्या मनातील राग तुमच्या दुर्दम्य इच्छाशक्तीत परावर्तित करा. अपयश ही यशाची पहिली पायरी असते. आत्मविश्वासाने पुन्हा कामाला लागा. जर तुमच्या निर्णयक्षमतेतून तुम्ही मानसिकदृष्ट्या सबळ असल्याचे सिद्ध करून दाखवा.

    Read more
    Visit Us On FacebookVisit Us On InstagramVisit Us On Twitter